राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न

नवी दिल्लीः भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्काराचे नाव सरकारने बदलून ते ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’ असे ठेवण्याचा निर

दिवस-रात्रीही तिरंगा फडकवण्याची परवानगी
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि अहमदिया
गोव्यात ७८ टक्के, उत्तराखंडमध्ये ६० टक्के मतदान

नवी दिल्लीः भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्काराचे नाव सरकारने बदलून ते ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’ असे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहता सरकारने हे पुरस्काराचे नावच बदलण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ट्विटद्वारे घोषणा केली. देशातल्या जनतेच्या मागणीनुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाच्या कामगिरीने देशात ऊर्जा पसरली असून देशात हॉकीप्रती कुतुहल निर्माण झाले आहे. ही वेळ पुढे जाण्याचा सकारात्मक संदेश असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

५ ऑगस्टला भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करून ४१ वर्षानंतर देशाला ऑलिम्पिकमध्ये एखादे पदक मिळवून दिले आहे. या अगोदर १९८० मध्ये भारताने मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. त्यानंतरची ही सर्वोत्तम कामगिरी समजली जाते. भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत ८ सुवर्ण पदक मिळवली आहेत.

१९९१-९२मध्ये खेल रत्न पुरस्कारांची सुरूवात झाली होती. त्या पुरस्काराचा पहिला मानकरी जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद होता. त्यानंतर लिएंडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपीचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम व रानी रामपाल हे मानकरी आहे.

या पुरस्कारांतर्गत खेळाडूला २५ लाख रु.ची रोख रक्कम दिली जाते.

भारताच्या हॉकी इतिहासात ध्यानचंद हे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेलेले आहे. हॉकीचा जादूगर म्हटल्या जाणार्या ध्यानचंद यांनी १९२६ ते १९४९ या आपल्या कारकिर्दीत १९२८, १९३२, १९३६ या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. तसेच त्यांनी सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ४०० हून अधिक गोल केले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी २९ ऑगस्टला देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो.

खेल रत्न पुरस्काराशिवाय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रीडापटूंना सर्वोच्च असा ध्यानचंद पुरस्कारही दिला जातो. हा पुरस्कार २००२मध्ये वाजपेयी सरकार सत्तेत असताना सुरू करण्यात आला होता. २००२मध्ये नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमचे नाव बदलून ते ध्यानचंद नॅशनल स्टेडियम असे करण्यात आले होते.

काँग्रेसने केले स्वागत

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. पण ध्यानचंद सारख्या महान खेळाडूचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याची टीका मोदींवर करत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव किंवा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमचे नाव सरकारने बदलले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0