माफी मागणार नाही; भूषण निर्णयावर ठाम

माफी मागणार नाही; भूषण निर्णयावर ठाम

नवी दिल्लीः दोन ट्विटमुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणातील दोषी व जेष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी माफी मागण्याची सर्वोच्च न्यायालयाची विनं

कार्टूनिस्टवर बेअदबीची कारवाई करण्यास संमती
‘न्यायाधीशांच्या विधानांमुळे जनतेचा विश्वास उडतोय’
‘मला माफी नकोय, कोणतीही शिक्षा द्या’

नवी दिल्लीः दोन ट्विटमुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणातील दोषी व जेष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी माफी मागण्याची सर्वोच्च न्यायालयाची विनंती फेटाळली आहे. सोमवारी त्यांनी तसा न्यायालयात आपला जबाब दाखल केला असून सर्वोच्च न्यायालयावर त्यांनी केलेली विधाने योग्य रचनात्मक टीका होती, त्यात सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता असे पुन्हा स्पष्ट केले आहे.

घटनेने नेमून दिलेली जबाबदारी न्यायालये योग्यरित्या पाळत नसतील तर त्याविरोधात आवाज उठवणे हे न्यायव्यवस्थेतील एक कर्मचारी म्हणून आपले कर्तव्य आहे. आपली टीका रचनात्मक स्वरुपाची होती, त्यात राज्यघटनेचे संरक्षण व नागरिकांच्या हक्कांचा मुद्दा होता. ही विधाने पूर्ण शुद्धीवर असताना केली होती व त्यात सत्य होते पण न्यायालयाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आता अशा परिस्थितीत मी ही विधाने मागे घेतल्यास किंवा माफी मागितल्यास हा माझ्या अंतरात्म्याचा व न्यायसंस्थेविषयीचा अवमान ठरेल, असे भूषण म्हणाले.

गेल्या आठवड्यात २० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय भूषण यांना शिक्षा सुनावणार होते. पण या प्रकरणात त्यादिवशी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांनी दोन-तीन दिवस आपल्या आरोपांवर विचार करावा व ते मागे घ्यावेत असे सांगितले. यावर भूषण यांनी आपण न्यायालयाची माफी मागणार नाही असे स्पष्ट करत माझ्या प्रती न्यायालयाने कोणतीही उदारता दाखवू नये, न्यायालयाने त्यांना योग्य वाटेल ती शिक्षा सुनवावी व ती भोगण्यास आपण तयार आहे, असे ठामपणे सांगितले होते.

भूषण म्हणालेः सर्वोच्च न्यायालयाने मला शिक्षा दिल्याने वेदना झाल्या आहेत. जे मी ट्विट केले होते ते माझ्या न्यायालयावरच्या श्रद्धेवर असलेले मतस्वातंत्र्य असून सदृढ लोकशाहीत टीका-प्रतिटीका होत असते. वादविवाद हा लोकशाहीचा गाभा आहे. गेली तीन दशकाहून अधिक काळ मी न्यायालयाचा आदर व त्याची प्रतिष्ठा राखणारे कर्तव्य करत आलो आहे. दरबारात भाटगिरी करतात तसे केले नाही. न्यायव्यवस्थेचा एक विनम्र रक्षक म्हणून काम करत आलो आहे. त्यामुळे मला शिक्षा दिल्याचे दुःख नाही तर माझ्या भावना समजण्यात गल्लत झाली आहे, असे मला वाटते. मी ट्विटमधून केलेले आरोप हे न्यायालयाला अवमानकारक, दुर्दैवी व सुनियोजित हल्ला वाटत आहेत पण याला पुरावा कुठे आहे? न्यायालयाने कशाच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे? जे दोन ट्विट मी केले आहेत ती माझी अभिव्यक्ती व माझे स्वतंत्र विचार आहेत. ते व्यक्त करण्यासाठी मला या लोकशाहीत परवानगी दिली पाहिजे.

माझे ट्विट या गणराज्याच्या इतिहासातील एका वळणावर व्यक्त झाले आहेत जे माझ्या जबाबदारीच्या जाणीवेतून व्यक्त झालेला एक अल्पसा प्रयत्न आहे. हे ट्विट विचारपूर्वक केले आहेत. त्यासाठी मी माफी मागितली तर ते निष्ठाहीन व अवमान केल्यासारखे होईल. त्यामुळे मी विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की म. गांधींनी त्यांच्या विरोधात एका खटल्यात म्हटले होतेः मी माफी मागणार नाही व माझ्यावर उदारपणा दाखवा असेही म्हणणार नाही. न्यायालय कायद्यानुसार जो काही दंड, शिक्षा सुनावेल ती भोगण्यास मी तयार असून एक नागरिक म्हणून माझे ते सर्वोच्च कर्तव्य असेल.

सरकार भूषण यांच्यामागे

या घडामोडीत सरकारतर्फे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आश्चर्यकारकपणे प्रशांत भूषण यांची साथ दिली होती. न्यायालयाने भूषण यांना कोणतीही शिक्षा देऊ नये, असे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयातील लोकशाही अपयशी ठरल्याचा जाहीर आरोप केला होता. त्याचबरोबर ९ न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात भ्रष्टाचार चालतो असे विधान केले होते. हे विधान करताना दोन न्यायाधीश प्रत्यक्ष पदावर होते. तर अन्य ७ जणांनी निवृत्त झाल्यानंतर विधान केले होते, याकडे वेणुगोपाल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते.

त्यावर न्यायाधीशांशी प्रशांत भूषण जोपर्यंत आपले विधान मागे घेत नाहीत, त्यांना आपली चूक पटत नाही तोपर्यंत ते शिक्षा सुनावण्यापासून मागे हटू शकत नाही, असे सांगितले होते.

आता यावर भूषण यांना शिक्षा एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: