पोलिसांचा निष्कर्ष मान्य नाही – तनुश्री दत्ता

पोलिसांचा निष्कर्ष मान्य नाही – तनुश्री दत्ता

दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ नावाच्या चित्रपटासाठी एक गाणे चित्रित करत असताना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केले होते असा आरोप तनुश्री दत्ता अभिनेत्रीने केला होता.

एम.जे.अकबरांच्या नियुक्तीला पत्रकारांचा विरोध
तानसेन महोत्सवातून अखिलेश गुंदेचांचे नाव वगळले
प्रिया रामाणी, सीता आणि अहिल्या

मागच्या वर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी बॉलिवुडमधील अभिनेता नाना पाटेकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी “बी रिपोर्ट” दाखल केला. याचा अर्थ त्यांना पाटेकर यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी पुरेसा पुरावा मिळाला नाही.

या बातमीवर प्रतिक्रिया देताना, दत्ता यांनी टीका केली, की त्यांच्या बाजूच्या सर्व साक्षीदारांची निवेदने नोंदवली नसूनही पोलिसांनी आपला निष्कर्ष अहवाल सादर केला. त्यांच्या बाजूच्या साक्षीदारांना धमक्या देऊन गप्प बसवले आहे आणि ‘खोटे साक्षीदार’ उभे केले गेले आहेत असाही आरोप त्यांनी केला.“या विकृत लोकांना सोशल मीडियामधून आणि इतर व्यासपीठांवर उघडे पाडत राहिले पाहिजे म्हणजे भविष्यात एखाद्या निष्पाप तरुण मुलीला त्रास देण्यापूर्वी लोक दोनदा विचार करतील. पण अजूनही मला वाटते की मला न्याय मिळेल आणि माझाच विजय होईल! कसे…ते काळच सांगेल,” त्या म्हणाल्या.

तनुश्री दत्ता यांनी सार्वजनिकरित्या पाटेकरांच्या तथाकथित गैरवर्तनाला वाचा फोडली होती, आणि पुन्हा ऑक्टोबर २०१८ मध्ये २००८ साली चित्रपट हॉर्न ओके प्लीज च्या सेटवर पाटेकरांनी आपल्याबरोबर गैरवर्तन केले होते असे सांगून त्याच आरोपांची पुनरावृत्ती केली होती. अभिनेते सुनील शेट्टी यांना या घटनेची माहिती होती असा दावाही त्यांनी केला होता. मात्र त्या दिवशी सेटवर असलेल्या इतरांनी आपण सेटवर होतो परंतु आपल्याला या घटनेची माहिती नाही असे सांगितले होते.

या प्रकरणी सार्वजनिकरित्या बोलण्याच्या दत्ता यांच्या निर्णयामुळे माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात बोलले गेले. त्यानंतर भारतभरातल्या शेकडो महिलांनी त्यांना सामोरे जावे लागलेल्या लैंगिक छळवणुकीबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यास सुरुवात केली आणि पुढचे अनेक महिने हा उद्रेक चालू राहिला. बॉलिवुडमध्ये विन्ता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला. या जानेवारी महिन्यामध्ये मुंबई येथे आलोक नाथ यांना जामीन मिळाला.

बॉलिवुडमध्ये अशा प्रकारच्या लैंगिक गैरवर्तनाबाबत साजिद खान, सुभाष घई, राजकुमार हिरानी, अन्नू मलिक आणि रजत कपूर यांच्यावर आरोप केले गेले. रजत कपूर यांनी समाज माध्यमांमध्ये त्याबाबत माफीही मागितली.

पाटेकर यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांमध्ये त्यांना मिळालेल्या या ‘क्लीन चिट’ बद्दल आनंद व्यक्त केला असला तरी वकिलांच्या मते पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पुरावा मिळत नसल्यामुळे प्रकरण बंद करणे आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायाधीशांनी हा निष्कर्ष काढणे या दोन्हींमध्ये मोठे अंतर असते. जेव्हा पोलिस पुरावा मिळत नाही म्हणतात तेव्हा एकतर पुरावा अस्तित्वातच नाही किंवा पुरावा असूनही तपास नीट केला गेला नाही किंवा तपास करणे कठीण आहे आणि त्यामुळे पोलिसांना पुराव्यांनिशी खटला उभा करता आला नाही असे दोन्ही अर्थ असू शकतात.

दत्ता यांच्या वकिलांच्या मते पोलिसांनी पुरेसे कष्ट घेतले नाहीत. त्यांनी टाईम्सनाऊला सांगितले की ते या निष्कर्ष अहवालाला (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात आव्हान देणार आहेत.

मूळ लेख येथे वाचावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0