बिहारमध्ये रेल्वे परीक्षा उमेदवारांचे आंदोलन चिघळले

बिहारमध्ये रेल्वे परीक्षा उमेदवारांचे आंदोलन चिघळले

पटनाः देशात एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना बिहारमध्ये मात्र शेकडो संतप्त रेल्वे परीक्षार्थींनी एका ट्रेनला आग लावली आणि अन्य एका ट्रेनवर दगडफ

‘अग्निपथ वरून बिहार पेटले
४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : बिहारमध्ये याचिका
बिहारच्या यशानंतर एमआयएमचे लक्ष्य पक्षविस्ताराकडे

पटनाः देशात एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना बिहारमध्ये मात्र शेकडो संतप्त रेल्वे परीक्षार्थींनी एका ट्रेनला आग लावली आणि अन्य एका ट्रेनवर दगडफेक केली. या हिंसाचारात मृत व जखमींबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. पण सोमवारपासून सुरू असलेले हजारो रेल्वे परीक्षार्थींचे आंदोलन चिखळले आहे. बुधवारी पटना, नवादा, मुजफ्फरपूर, सीतामढ़ी, बक्सर व भोजपूर जिल्ह्यांत हे आंदोलन पसरले दिसले. तेथे शेकडो आंदोलक उमेदवार रस्त्यावर उतरलेले दिसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिस दल अपुरे पडले. शेकडो उमेदवारांकडून रेल्वे सेवाही रोखून धरल्याने पूर्व मध्य रेल्वे सेवेतल्या २५ ट्रेन रद्द कराव्या लागल्या. जहानाबाद येथे आंदोलकांना हुसकावण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

रेल्वे बोर्डाच्या एनटीपीसी सीबीटी-१ परीक्षेच्या टप्प्यात बदल केल्याने हजारो उमेदवारांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली आहेत. दरम्यान बुधवारी ट्रेनला आग लावण्याच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उमेदवारांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांनी कायदा तोडू नये, त्यांचे म्हणणे रेल्वे बोर्डाने नेमलेल्या समितीकडे पोहचवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

उमेदवारांचा आक्रोश कशामुळे आहे?

बिहारमध्ये हजारो उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत ते रेल्वे भरती बोर्डाच्या २०२१मध्ये घेतलेल्या एका परीक्षेवरून. ही परीक्षा एक नव्हे तर दोन टप्प्यात घेण्यात आल्याचे रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केल्यानंतर उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली.

रेल्वे भरती बोर्डाने पहिल्यांदा परीक्षा एकाच टप्प्यात घेणार असल्याचे जाहीर केले होते पण आता परीक्षेचे दोन टप्पे कशासाठी असा सवाल उमेदवारांचा आहे. यावर रेल्वे भरती बोर्डाने जाहिरातीमध्येच परीक्षा दोन टप्प्यात घेणार असल्याचे जाहीर केल्याचा दावा केला. पण उमेदवार रेल्वेच्या खुलाशावर समाधानी दिसत नाही. ज्या उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना दुसरा टप्पा का द्यायला लावला जात आहे, असा सवाल उमेदवारांचा आहे. पहिल्या टप्प्याचा निकाल गेल्या १५ जानेवारी रोजी जाहीर केला होता.

आरआरबी एनटीपीसीच्या ३५ हजार जागांसाठी देशभरातून सुमारे सव्वा कोटी उमेदवारांचे अर्ज आले होते. या परीक्षा श्रेणी २ ते श्रेणी ६ जागांसाठी असून मासिक वेतन १९,९०० रु. ते ३५,४०० रु. इतके आहे. या परीक्षांसाठी सुमारे ६० लाख उमेदवार पात्र झाले होते.

बिहारमध्ये सोमवारपासून हजारो उमेदवार रस्त्यावर उतरल्यानंतर रेल्वे बोर्डाने रेल्वे भरती बोर्डाने घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी रेल्वेने उच्चस्तरिय समिती नेमली असून १६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांनी आपल्या तक्रारी पाठवाव्यात असे आवाहन रेल्वे बोर्डाने केले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: