भाजपचे काही कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार पराभूत

भाजपचे काही कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार पराभूत

नवी दिल्लीः नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकात भाजपला मिळालेले यश नैतिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे नेते सांगत असले तरी

‘बिहार मे भाजपा बा…’
शाह फैजल यांना अटक, काश्मीरमध्ये नजरकैद
’तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण

नवी दिल्लीः नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकात भाजपला मिळालेले यश नैतिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे नेते सांगत असले तरी उत्तर प्रदेशात कट्टर हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांना मतदारांनी पराभूत केले आहे. या उदाहरणांवरून केवळ सत्ताधारी भाजप सरकारविरोधातला संताप नव्हता तर कट्टर हिंदुत्वाच्या सततच्या प्रचाराला मतदारांनी दुर्लक्ष केले असेही म्हणता येते.

उदाहरण द्यायचे झाल्यास मुझफ्फरनगर दंगलीतील प्रमुख आरोपी असलेले भाजपचे आमदार संगीत सोम व सुरेश राणा या दोघांना आपल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. यातील सुरेश राणा हे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री होती व ते शामली जिल्ह्यातील थाना भवान येथून निवडणूक लढवत होते. दुसरीकडे संगीत सोम हे भाजपचे कट्टरवादी नेते समजले जातात. त्यांना समाजवादी पक्षाचे उमेदवार अतुल प्रधान यांनी सारढाणा मतदारसंघात पराभूत केले.

२०१३मध्ये मुझफ्फरनगर दंगलीतील सहभागाबद्दल सोम व राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दोघे २०१७मध्ये विधानसभा निवडणुकांत पुन्हा विजयी झाले होते.

त्याच बरोबर बुलढाणा येथे राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार राजपाल सिंग बलियान यांनी भाजपचे उमेदवार उमेश मलिक यांचा पराभव केला. हे मलिक मुझफ्फरनगर दंगलीतील एक आरोपी आहेत. त्यांचा ८,४४४ मतांनी पराभव झाला.

पूर्वांचल भागातून हिंदू युवा वाहिनीचे नेते व आदित्यनाथ यांचे निकटचे समजले जाणारे राघवेंद्र सिंग यांनाही पराभव पत्करावा लागला. या राघवेंद्र सिंग यांनी निवडणूक प्रचारात जे हिंदू मतदार विरोधी पक्षांना मत देतील त्यांच्या धमन्यांमध्ये मुस्लिमांचे रक्त वाहत असल्याचा विखारी प्रचार केला होता. गेल्या १२ फेब्रुवारी रोजी धुमारियागन मतदारसंघात केलेल्य प्रचारात राघवेंद्र सिंग यांनी, मला पुन्हा आमदार केल्यास मुस्लिम त्यांची टोपी घालणार नाहीत तर ते आपल्या कपाळावर नाम ओढतील, असे वक्तव्य केले होते. मतदारांनी जय श्रीराम की वालेकुम सलाम, यातील निवड करायची आहे, असेही ते म्हणाले होते.

राघवेंद्र सिंग यांच्या अशा विखारी, विषारी प्रचाराच्या अनेक व्हीडिओ क्लिप सोशल मीडियात पसरल्या होत्या. राघवेंद्र सिंग यांच्याकडून मुस्लिमांना धमक्याही दिल्या जात होत्या. दहशतवादाचा इस्लामशी असलेला संबंध ते सतत प्रचारात सांगत होते. मुस्लिमांनी हिंदू महिलांकडे सहज जरी पाहिल्यास त्यांना पाकिस्तानात पाठवले जाईल, मुस्लिमांनी हिंदूंचा अपमान केल्यास त्यांना मारले जाईल, अशाही धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात होत्या.

आदित्य नाथ सरकारमधील विधीमंडळ कामकाज मंत्री व भाजपचे आणखी एक महत्त्वाचे नेते आनंद स्वरुप शुक्ला यांनाही बलिया नगर मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. शुक्ला हे मुस्लिमविरोधी वक्तव्ये करण्यात नेहमी पुढे असायचे. त्यांनी अजान विरोधात कारवाई करावी अशीही मागणी केली होती. मुस्लिमांनी राम व शंकराला आपला पूर्वज देव मानावा व हिंदू संस्कृतीचा स्वीकार करावा अशीही त्यांनी मागणी केली होती. तबलगी जमातच्या सदस्यांना त्यांनी मानवी बॉम्ब असेही म्हटले होते.

या नंतर उ. प्रदेशच्या राजकारणातील भाजपचे एक महत्त्वाचे नेते समजले जाणारे पण निवडणुका जवळ आल्यावर भाजपला सोडचिठ्ठी देणारे केशव प्रसाद मौर्य यांनाही पराभवाचा फटका बसला. केशव प्रसाद मौर्य यांनी मथुरा येथील मशिदीत जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी अटकाव केला होता. मथुरेत घुसण्याची आता तयारी सुरू करा अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. मुस्लिमांच्या टोपीची तुलना त्यांनी हिंसेशी केली होती आणि हरिद्वार येथे मुस्लिमांचे हत्याकांड करावे असे विधान बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0