मोदींच्या ‘राजकीय’ टिप्पणींमुळे रामकृष्ण मिशन नाराज

मोदींच्या ‘राजकीय’ टिप्पणींमुळे रामकृष्ण मिशन नाराज

मिशनने आपण ‘पूर्णपणे अराजकीय संस्था’ असल्याचे सांगत पंतप्रधानांच्या विधानांशी आपला संबंध नसल्याचे सूचित केले आहे तसेच तिथे सर्व धर्मांचे भिक्षू राहत असल्याचेही म्हटले आहे.

‘एनआरसी’सारखी ट्रम्प यांची योजना रद्द
नागरीकत्व आणि निर्वासित
नागरिकत्व कायदा राबवणारच – गृहमंत्री

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयात, बेलूर मठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राजकीय विधानांबाबत मिशनच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बेलूर मठामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मिशनने घेतलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. त्या वेळी सरकार वादग्रस्त नागरिकत्व (सुधारणा) कायदा मागे घेणार नाही असे विधान त्यांनी केले होते. बातम्यांनुसार त्यांनी या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर ते राजकीय डावपेच खेळत असल्याचे आणि तरुणांमध्ये चुकीच्या कल्पनारुजवत असल्याचे आरोप केले.

त्या कायद्यामध्ये काय आहे? तो का गरजेचा आहे? तरुणांना असे अनेक प्रश्न पडतात आणि अनेक लोक त्यात तेल ओततात. अनेक तरुणांना जाणीव आहे. मात्र काहीजण चुकीच्या कल्पनांना, अफवांना बळी पडतात. त्यांना समजावणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

साधू नाराज

रविवारी मोदींनी केलेल्या भाषणाचे स्वरूप राजकीय असल्यामुळे मिशनचे काही सदस्य नाराज असल्याचेद हिंदूच्या बातमीत म्हटले आहे. मिशनचे एक सदस्य गौतम रॉय म्हणाले, एक अराजकीय संस्था असलेल्या रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून वादग्रस्त राजकीय संदेश दिले जाताना पाहणे दुःखदायी आहे.

मी इथे दोन गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. एक म्हणजे रामकृष्ण मिशनमध्ये दीक्षादानाचा मोठा विधी असतो. मोदींचा अधिकृतपणे दीक्षादानाचा विधी झालेला नाही. आणि दुसरे त्यांना इथे येऊन कोणतेही राजकीय स्वरुपाचे विधान करण्याचा अधिकार नाही. माझे निरीक्षण असे आहे की गेल्या काही वर्षांमध्ये रामकृष्ण मिशनचे मोठ्या प्रमाणात राजकीयीकरण होत आहे. याचे कारण पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या काही वरिष्ठ साधूंना मोठ्या प्रमाणात सामील करून घेतले जात आहे व उच्चपदी बढती मिळत आहे. मोदींची ही भेट म्हणजे रामकृष्ण मिशनमधील या वाढत्या प्रचलनाचाच एक भाग आहे, असेही ते म्हटल्याचे उद्धृत करण्यात आले आहे.

मिशनच्या काही शिष्यांनी पंतप्रधानांची बेलूर मठाची भेट रद्द केली जावे असे आवाहन करणारे पत्र मठाला लिहिले होते. द हिंदूच्या बातमीनुसार या पत्रामध्ये मोदींवर हिंसाचाराचा आरोप करण्यात आला आहे, आणि रामकृष्ण, शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या या जागी लोकांना संकटात टाकणाऱ्या व्यक्तीला बोलावले जाऊ नये असेही पत्रात लिहिण्यात आले आहे.

पूर्णपणे अराजकीय संस्था, अशा क्षणिक आवाहनांना प्रतिसाद नाही

दरम्यान, रामकृष्ण मठ आणि मिशन यांनी आपण पूर्णपणे अराजकीय संस्था असून अशा क्षणिक आवाहनांना प्रतिसाद देत नसल्याचे सांगत पंतप्रधानांच्या सीएएबद्दलच्या टिप्पणीशी आपला संबंध नसल्याचे सूचित केले.

एका वार्ताहर परिषदेला संबोधित करताना मिशनचे सर्वसाधारण सचिव स्वामी सुविरनानंद म्हणाले, संस्था पंतप्रधानांच्या सीएएवरील भाषणावर टिप्पणी करणार नाही. आम्ही पूर्णपणे अराजकीय संस्था आहोत. अनंताच्या हाकेला ओ देत आम्ही आमचे घरदार सोडून इथे आलो आहोत. अशा क्षणिक आवाहनांना आम्ही प्रतिसाद देत नाही.

ते म्हणाले मोदी पाहुणे होते आणि मठामध्ये ते जे काही बोलले त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची आहे.

पण अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्यांच्याशी सौजन्याने वागणे तुमचे कर्तव्य आहे. पण एखाद्या पाहुण्याने असे काही विधान केले असेल, जे करायला नको होते, तर त्याची जबाबदारी पूर्णपणे त्याची आहे, यजमानांची नाही, असे ते म्हणाले.

सीएए बद्दलचे मोदींचे भाषण हे मिशनचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न होता का या प्रश्नावर स्वामी सुविरनानंद म्हणाले, आम्ही अगोदरच भगवेच आहोत, परंतु आज राजकारणामध्ये त्याचा जो अर्थ आहे त्या प्रकारचे नाही.

ते म्हणाले, मिशनचा सर्वसमावेशकतेवर विश्वास आहे आणि आमच्याकडचे साधू मतदान करत नाहीत.

आम्ही सर्वसमावेशक संस्था आहोत आणि आमची एकमेव अशी संस्था आहे जिथे हिंदू पंथातील साधू असतात तसे मुस्लिमसुद्धा..इराण आणि इराकमधील मुस्लिम. आमची एकमेव अशी संस्था आहे जिथे हजारो ख्रिश्चन साधू आहेत, बौद्ध आहेत. आम्ही सगळे बंधुभावाने राहतो. एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या भावांपेक्षाही अधिक बंधुभावाने राहतो.. आणखी किती सर्वसमावेशकता हवी?” ते म्हणाले.

(पीटीआयच्या बातमीवरून)

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0