कोरोनावरच्या औषधाचा दावाच नव्हताः पतंजली

कोरोनावरच्या औषधाचा दावाच नव्हताः पतंजली

डेहराडूनः कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणार्या पतंजली आयुर्वेद कंपनीने आपल्या कोरोनील औषधाने कोरोनावर इलाज होतो असा कधीही दावा केला नव्हता असा पवित्रा

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती?
करोना व्हायरस – शरीरात कसा वागतो?
कोरोनावर गंगाजलाचा औषधी उपचार; प्रस्ताव फेटाळला

डेहराडूनः कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करणार्या पतंजली आयुर्वेद कंपनीने आपल्या कोरोनील औषधाने कोरोनावर इलाज होतो असा कधीही दावा केला नव्हता असा पवित्रा घेतला आहे. तसे उत्तर त्यांनी उत्तराखंड सरकारला पाठवले आहे.

या कंपनीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण यांनी असेही म्हटले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेडने सर्व सरकारी प्रक्रियांचे पालन केले असून वाहतुकीस सुलभ होण्याच्या दृष्टीने कंपनीने दिव्य श्वासरी वटी, दिव्य कोरोनील गोळ्या व दिव्य अणुतेल या तीन औषधांचे पॅकेजिंग कीट तयार केले. पण या औषधांची कंपनीने ना व्यावसायिक विक्री केली ना हे औषध कोरोनावर मात करेल असा प्रचार केला होता.

रामदेव बाबा यांनी म्हटले की, आमच्या औषधांच्या चाचण्या यशस्वी झाल्या एवढाच दावा आम्ही प्रसार माध्यमांपुढे केला. पण प्रसार माध्यमांनी हा प्रसंग चुकीच्या पद्धतीने मांडला. उलट आम्ही सर्व सरकारी नियमांचे पालन केले आहे त्यामुळे आमच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रश्नच उरत नाही.

उत्तराखंड प्रशासन म्हणतेय, रामदेव बाबांचा दावा सर्वांनी पाहिलाय

दरम्यान पतंजलीकडून आलेल्या उत्तरासंदर्भात उत्तराखंड आयुर्वेदिक विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पतंजली आयुर्वेदिक लिमिटेडची उपशाखा दिव्य फार्मसीने जे पत्र पाठवले आहे, त्याचा अभ्यास सुरू असून आरोग्य विभागाच्या अधिकार्याला वस्तुस्थिती पाहण्यासाठी कंपनीत पाठवले होते पण त्याला कोरोना कीट मिळाले नाही, असे या विभागाचे लायसेंसिंग अधिकारी वाय. एस. रावत यांनी सांगितले. रावत यांनी रामदेव बाबांच्या कोलांट उडीवर म्हटले की, सर्वांनी बाबा रामदेव यांनी कोरोना उपचाराबाबत केलेला दावा पाहिला आहे. आम्ही अजून याची चौकशी करत आहोत, असे सांगितले.

२३ जून रोजी बाबा रामदेव व बाळकृष्ण या दोघांनी एक पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला होता. हा दावा खोटा असल्याचे वृत्त कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी! या मथळ्याखाली द वायर मराठीने २५ जून रोजी प्रसिद्ध केले होते.

पतंजली आयुर्वेद कंपनीने कोरोना या विषाणूजन्य आजारावर कायमस्वरुपी मात करणारे ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ हे औषध विकसित केल्याचा दावा केला असला तरी खुद्द या कंपनीने उत्तराखंड सरकारकडे या औषधाच्या परवानगीसाठी जो अर्ज पाठवला होता, त्या अर्जात त्यांनी कोरोना या साथरोगाचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता.

त्यांनी अर्जात आपले ‘हे रसायन प्रतिकारक शक्ती (इम्युनिटी बूस्टर) वाढवणारे असून ते प्रामुख्याने श्वसन मार्गात जंतू संसर्ग झाल्यास आणि जीवाणू व विषाणूपासून होणार्या सर्व तापांवर गुणकारी असल्याचे नमूद केले होते.

म्हणजे कोरोनावरचे औषध शोधल्याचा जो दावा पतंजलीने प्रसार माध्यमाद्वारे केला तो सरकारची व जनतेची दिशाभूल करणारा होता. त्यांनी सरकारकडे सादर केलेली माहिती व प्रत्यक्षात लोकांपुढे दिलेली माहिती यात तफावत असल्याचे त्याचवेळी दिसून आले होते.

पतंजलीच्या दाव्यानंतर २४ तासानंतर घडलेही तसेच. २५ जूनला उत्तराखंडच्या आयुर्वेदिक व युनानी विभागाचे लायसेंस अधिकारी डॉ. यतेंद्र सिंह रावत यांनी पतंजलीने विकसित केलेले औषध कोरोनावरचे नव्हे तर शरीरात प्रतिकारक शक्ती वाढवणारे, खोकला, तापावरचे असल्याचे स्पष्ट केले होते. डॉ. रावत म्हणाले, की पतंजलीने आम्हाला पाठवलेल्या अर्जात त्यांची ही औषधे कोरोनावरची आहेत याचा उल्लेख कुठेच केला नव्हता. हे औषध केवळ इम्युनिटी बूस्टर, खोकला व तापावर असल्याने त्याची परवानगी कंपनीने मागितली होती ती आम्ही दिली. पण आता आम्ही कीट बनवण्याची परवानगी कुणी दिली याची नोटीस त्यांना पाठवणार आहोत, असे ते म्हणाले होते.

दिशाभूल करणारी माहिती

कोरोना महासंकट देशापुढे नव्हे तर जगापुढे एवढे आ वासून उभे असताना रामदेव बाबा व त्यांचे सहकारी बालकृष्णन यांनी आपल्या औषधाबद्दल सरकारकडे जी माहिती दिली आहे ती माहिती त्यांनी जनतेपासून लपवून ठेवली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

त्यांनी उत्तराखंड सरकारला पाठवलेल्या पत्रात त्यांचे औषध केवळ कोरोनाच्या विषाणूंवर गुणकारी ठरत नसून ते जीवाणूंमुळे होणार्या अन्य आजारावरही गुणकारी ठरू शकते, असेही म्हटले होते. म्हणजे मानवी आजाराला कारणीभूत ठरणार्या विषाणू व जीवाणूंवर मात करणारी शक्ती त्यांच्या एकाच औषधात असल्याचा त्यांचा दावा आहे.

कोरोना हा विषाणूजन्य आजार असल्याची वैज्ञानिक माहिती आहे व त्या अनुषंगाने जगभर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असताना पतंजलीची ही दोन औषधे कोरोना विषाणूंवर नव्हे तर जीवाणूजन्य आजारांवरही मात करतात असा या दोघांचा दावा होता. म्हणजे पतंजलीचे एकच औषध जीवाणू व विषाणूजन्य आजारांवर मात देऊ शकते असा त्याचा निष्कर्ष निघू शकतो.

आता एक आठवड्यानंतर व या कंपनीच्या विरोधात अनेक ठिकाणी फिर्यादी दाखल केल्यानंतर रामदेव बाबा व बाळकृष्ण यांनी आमचे औषध कोरोनावरचे नव्हतेच खरे अशी कोलांटउडी मारली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: