मोदीजींसारख्या सर्वज्ञाने लाल रंगाची खिल्ली उडवावी?

मोदीजींसारख्या सर्वज्ञाने लाल रंगाची खिल्ली उडवावी?

लाल रंगाची चिंधी बघून बैल का अडतो याचे आकलन मला तरी होऊ शकलेले नाही पण त्याची चर्चा आपल्याला येथे करायची नाही. कदाचित बैलाच्या स्वत:च्या अंगातील ता

निवडणूक पालिकेची, प्रचारात राष्ट्रीय नेते!
भाजपवर निवडणूक आयोग मेहेरबान
लोक आपला कौल मागे घेतात तेव्हा

लाल रंगाची चिंधी बघून बैल का अडतो याचे आकलन मला तरी होऊ शकलेले नाही पण त्याची चर्चा आपल्याला येथे करायची नाही.

कदाचित बैलाच्या स्वत:च्या अंगातील ताकदीचे प्रतिबिंब त्याला लाल रंगात दिसत असावे.

तरी आपण बैलाचा विषय बाजूलाच ठेवू.

शेवटी बैलाशी संभाषण वगैरे शक्य तरी आहे का? म्हणूनच मानवाच्या आकलनापलीकडे असलेल्या, बैलाच्या इच्छाआकांक्षांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.

आपल्यापुढे जो प्रश्न आहे त्याचा संबंध बैलाशी नाहीच. त्याचा संबंध आहे तो समाजवादी पक्षाच्या लाल टोपीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इशाऱ्याशी आहे.

शेवटी विज्ञान, धर्म, संस्कृती आणि राजकारणाच्या तात्त्विक सुक्ष्मतांमध्ये खोलवर बुडी मारायची तर, मानवी प्रतीके आणि प्रतिमांमध्ये लाल रंगाचे स्थान कसे अढळ आहे हे तर मोदींसारख्या व्यक्तीने समजून घेतलेच पाहिजे.

विज्ञान

मोदी यांचे विज्ञानावर किती प्रेम आहे हे सगळ्यांना माहीत असेलच असे नाही पण तंत्रज्ञानाशी संबंधित कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद बघण्याची संधी आपल्याला वारंवार मिळते. भारतामध्ये किंवा व्यापक मानवी विश्वामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास ते सदैव उत्सुक असतात.

तेव्हा आता आपण मानवी जीवशास्त्राचे तंत्रज्ञान विचारात घेऊ: देवाने रक्तासाठी लालच रंग का निवडला असेल? बघा हं, हिरवा, पांढरा किंवा भगवा असा कोणताही रंग रक्तासाठी न निवडता केवळ लालच का?

आपल्या शरीरातील सर्व भागांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम रक्त करते हे तथ्य लक्षात घेतले तर, लाल रंगाच्या या रहस्यामागे निर्मितीचे दैवी तत्त्व आहे हेही लक्षात येईल. मोदी यांच्यासारख्या अध्यात्मिक व्यक्तीने यावर आवश्यक त्या चौकसपणे विचार केला पाहिजे.

शहिदांचे आणि शूरांचे जे रक्त वाहते, ते लालच असते. आता या नाकारता न येण्याजोग्या सत्याचा आदर राष्ट्रवादी व्यक्तींनी तरी राखलाच पाहिजे.

धर्म

सध्यापुरते बाकी धर्म बाजूला ठेवू पण शक्तीची उपासना करण्याच्या संस्कारात वाढलेला एक काश्मिरी हिंदू म्हणून मला, कालीच्या मूर्तीला नेसवल्या जाणाऱ्या वस्त्राचा रंग म्हणून लाल रंग माहीत आहे. काली म्हणजे देशद्रोही महिषासुराचा वध करणारी शक्तिशाली देवता.

जरा आठवून बघा, नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी कालीदेवतेचे भक्त उपवर मुलींना जमवतात, त्यांच्या डोक्यावर लाल वस्त्र पांघरतात आणि या मुली म्हणजे काली, दुर्गा व देवीच्या आणखी सात अवतारांच्या प्रतिनिधी असे समजून त्यांच्यापुढे मंत्रपठण करतात.

सगळे हिंदू ज्या बजरंगबली हनुमानाची भगवान श्रीरामाचा आद्य भक्त म्हणून उपासना करतात, त्याला विसरून कसे चालेल? हनुमानाच्या वस्त्रांचा रंगही लालच असतो.

तथाकथित द्विजांसाठी अर्थात ब्राह्मणांसाठी लाल कुंकू किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

सनातनधर्माच्या या प्रतिमाशास्त्राकडे पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या हिंदूहृदयसम्राटाचे दुर्लक्ष झाले असेल असे शक्य तरी आहे का?

प्रिय व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा पवित्र गंगेत सोडताना ज्या पात्रात ठेवली जाते, त्या पात्राचे तोंडही लाल वस्त्रानेच तर बांधले जाते. लाल रंगाला वंदन करण्याची याहून चांगली पद्धत असू शकेल का?

संस्कृती

संस्कृतीचा विचार तर मोदीजी खोलवर करू शकतात: ते जेव्हा-जेव्हा एखाद्या सार्वजनिक समारंभाला उपस्थित राहतात, मग तो कार्यक्रम देशात असो किंवा परदेशात, त्यांना चालण्यासाठी रेड कार्पेट अंथरले जाते. कार्पेट रेडच असते, हिरवे किंवा भगवे का नसते? कारण मोदीजींसारख्या व्यक्तीच्या राजेशाही थाटाला केवळ लाल व लाल रंगच शोभून दिसतो, दुसरा कोणताही नाही. “रेड-कार्पेट रिसेप्शन” हा वाक्प्रचार कोठून बरे आला असेल?

राजकारण

जगाच्या पाठीवरील कोणत्याही राष्ट्रातीलबिनीच्या शिलेदारांनी केशरी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला असे ऐकले आहे का कधी? म्हणजे या क्रांतींच्या आठवणी आणि परिणाम दोन्ही विटून गेले आहेत ही बाब वेगळी.

जेव्हा पूर्णवेळ क्रांतीचा विचार केला जातो तेव्हा फक्त लाल रंगच डोळ्यापुढे येतो. या लाल क्रांतीने मानवाच्या परिस्थितीत फार मोठा बदल घडवून आणला नसेल किंवा आपण त्यांची खिल्ली उडवली असेल किंवा त्यांचे महत्त्व कमी लेखले असेल, ती गोष्ट वेगळी. मात्र, क्रांती म्हटले की डोळ्यापुढे येतो तो रंग नेहमीच लालच असतो.

तात्पर्य काय? उत्क्रांत मानवप्राण्याच्या नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय आयुष्यांतून सर्वव्यापी लाल रंग वजा करणे खूपच कठीण आहे.

आता समाजवादी पार्टीने टोपीसाठी लाल रंग निवडला त्यामागे एवढा विचार केला होता की नाही हे आपल्याला माहीत नाही. मात्र, कदाचित त्यांच्याही अजाणतेपणी त्यांनी लाल रंगाची निवड करून, मानवी सर्जनशीलतेच्या सर्व अभिव्यक्तींना, आवाहन केले आहे हे आपल्याला दिसत आहे.

समाजवादी पक्षाच्या लाल टोप्या हा उत्तरप्रदेशासाठी रेड अॅलर्ट अर्थात धोक्याचा इशारा आहे असे विधान मोदी यांनी लाखोंच्या उपस्थितीत केले, तेव्हाच्या त्यांच्या अस्वस्थतेला मत्सराचा स्पर्शही असू शकतो. प्रतिकात्मक सरंजामशाही पोशाखाच्या मोजक्या रंगछटांना चिकटून राहिल्यामुळे ज्यांचा रंगाचा अभ्यासच आक्रसलेला आहे, ते लाल रंगाच्या शक्तीपुढे निष्प्रभ ठरतात की काय, अशी भीती तर मोदींच्या या विधानातून जाणवत नाही?

लाल रंगात खरे तर भीतीदायक असे काहीच नाही. मात्र, जेव्हा हा रंग पूर्ण भरात येतो, तेव्हा आधीच विटत चाललेल्या भित्र्यांचा थरकाप उडवूूून देऊ शकतो यात वादच नाही.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: