पहलू खान प्रकरण : पोलिसांचा असंवेदनशील तपास

पहलू खान प्रकरण : पोलिसांचा असंवेदनशील तपास

जयपूर : राजस्थानातील पहलू खान प्रकरण राजस्थान पोलिसांच्या सीआयडी-सीबीकडे गेल्यानंतर या प्रकरणातील सत्य दडपण्याचे प्रयत्न झाले. हे आता स्पष्ट दिसू लागल

ईडीकडून चिदंबरम यांना अटक
अन्यथा भाजपचा राजीनामा देईन – चंद्र कुमार बोस
सुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन, मराठी चित्रपटसृष्टी थंड

जयपूर : राजस्थानातील पहलू खान प्रकरण राजस्थान पोलिसांच्या सीआयडी-सीबीकडे गेल्यानंतर या प्रकरणातील सत्य दडपण्याचे प्रयत्न झाले. हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. गेल्या आठवड्यात अलवार जिल्हा न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला आणि सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झाले, त्याने देशभर खळबळ माजली.

न्यायालयासमोर तपास यंत्रणांकडून जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यात हा तपास कमकुवत करण्यासाठी राजस्थान सीआयडी-सीबीने कळीची भूमिका कशी बजावली हे दिसून आले. अतिरिक्त पोलिस अधिक्षक रामस्वरुप शर्मा यांच्या प्रतिज्ञापत्रात पहलू खान यांनी मृत्यूपूर्व जबाबात ओम प्रकाश, हुकूम चांद, नवीन शर्मा, सुधीर यादव, राहुल सैनी व जगमल यादव या आरोपींची नावे घेतली आणि या सर्वांवर आरोपपत्र दाखल करण्याएवढा पुरावा होता असे म्हटले आहे. त्यानंतर तपास पूर्ण होऊन ओम प्रकाश, हुकूम चांद, नवीन शर्मा, सुधीर यादव, राहुल सैनी व जगमल यादव यांच्यावर पुराव्यावर आधारित भारतीय दंडसंहितेतील १४७, ३४१, ३२३, ४२७, ३०८, ३७९, व ३०२ कलमे लावण्यात आली होती.

या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात घटनास्थळी जमा असलेल्या १५ जणांची साक्ष घेण्यात आली होती. त्यानुसार पहलू खान यांना मारहाण करणाऱ्या  आणखी ९ आरोपींची नावे पोलिसांना मिळाली. यामध्ये विपीन यादव, रवींद्र कुमार, कालूराम, दयानंद, योगेश कुमार, भीम सिंग राठी, दीपक नीरज व पवन यांच्या समावेश होता. यात दोन आरोपी अल्पवयीन होते.

रामस्वरुप शर्मा यांच्याकडे हे प्रकरण ११ मे २०१७ रोजी आले. पण त्या अगोदर विपीन यादव, रवींद्र कुमार, कालूराम, दयानंद, योगेश कुमार, भीम सिंग राठी, दीपक नीरज (अल्पवयीन) व पवन (अल्पवयीन) यांना अटक करण्यात आली होती पण त्यांना सीआयडीकडे सोपवण्यात आले नव्हते.

शर्मा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेकडोंचा तपास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर हे प्रकरण जयपूर पोलिस प्रभारी क्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांकडे सोपवण्यात आले.

हे प्रकरण सीआयडी-सीबीकडे देण्याअगोदर १५ आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळाले होते व काहींना अटकही करण्यात आली होती. पण पहलू खान यांनी जी सहा आरोपींची नावे घेतली होती ते सर्व आरोपी फरार होते.

एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण सीआयडी-सीबीकडे जाण्याअगोदर भाजपच्या एका नेत्याने या प्रकरणासंदर्भात जयपूर पोलिस मुख्यालयात बैठक घेतली होती.

नंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा सीआयडी-सीबीकडे हे प्रकरण गेले तेव्हा त्यांनी सहा मुख्य आरोपींना सोडून दिले, असे प्रतिज्ञापत्र गोरक्षक केंद्रावरच्या एका कर्मचाऱ्याने न्यायालयाला सोपवले होते. या गोरक्षक केंद्राच्या नजीकच पहलू खानवर झुंडशाहीने हल्ला केला होता.

त्यानंतर राजस्थान पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक (गुन्हे) पंकज सिंग यांनी ‘द वायर’ला सांगितले होते की, त्या सहा आरोपींविरोधात पोलिसांना कोणतेही पुरावे सापडलेले नसल्याने पहलू खान यांची हत्या हा कटाचा भाग नाही, हे स्पष्ट होत आहे. पहलू खान हे हरयाणातून आले होते, त्यांना राजस्थानात मारहाण झाल्यानंतर गावातील सहा आरोपींची नावे त्यांना कशी माहिती असतील, असा प्रश्न उपस्थित करत त्या सहा फरारी संशयितांशी संपर्क साधला असून त्यानंतर आम्ही हा खुलासा केल्याचे पंकज सिंग यांनी सांगितले होते.

काही पोलिस अधिकारी रामस्वरुप शर्मा यांच्या निष्कर्षाला विरोध करतात. त्यापैकी एकाही पोलिस अधिकाऱ्याने सहा आरोपींची नावेही घेतली नाहीत. काहींच्या मते अजून तपास सुरू आहे तर काहींनी घटनास्थळी हे आरोपी असल्याचे सकृतदर्शनी दिसत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

पहलू खान यांची हत्या झाल्यानंतर सहा दिवसांनी ७ एप्रिल २०१७ रोजी हे प्रकरण पोलिस उपायुक्त परमल सिंग यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांनी आपल्या तपासात दयानंद व योगेश कुमार यांना अटक केली. नंतर नीरज व पवन या दोघा अल्पवयीन आरोपींना बालसुधार न्यायालयाकडे सोपवले होते.

या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडी सीबीमधील आणखी एक अतिरिक्त पोलिस अधिक्षक गोविंद धेएथा यांनी रामस्वरुप शर्मा यांचे दावे फेटाळून लावत पहलू खान यांनी सांगितलेली व फिर्यादीत नमूद केलेल्या सहा आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असून त्यांनी केलेल्या दूरध्वनीची व त्यांच्या ठिकाणाची माहिती तपासली असता हे सहा जण घटनास्थळी उपस्थित नव्हते तर ते गोशाळेजवळ असल्याचे सांगितले होते.

मात्र गोविंद धेएथा यांनी सादर केलेल्या आरोपपत्रात विपीन यादव, रवींद्र कुमार, कालूराम, दयानंद, नीरज कुमार, योगेश कुमार, पवन कुमार व भीम यांची नावे होते.

या प्रकरणाचा तपास करणारे आणखी एक पोलिस अधिकारी महावीर सिंग शेखावत यांनी भीम राठी व दीपक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दीपक याला पोलिस निरीक्षक दामोदर यांनी ३ जानेवारी २०१८ रोजी अटक केली होती. व त्याची रवानगी बालन्यायालयात केली गेली होते. त्यांनंतर ५ जानेवारी २०१८रोजी भीम राठी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले.

शेखावत यांचे प्रतिज्ञापत्र वगळता दीपक हा अल्पवयीन असल्याचे एकाही आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले नाही. सध्या दीपक फरार आहे.

न्यायालयात पुरावेच सादर नाहीत

गेल्या बुधवारी जेव्हा सर्व आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले त्यावेळी न्यायालयाने पहलू खान यांच्या हत्याचे पुरावे असलेले व्हिडिओ व छायाचित्रे पोलिसांनी सादरच केले नाहीत, असे स्पष्ट केले. त्याने या प्रकरणात पोलिस किती गंभीर आहेत हा प्रश्न उपस्थित होतो.

या प्रकरणाच्या निकाल देताना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सरिता स्वामी यांनी या प्रकरणातील आरोपींवर मोबाइल फोन व मोबाइलवरचे फोटो यांच्या आधारावर आरोप लावण्यात आले होते. पण या प्रकरणाचा पहिला तपास करणारे पोलिस निरीक्षक रमेश सिनसिनवार यांनी मोबाइल व्हिडिओ व त्यातील छायाचित्रे यांचे उल्लेख आरोपपत्रात केले नाहीत, त्याचबरोबर त्यांनी मोबाइलही जप्त केले नाहीत, असे म्हटले. सिनसिनवार यांना त्यांच्या एका खबऱ्याकडून मोबाइल व्हिडिओफित मिळाली होती पण त्यांनी ती व्हिडिओफित तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली नाही, असे न्यायालयात सांगितले. सिनसिनवार यांना आरोपींचे कॉल रेकॉर्डस हवे होते पण ते त्यांना नोडल अधिकाऱ्यांकडून मिळाले नाहीत, हेही सांगितले.

पोलिसांच्या एकूण तपासावरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता केली.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0