गृहराज्यमंत्री प्रामाणिक बांगलादेशी असल्याचा आरोप

गृहराज्यमंत्री प्रामाणिक बांगलादेशी असल्याचा आरोप

नवी दिल्लीः शैक्षणिक पात्रतेच्या सत्यतेवरून चर्चेत आलेले नवनियुक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे कुचबिहारचे लोकसभा खासदार निसिथ प्रामाणिक यांचे नाग

भारतातील सार्वजनिक चर्चाविश्वाची गळचेपी
मोदींचे उथळ भाषण व जमिनीवरील वास्तव
‘मन की बात’च्या महसूलात ९० टक्क्यांनी घसरण

नवी दिल्लीः शैक्षणिक पात्रतेच्या सत्यतेवरून चर्चेत आलेले नवनियुक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे कुचबिहारचे लोकसभा खासदार निसिथ प्रामाणिक यांचे नागरिकत्व बांगलादेशचे असून त्यांच्या नागरिकत्वाची तपासणी करायला हवी, असे पत्र काँग्रेसचे राज्यसभा सदस्य व आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रिपुन बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या पत्रात बोरा यांनी प्रामाणिक यांच्या बांगलादेशी नागरिक नसल्याची खात्री करून घ्यावी असेही नमूद केले आहे.

देशाच्या गृहखात्यात बांगलादेशी नागरिक मंत्रिपदावर असणे हे देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर बाब असून त्यांच्या सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी व्हायला हवी अशी बोरा यांनी मागणी केली आहे.

प्रामाणिक हे बांगलादेशी नागरिक असल्याचे वृत्त बराक बांग्ला, रिपब्लिक टीव्ही त्रिपुरा या वृत्तवाहिन्यांनी तसेच इंडिया टुडे, बिझनेस स्टँडर्ड या डिजिटल माध्यमांनी दिले आहे, याकडेही बोरा यांनी आपल्या पत्रात लक्ष वेधले आहे. प्रामाणिक यांचा जन्म बांगलादेशच्या गैबांधा जिल्ह्यातल्या हरिनाथपूर येथे झाला असून ते कम्प्युटर स्टडिजसाठी प. बंगालमध्ये आले होते असे बोरा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. कम्प्युटर स्टडिजमधील पदवी घेतल्यानंतर प्रामाणिक राजकारणात आले, त्यांनी पहिले तृणमूल काँग्रेसमध्ये काम केले व आता ते भाजपमध्ये असल्याचे बोरा यांनी सांगितले.

पण प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी ते भारतीय नागरिक असून त्यांचा जन्म, पालनपोषण व शिक्षण हे भारतातच झाल्याचे स्पष्ट केले आहे. प्रामाणिक हे सच्चे भारतीय आहेत, त्यांच्या मंत्रिहोण्यावरून अन्य देशात आनंद व्यक्त केला जात असेल तर त्याचा अर्थ ते दुसर्या देशाचे नागरिक होतात का, असा सवाल प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. कॅनडामधील भारतीय वंशाची एखादी व्यक्ती तेथे मंत्री झाल्यास त्याचे अभिनंदन त्यांच्या भारतातील नातेवाईंकांकडून झाल्यास त्यावर कॅनडाचा मंत्री काय करेल असा सवाल प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी उपस्थित केला.

प्रामाणिक यांच्या पदवीवरही शंका

काही दिवसांपूर्वी प्रामाणिक यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली शैक्षणिक पात्रता संसदेमध्ये सादर केलेल्या शैक्षणिक पात्रता माहितीपेक्षा वेगळी असल्याचे आढळून आले होते.

निसिथ प्रामाणिक हे कुचबिहारचे भाजपचे खासदार असून त्यांनी नुकतीच झालेली प. बंगालची विधानसभा निवडणूकही लढवली होती व ते कमी मतांनी निवडून आले होते. पण नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकी कायम ठेवली होती.

त्यांनी विधान सभेसाठी १८ मार्च २१ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व लोकसभेसाठी २५ मार्च २०१९मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता माध्यमिक शिक्षण असे नमूद केले होते.

मात्र लोकसभेच्या वेबसाइटवर त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता बॅचलर्स ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (बीसीए) अशी नोंद केलेली आढळून आली आहे. त्यांनी ही पदवी बालाकुरा ज्युनियर बेसिक स्कूल येथून मिळवली असून बीसीए हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या पदवीसाठी १२ वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

प्रामाणिक यांनी संसद व निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेली शैक्षणिक पात्रतेविषयीची विसंगत माहितीवरून तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार उदयन गुहा यांनी टीका केली होती. प्रामाणिक यांनी मार्चमध्ये माध्यमिक परीक्षा दिली होती व जुलै महिन्यात ते आपल्याकडे पदवी असल्याचे नमूद करत आहे. त्यांनी आपली उच्च माध्यमिक परीक्षा केव्हा उत्तीर्ण केली असा सवाल गुहा यांनी उपस्थित केला होता.

प्रामाणिक यांनी लोकसभेला दिलेल्या माहितीत ते ज्युनिअर स्कूलमध्ये होते असे म्हणत आहेत, पण येथे असला कोणताही कोर्स उपलब्ध नसून या शाळेमध्ये ५ वी पर्यंत शिकणारे ज्युनियर स्कूल असा उल्लेख करतात. मग येथे पदवी कुठून मिळाली असाही प्रश्न गुहा यांनी उपस्थित केला होता.

द वायरने गुहा यांच्या आरोपांची पुष्टी केलेली नाही. द वायरचा बालातुरा ज्युनियर बेसिक स्कूलच्या प्रशासनाशी संपर्क होऊ शकलेला नाही. द वायरने प्रामाणिक यांना इमेलद्वारे काही प्रश्न पाठवलेले असून त्यांची उत्तरे अद्याप आलेली नाही. ती आल्यास या वृत्तात बदल केले जातील.

कुचबिहारचे तृणमूलचे माजी खासदार पार्थ प्रतिम रॉय यांनीही प्रामाणिक यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

निशिथ प्रामाणिक हे कुचबिहारमध्ये पूर्वी तृणमूल काँग्रेसचे युथ विंगचे नेता होते. २०१८मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. नंतर ते मुकुल रॉय यांच्या सोबत भाजपमध्ये गेले. भाजपने प्रामाणिक यांना लोकसभेचे तिकिट दिले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत प्रामाणिक यांनी मोठा विजय मिळवला होता. पण नंतर भाजपने विधानसभा निवडणुकांत त्यांना दिनहाटा जागेचे तिकिट दिले. हा विजय मात्र त्यांनी निसटता मिळवला.

मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकही पक्षात परत जातील अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. पण प्रामाणिक यांनी विधानसभेत जाण्याऐवजी लोकसभेत राहणे पसंद केले व आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

२०१९च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रामाणिक यांनी आपल्यावर ११ पोलिस खटले आहेत असे नमूद केले होते. नंतर २०२१मध्ये विधानसभा निवडणुकांत त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्यावर खून, दरोडा, चोरी व स्फोटके ठेवणे अशा स्वरुपाचे १३ खटले असल्याचे नमूद केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0