राज ठाकरेंना ईडीची नोटीस

राज ठाकरेंना ईडीची नोटीस

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आल्याने व त्यांना २२ ऑगस्टला चौकशी

हर्ष मंदेर यांच्या अनुपस्थितीत घर, कार्यालयावर ‘ईडी’चे छापे
ईडीचे गुन्हे असल्याने सिद्दिक कप्पन अजूनही तुरुंगातच
चिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आल्याने व त्यांना २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. ही नोटीस दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीनच्या विक्री संदर्भात असून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनाही त्याच प्रकरणावरून २२ ऑगस्टला राहण्याचे आदेश आले आहेत.

सोमवारी दुपारी ही नोटीस पाठवल्यानंतर मनसे पक्षाने भाजपवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत ठाणे बंदचा इशारा दिला आहे तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कोहिनूर प्रकरण २००८चे असून आम्ही त्यातून कधीच बाहेर पडलो असल्याचे सांगत सरकारचं आमच्यावर प्रेम असल्याने अशा नोटीशी येत असतात. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत अशी प्रतिक्रिया दिली.

शर्मिला ठाकरे यांनी माझा नवरा असल्या नोटिसीला घाबरणारा नाही. निवडणुका जवळ आल्याने माझ्या नवऱ्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही ईडीच्या चौकशीवेळी हजर राहू त्यांना सगळी कागदपत्रे देऊ असे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणतात, मला माहिती नाही.

दरम्यान ईडीच्या नोटीसीवरून भाजप व मनसेदरम्यान तणाव वाढला असून राज ठाकरेंना ईडीची नोटीस आलीय, या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ईडीचं काम स्वतंत्रपणे सुरू असते. आमचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यामुळे राज यांना नेमकी कशासाठी नोटीस आलीय याबद्दल मी अनभिज्ञ आहे, असे ते म्हणाले. ईडीच्या चौकशा सुरूच असतात. त्यात सूडबुद्धीचा संबंध कुठे आला? चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. ईडीला एखादं ट्रान्झॅक्शन दिसलं, तर ते चौकशीला बोलावतात. त्यात काही गैर सापडलं नाही तर सोडून देतात. पण चूक असेल तर ती भोगावीच लागेल, असे विधान त्यांनी केले.

राष्ट्रवादी मदतीला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भयंकर आहे. जो विरोधात बोलतो त्याच्याविरोधात ईडीचं, चौकशीचं हत्यार उगारलं जातं. परंतु, राज ठाकरे कुणालाच भीक घालत नाहीत आणि आम्हीही घाबरणारे नाही. ईडी-बीडी आम्ही काही मानत नाही, असे त्या म्हणाल्या.

तर प्रमुख विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आघाडी सरकारने असं राजकारण केलं असतं तर आज भाजपचा ‘भा’ पण शिल्लक ठेवला नसता अशी टीका राज्य सरकारवर केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: