अन्नत्यागानंतर साईबाबांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

अन्नत्यागानंतर साईबाबांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नवी दिल्लीः माओवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणात नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये असलेले दिल्ली विद्यापीठातील माजी प्रा. जीएन साईबाबा यांची प्रकृती बिघडली आह

भीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला!
वरवरा राव यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश
दलितांना काही झालं, तर मी तुमचा शत्रू नंबर एक! – जिग्नेश मेवाणी

नवी दिल्लीः माओवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणात नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये असलेले दिल्ली विद्यापीठातील माजी प्रा. जीएन साईबाबा यांची प्रकृती बिघडली आहे. गेल्या आठवड्यापासून ते अन्नत्याग करत असून २५ मे रोजी चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना नागपूर सेंट्रल जेलच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

साईबाबा यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी तुरुंग प्रशासनाने त्यांच्या संडास व बाथरूममध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. ही पाळत बंद करावी, सीसीटीव्ही काढून टाकावेत, अन्यथा अन्नत्याग करू असा इशारा साईबाबा यांनी दिला होता. सीसीटीव्ही काढण्याच्या संदर्भात साईबाबा यांची पत्नी व भावाने महाराष्ट्राचे गृहमंत्री वळसे-पाटील यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर तुरुंग प्रशासनाने साईबाबांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.

साईबाबा यांचे शरीर ९० टक्के विकलांग झाले असून त्यांना अन्य व्याधींनीही ग्रासले आहे, त्यांची त्वचाही सैल पडत चालली असून ब्लड मोशन होत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

साईबाबा यांना पिण्याच्या पाण्याची बाटली मिळत नव्हती पण आता बाटली देण्यास कारागृह प्रशासनाने परवानगी दिली आहे. आम्ही साईबाबा यांच्या मागण्या एका मागोमाग एक अशा मंजूर करत जाऊ असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तुरुंग प्रशासनाने साईबाबा यांच्या खोलीतील सीसीटीव्हीचा अँगलही बदलला आहे.

साईबाबा यांची पत्नी वसंता कुमारी व भाऊ जी. रामदेवुदूने दोन आठवड्यापूर्वी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रात साईबाबा यांना ठेवलेल्या अंडासेलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्या कॅमेऱ्यांतून संडास व बाथरूममध्ये पाळत ठेवण्यात येते. या कॅमेऱ्यांमुळे साईबाबा यांना संडास व आंघोळीलाही जाता येत नाही, ही पाळत २४ तास असल्याने अशा परिस्थितीत ते कसे राहतील अशी तक्रार या पत्रात मांडण्यात आली होती. २४ तास पाळत ठेवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे साईबाबा यांना मदत करणाऱ्यांमध्येही भीती निर्माण झाली असून आपण कॅमेऱ्यामध्ये दिसू व त्याने पुढे काही कायदेशीर प्रश्न निर्माण होतील अशी भावना मदत करणाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. तुरुंग प्रशासनाची ही कृती धमकावणे, भय निर्माण करणे व अपमान करण्याची आहे, असेही या पत्रात म्हटले होते.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास अखंड पाळत ठेवण्यामुळे साईबाबा यांचे व्यक्तिगत जीवन, खासगीपण व स्वातंत्र्य याचाही संकोच झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला होता.

साईबाबा यांनी आपल्याला पॅरोलवर सोडावे अशीही मागणी केली होती. ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही.

साईबाबा यांना हृदयासंदर्भात काही आजार असून त्यांना रक्तदाब, पक्षघातासह अनेक आजार आहेत. त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचारही मिळत नाहीत, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. साईबाबा यांच्या ९० टक्के शारीरिक क्षमता नष्ट झाल्या असून ते व्हीलचेअरवर असतात.

२०२०मध्ये साईबाबा यांनी पुस्तके, कपडे व औषधे मिळत नसल्याच्या कारणावरून तुरुंगात अन्नत्याग केला होता. त्यांच्या काही मागण्या तुरुंग प्रशासनाने अद्याप मान्य केलेल्या नाहीत.

२०१७मध्ये साईबाबा यांना माओवादी गटांशी संबंध ठेवल्याप्रकरणी गडचिरोली येथील स्थानिक न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.

साईबाबा यांनी आपल्या शिक्षेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अपील दाखल केले आहे. पण त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: