माध्यान्ह भोजनाची बातमी देणाऱ्या पत्रकाराचा उत्तर प्रदेशात मृत्यू

माध्यान्ह भोजनाची बातमी देणाऱ्या पत्रकाराचा उत्तर प्रदेशात मृत्यू

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पत्रकार पवन जयस्वाल यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते कर्करोगाने त्रस्त होते. वारा

अल जझिराची पत्रकार इस्रायल सैनिकांच्या कारवाईत ठार
आर्थिक उदारीकरणाची ३० वर्षे व वित्तीय क्षेत्राचा मागोवा
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची बाजारात घसरण

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पत्रकार पवन जयस्वाल यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते कर्करोगाने त्रस्त होते. वाराणसी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ऑगस्ट २०१९ मध्ये मिर्झापूर जिल्ह्यातील एका शाळेत माध्यान्ह भोजनात मुलांना दिल्या जाणाऱ्या ‘मीठ-रोटी’चा मुद्दा उघड केल्यानंतर पवन चर्चेत आले होते. ही बातमी दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्याच्यावर एफआयआर दाखल केला होता. मात्र, नंतर त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली होती.

ऑगस्ट २०१९ मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मिर्झापूर जिल्ह्यातील जमालपूर भागातील शिऊर येथील सरकारी शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून रोटी आणि मीठ वाटण्यात आले होते. . व्हिडिओमध्ये, मुले शाळेच्या व्हरांड्यात जमिनीवर बसून मीठ घालून रोट्या खाताना दिसत होती.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही माध्यान्ह भोजनात मुलांना ‘मीठ-रोटी’ दिल्याचा व्हिडिओ ट्विट केला होता.

जनसंदेश टाईम्स या वृत्तपत्रासाठी पत्रकार पवन जयस्वाल यांनी हा व्हिडिओ तयार केला होता. तो व्हायरल झाल्यानंतर जाणूनबुजून फसवणूक करून व्हिडिओ व्हायरल करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता.

न्यूजलँड्रीच्या वृत्तानुसार, सुमारे महिनाभरापूर्वी पत्रकार पवन जयस्वाल यांनी आपल्या आजाराची माहिती आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना व्हॉट्सअॅपवर दिली होती. त्यांनी लिहिले होते की त्यांच्याकडे रोजची औषधे घ्यायलाही पैसे नाहीयेत.

यानंतर संजय सिंह यांनी ट्विट करून लोकांना पवन जयस्वाल यांना मदत करण्याचे आवाहन केले. संजय सिंह यांनी तातडीने एक लाख रुपयांची मदत दिली आणि पुढील मदतीचे आश्वासन दिले. यानंतर अनेक पत्रकारांनीही त्यांना मदत केली.

त्यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर संजय सिंह यांनी ट्विट केले आणि म्हटले आहे, “शाळेत मुलांना मिठाची भाकरी मिळत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या धाडसी पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे पवन जयस्वाल यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी पवन यांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांचे कुटुंब मोठ्या संकटात सापडले होते. घरातील सर्व जमा पैसे त्यांच्या उपचारात खर्च झाले. आई आणि पत्नीने आपले दागिने विकले, त्यानंतरही ते त्यांच्या उपचारासाठी पुरेसे पैसे जमा करू शकले नाहीत.

गेल्या वर्षी पवन यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे वाराणसी येथे निदान झाले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर ते घरी परतले, तेव्हा पुन्हा एकदा आजार वाढल्याचे पुढे आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0