मुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८

मुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८

मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजार उद्भवल्याची पहिली घटना १९९५मध्ये उघडकीस आली होती. त्यानंतर दरवर्षी हा आजार उन्हाळ्यात येत असतो पण आजतागायत हा आजार का उद्भवतो याची माहिती मिळालेली नाही. पण ‘सायन्स डायरेक्ट’ या वैद्यकीय अहवालात एईएसची १३५ कारणे सांगितली आहेत ज्यांमध्ये खाणे-पिणे, राहण्याची परिस्थिती, जीवनशैली, आर्थिक परिस्थिती व जात अशी कारणे आहेत पण मूळ कारण या अहवालातही स्पष्ट नाही.

‘अग्निपथ वरून बिहार पेटले
बिहारच्या ऊसाला नेपाळमध्ये मागणी
बिहारमध्ये नितीश विरोधासोबत बेरोजगारीची लाट

मुजफ्फरपूर : मोतिहारी जिल्ह्यातील गणेश सिरसिया या गावांत प्रमिला देवी यांच्या घरात एका पूजा होती. घरात आनंदाचे वातावरण होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पूजा संपली व प्रमिला आपल्या चार वर्षांच्या मुलीला प्रियांशूला झोपायला घेऊन आल्या.

दिवसभर कामामुळे प्रमिला थकल्या होत्या, त्यामुळे त्यांनाही लगेच झोप लागली. सकाळी नेहमीप्रमाणे त्या उठल्या आणि काही वेळाने त्यांनी प्रियांशूला उठवण्याचा प्रयत्न केला. प्रियंशूचे डोळे उघडत नव्हते. तिचे शरीर कडक झाले होते.

प्रमिलाने आपल्या सासूला सोबत घेतले आणि थेट प्रियंशूला घेऊन जवळच्या काही सरकारी रुग्णालयांमध्ये नेले. काही रुग्णालयात डॉक्टर नव्हते. अखेर एक रुग्णालय मिळाले. डॉक्टरांनी प्रियंशूला तपासून काही औषधे दिली आणि श्री कृष्ण मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

प्रमिलाने परिस्थितीचे गांभीर्य पाहून अॅम्ब्युलन्स बोलावली, चार हजार रुपये त्याचे भाडे ठरवले व प्रियंशूला रुग्णालयात नेले. दुपारपर्यंत प्रियंशूची प्रकृती अगदीच नाजूक होती. रुग्णालयात दाखल करतात डॉक्टरांनी प्रियंशूला ऑक्सिजन मास्क लावला व बालरुग्ण अतिदक्षता विभाग (१)मध्ये तिला भरती केले.

प्रमिलाची नजर सतत अतिदक्षता विभागाकडे लागून होती. सतत येरझाऱ्या मारल्या जात होत्या. अध्येमध्ये खू्र्चीवर बसायची पण परत अस्वस्थ होऊन येरझाऱ्या मारायची.

प्रमिलाचे पती मोहन राम पंजाबमध्ये मजुरीचे काम करतात. घरात कोणी पुरुष नसल्याने प्रमिलाला आपल्या सासूकडे जावं लागले होते. आदल्या दिवशी प्रियंशूला काय खायला दिले होते ते प्रमिलाला आठवत नव्हते. ‘प्रियंशूने दिवसा लिची व रात्री भुजिया-रोटी खाल्ल्याचे मला आठवतेय, पण जेव्हा ती सकाळी उठत नव्हती व तिचे शरीर ताठ झाल्याचे पाहून मला भीती वाटली’, असे ती सांगते.

प्रमिलाने जेव्हा एका ‘अज्ञात तापा’ने ५० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे आणि १०० हून अधिक मुलं रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी बातमी ऐकली तेव्हा तिला भीती वाटू लागली.

या ‘अज्ञात तापा’ला वैद्यकीय शाखेत ‘अॅक्यूट इन्सेफेलायटिस सिंड्रोम’ (एईएस) असे म्हणतात. हा आजार मुख्यत: उन्हाळ्यात उफाळतो व तो पसरतो. बिहारमध्ये याला ‘चमकी’ म्हणतात.

बिहारमधील तिरहुत प्रादेशिक विभागातील मुझफ्फरपूर, वैशाली, शिवहार, चंपारण्यचा पूर्व व पश्चिम प्रदेश या भागात हा आजार मे व जूनच्या दरम्यान भयावह रुप धारण करतो.

यावर्षी याच काळात हा आजार पसरला पण शासकीय यंत्रणा बेसावध असल्याने तो झपाट्याने पसरत गेला. गेल्या चार वर्षांची तुलना करता या वर्षी मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे व सरकारी रुग्णालयात अजूनही मुलांची भरती होताना दिसत आहे. अनेक मुलांवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी वैशाली, मुझफ्फरपूर व समस्तीपूर जिल्ह्यात ६ मुलांचा मृत्यू एईएसने झाला. बुधवारीही आकडा वाढू शकतो पण सरकारी अधिकारी एईएसने मुलांचे मृत्यू झाले आहेत हे मानायला तयार नाहीत.

गेल्या रविवारी बिहार आरोग्य खात्याने एक पत्रक जाहीर केले. या पत्रकात यंदा हायपोग्लाइसिमिया या आजाराने मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे सरकारचा दावा होता. पण सरकार हे सांगण्यास तयार नाही, की गेल्या काही दिवसात जी मुले मरण पावली आहेत, त्यामध्ये एईएसबरोबर हायपोग्लाइसिमियाचे रुग्ण होते.

श्री कृष्ण मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात बालरुग्ण कक्षात मुलांवर उपचार सुरू आहेत. नव्या रुग्णांना तिथे तातडीने भरती करून घेतले जात आहे. ज्या मुलांची प्रकृती सुधारत आहे त्यांना रुग्णालयात वेगळ्या बालरुग्ण विभागात हलवले जात आहे.

मुझफ्फरपूर येथील श्री कृष्ण मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे सुपरिटेंडेंट डॉ. एस के साही सांगतात, ‘आमच्या रुग्णालयात १४३ मुले भरती झाली असून त्यापैकी ४३ मुलांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ मुलांना उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. दोनएक दिवसात २७ मुलांची प्रकृती पाहून त्यांना घरी सोडण्यात येईल.’

मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजार उद्भवल्याची पहिली घटना १९९५मध्ये उघडकीस आली होती. त्यानंतर दरवर्षी हा आजार उन्हाळ्यात येत असतो पण आजतागायत हा आजार का उद्भवतो याची माहिती मिळालेली नाही. पण ‘सायन्स डायरेक्ट’ या वैद्यकीय अहवालात एईएसची १३५ कारणे सांगितली आहेत ज्यांमध्ये खाणे-पिणे, राहण्याची परिस्थिती, जीवनशैली, आर्थिक परिस्थिती व जात अशी कारणे आहेत पण मूळ कारण या अहवालातही स्पष्ट नाही.

‘Determinants of Acute Encephalitis Syndrome (AES) in Muzaffarpur District of Bihar, India: A Case-Control Study’, या संशोधन अहवालात एईएसच्या १२३ केसेसचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार हा आजार अनु.जाती, जमाती व अन्य मागास जातींमध्ये आढळतो असे निरीक्षण आहे. १२३ केसेसमधील १०० केसेसमध्ये मृत मुलांचे पालक अशिक्षित आढळले आहे तर ११४ मुलांचे पालक शेतजमिनीवर राबतात असे नमूद केले गेलेले आहे. अस्वच्छ परिसर, कुपोषण, दूषित पाणी, पौष्टिक आहारची कमतरता व अज्ञान ही कारणेही या अहवालात ठळकपणे दिसून येतात.

लिचीच्या उत्पादनात मुझफ्फरपूर हे अग्रेसर आहे आणि एईएसचे रुग्ण बहुतेक याच भागातले असतात. त्यामुळे काही वैद्यकीय अधिकारी लिचीचा या आजाराशी संबंध असल्याचे सांगतात. काही आंतरराष्ट्रीय संशोधनात लिचीमुळे एईएस उद्भवतो असे म्हटले आहे पण ठामपणे निष्कर्ष अजून कोणी मांडलेला नाही.

आम्ही रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांच्या पालकांची भेट घेतली. काही पालकांनी आमच्या मुलाने लिची खाल्ल्याचे सांगितले व काहींचे म्हणणे होते की आमच्या मुलाने लिची खूप दिवसांपूर्वी खाल्ली होती.

९ जूनला रुग्णालयात भरती झालेल्या संध्याच्या आईने मान्य केले की माझ्या मुलीने आजारी पडण्याअगोदर खूप लिची खाल्ली होती. तर अंशु कुमार या चार वर्षाच्या मुलाचे वडील संजय राम यांनी, आजारी पडण्याअगोदर चार दिवस आधी अंशुने लिची खाल्ली होती, असे सांगितले.

इंडियन मेडिकल असो.मधील डॉ. अजय कुमार म्हणतात, या आजाराचे मूळ अजून सापडलेले नाही आणि हा आजार संसर्गजन्य नाही असेही म्हणता येत नाही. आम्हाला जेव्हा अशा आजाराचा संसर्ग लक्षात आला तेव्हा आम्ही एक प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी केली होती पण ही मागणी अजून पुरी झालेली नाही.

या आजाराचे मूळ सापडत नसल्याचे लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी बिहार सरकारने युनिसेफशी चर्चा करून काही पावले उचलली होती. त्यानुसार आशा वर्करनी गावागावांत जाऊन मुलांना ओआरएस दिले होते, गावांमध्ये फिरून मुले उपाशी झोपत नाहीत ना याची खातरजमा केली होती. त्याचप्रमाणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य सुविधा, औषधे आहेत की नाहीत याची माहिती गोळा केली होती. या प्रयत्नांमुळे एईएस मृत्यूचे प्रमाण खाली आले होते.

बिहारच्या आरोग्य खात्याने आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार २०१५मध्ये या आजाराने ११, २०१६मध्ये चार, २०१७मध्ये ११, २०१८मध्ये सात मुलांचा मृत्यू झाला होता. पण या वर्षी हे प्रमाण अधिक झाले व बिहार आरोग्य खात्याचा बोजवारा उडाला.

 

उमेश कुमार राय, मुक्त पत्रकार आहेत.

……………..

बिहारचे आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री क्रिकेटमध्ये दंग

 मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वर आजार थैमान घालत असताना बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे रविवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यात गर्क होते. ‘किती विकेट पडल्या?’ असा प्रश्न मंगल पांडे विचारत असतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात आल्याने खळबळ उडाली आहे. पांडे यांच्या सोबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हेही सामना पाहात होते.

काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत चौबे झोपल्याचे आढळल्याने गदारोळ उडाला होता. ‘आपण झोपलो नव्हतो तर विचारात होतो’, असे उत्तर देऊन चौबे यांनी आपली सुटका करून घेतली होती.

बिहारमध्ये मेंदूज्वराची साथ पसरल्याने सरकारी यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत आहेत. त्यात सरकारी रुग्णालयात योग्य सोयीसुविधा नसल्याने रुग्णांचे नातेवाईक तक्रारी करताना दिसत आहे. बिहार आरोग्य खात्याचे अधिकारी मुलांच्या मृत्यूचे कारण हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर कमी होणे) सांगत होते पण नंतर हे मृत्यू मेंदूज्वराने झाल्याचे त्यांनी मान्य केले.

मृत मुलांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी ४ लाख

मेंदूज्वराच्या साथीची लागण झालेल्या मुलांच्या पालकांनी त्वरित रुग्णालयात पोहचावे यासाठी बिहार सरकारने ४०० रुपयाचा वाहन भत्ता देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयेही सरकार देणार आहे. मेंदूज्वराची लागण झालेल्या मुलांच्या वेळेत उपचार मिळत नसल्याने मृतांची संख्या वाढली, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील बेडची संख्याही वाढवण्याचे आदेश दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0