आक्षेप आल्याने मतमोजणी थांबली

आक्षेप आल्याने मतमोजणी थांबली

राज्यसभेच्या सहा जागांसाठी ७ उमेदवार उभे असल्याने झालेल्या निवडणुकीच्या मतदानावर आक्षेप घेतला गेल्याने या निवडणुकीची मतमोजणी थांबली आहे.

मनुस्मृतीने महिलांना सन्मानाचे स्थान दिलेः न्यायाधीशांचे मत
आरोग्य, पायाभूत क्षेत्रावर सर्वाधिक खर्चाचा अर्थसंकल्प
गणित शिकवणे सोपे आणि इंटरेस्टिंग करूया म्हणता?

राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या ३ आमदारांच्या मतांवर भाजपने तर भाजपच्या २ मतांवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया थांबली आहे.

या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली होती. ६ जागांसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल, कॉँग्रेसतर्फे इम्रान प्रतापगढी हे उमेदवार आहेत. भाजपतर्फे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेचे सुहास कांदे, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि कॉँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आपले मतदान पक्षाच्या प्रतिनिधींच्या हातात दिल्याचा आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचा आक्षेप भाजपने घेतला. ती ३ मते बाद करावीत, अशी मागणी भाजपने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपने शिष्ठमंडळ नेऊन निवेदन दिले.

भाजपला पाठिंबा देणारे आमदार रवी राणा यांनी मतदान करताना हनुमान चालीसा दाखवल्याचा आणि भाजपचे सुधीर मुनघंटीवार यांनी मतपत्रिका पक्ष प्रतिनिधीच्या हातात दिल्याचा आक्षेप शिवसेनेने नोंदवला आहे. त्यामुळे मतमोजणी थांबली आहे.

राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीची २ मते कमी झाली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे, “राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? आधी ईडीचा डाव फसला, त्यामुळे भाजपाने आता रडीचा डाव सुरू केला आहे.”

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0