राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार

राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार

नवी दिल्ली: राजस्थानमधील काँग्रेस सरकार येत्या चार-पाच महिन्यांत वैदिक शिक्षण व संस्कार बोर्डाची स्थापना करणार आहे. बोर्डाची उद्दिष्टे, लक्ष्य आणि काम

काँग्रेस-पायलट गटांत तोडगा
राजस्थानमध्ये पायलट-गेहलोत गटात समेटाचे प्रयत्न?
राजस्थानमध्ये सत्ता राखण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली: राजस्थानमधील काँग्रेस सरकार येत्या चार-पाच महिन्यांत वैदिक शिक्षण व संस्कार बोर्डाची स्थापना करणार आहे. बोर्डाची उद्दिष्टे, लक्ष्य आणि कामकाज यांबाबत आखणी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केल्यानंतर, राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंजुरी दिल्यानंतर वैदिक शिक्षण बोर्डाची स्थापना केली जाईल, असे राजस्थान सरकारमधील संस्कृत शिक्षण खात्याचे राज्यमंत्री सुभाष गर्ग यांनी सांगितले. हा बोर्ड समितीच्या शिफारशींचा आधार घेऊन वैदिक ज्ञानाशी निगडित शिक्षण प्रारूपे स्वीकारेल, असेही ते म्हणाले.

२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने असा बोर्ड स्थापन करण्याचा तसेच संस्कृत भाषेला बढावा देण्यासाठी उपाययोजना करण्याचा वायदा केला होता.

हिंदू वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, या बोर्डाचे लक्ष्य प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील ज्ञानाचे पुनरुज्जीवन करणे आणि वेदांमधील ज्ञानाचा संबंध शास्त्र व योग यांच्याशी जोडणे हे आहे.

याबाबत पुढाकार घेऊन राज्यातील काँग्रेस सरकार यापूर्वीच्या भाजप सरकारच्या तुलनेत चांगले काम करत आहे, असे संस्कृत शिक्षण राज्यमंत्रालयातील सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

विद्यार्थ्यांना वेदांवर संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे उद्दिष्ट सरकारपुढे आहे असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जानेवारी महिन्यात म्हटले होते.

राज्यात आयुर्वेद आणि संस्कृत विद्यापीठे काँग्रेसच्या कार्यकाळातच स्थापन झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

“वेदांमध्ये उत्तम प्रशासनाच्या तत्त्वांचा खजिना आहे. या तत्त्वांचा अवलंब केल्यास कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल,” असे विधान गेहलोत यांनी जयपूर येथे राष्ट्रीय युवादिनानिमित्त आयोजित समारंभात केले होते.

अन्य राज्यांमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या वैदिक अध्यापनाच्या अनेक प्रारूपांचा समितीने अभ्यास केल्याचे ‘हिंदू’च्या बातमीत म्हटले आहे.

राजस्थानात सुमारे २० निवासी वैदिक शाळा आहेत. यांमध्ये गुरूकुलांचाही समावेश आहे. या शाळांमध्ये प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे अनुसरण केले जाते. या शाळा ट्रस्टद्वारे चालवल्या जातात आणि त्या कोणत्याही नियमित अभ्यासक्रमाचे अनुसरण करत नाहीत, असेही ‘हिंदू’च्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.

जानेवारी २०१९ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाखालील एका समितीने भारतीय शिक्षा बोर्डाच्या स्थापने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. हा नवीन शिक्षण बोर्ड वैदिक कल्पनांवर आधारित आहे. त्याचे उद्दिष्ट वैदिक शिक्षणाला नियमित स्वरूप देणे हे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0