शाहीद आझमी हत्या – दहा वर्षांनंतरही कोणावरही गुन्हा सिद्ध नाही

शाहीद आझमी हत्या – दहा वर्षांनंतरही कोणावरही गुन्हा सिद्ध नाही

या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे शाहीद यांचे धाकटे बंधू ऍडवोकेट खालिद आझमी म्हणतात, खटल्याला खूप वेळ लागत असला तरी सरकारी वकिलांच्या हाताळणीबाबत ते समाधानी आहेत.

उ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे
इतकं क्रौर्य नेमकं येतं कुठून?
बिहार निवडणुकाः १२०० उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद

टीप: हा लेख प्रथम ११ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झाला होता. एक वर्षात प्रकरणाचा तपास आणि एकंदर स्थितीमध्ये काहीही बदल झालेला नाही.

नवी दिल्लीमुंबई स्थित मानवाधिकार वकील शाहीद आझमी यांच्या हत्येनंतर एक दशक उलटून गेले तरीही अजूनही एकावरही गुन्हा सिद्ध झालेला नाही.

सरकारी वकील वैभव बगाडे यांच्या मते खटला खूपच मंदगतीने चालू आहे आणि अजूनही सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. त्याचा निकाल केव्हा लागेल याबाबत इतक्या लवकर कोणतेही भाष्य करणे शक्य होणार नाही असेही ते म्हणाले. मात्र, त्यांच्या मते सरकारची बाजू सशक्त आहे. “सरकारकडे ठोस पुरावे उपलब्ध आहेत आणि निकाल आमच्या बाजूने लागेल याबाबत मला कोणतीही शंका नाही,” असे ऍडव्होकेट बगाडे यांनी द वायरला सांगितले.

उशीराबद्दल विचारले असता बगाडे यांनी असा दावा केला की सरकारी वकिलांच्या बाजूने कोणताही उशीर झालेला नाही. खटल्याच्या स्थितीबद्दल टिप्पणी करताना ते म्हणाले, “तक्रारकर्त्याच्या युक्तिवादाची तपासणी अगोदरच झालेली आहे आणि बचाव पक्षाकडून उलटतपासणी होणे बाकी आहे.” मागच्या सुनावणीच्या वेळी बचाव पक्षाचे वकील गैरहजर असल्यामुळे साक्षीदाराची उलटतपासणी होऊ शकली नाही असे त्यांनी सांगितले. मात्र यापुढे सुनावणी आणखी पुढे ढकलण्याची परवानगी मिळणार नाही असा इशाराही न्यायालयाने त्यांना दिल्याचे बगाडे यांनी द वायरला सांगितले.

११ फेब्रुवारी २०१० रोजी शाहीद आझमी यांची कुर्ला येथील टॅक्सीचालक वसाहतीमधील त्यांच्या कार्यालयामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या वेळी ते दहशतवादी खटल्यांमध्ये अडकलेल्या अनेक मुस्लिम तरुणांची बाजू न्यायालयात लढवत होते. केवळ सात वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी दहशतवादी असल्याच्या आरोपांमधून १७ लोकांची सुटका केली होती तर त्यांच्या हत्येनंतरही अनेकजणांची सुटका झाली.

आझमी हत्या प्रकरणी सुरुवातीला पाच लोकांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी गुंड संतोष शेट्टी याच्यावरील आरोप ऑक्टोबर २०१४ मध्ये मागे घेतले गेले तर इतर चौघांवर ऑगस्ट २०१७ मध्ये खून आणि गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. चार आरोपींपैकी दोघेजण, पिंटू डागळे आणि विनोद विचारे हे जामिनावर बाहेर असून देवेंद्र जगताप आणि हसमुख सोळंकी हे तुरुंगात आहेत.

जगताप याच्यावर आझमी यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. रोचक गोष्ट अशी की जगताप यानेही खटला चालू होण्यास विलंब होत असल्याचा दावा करत जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र ही याचिका न्यायालयाने नाकारली.

या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे शाहीद यांचे धाकटे बंधू ऍडवोकेट खालिद आझमी म्हणतात, खटल्याला खूप वेळ लागत असला तरी सरकारी वकिलांच्या हाताळणीबाबत ते समाधानी आहेत. खालिद यांच्या म्हणण्यानुसार खटला अजूनही१०८ साक्षीदारांपैकी प्रत्यक्ष साक्षीदारांच्या उलटतपासणीच्याच टप्प्यावर आहे. “मला आशा आहे की सत्य विजयी होईल आणि न्याय मिळेल,” आपल्या भावाच्या हत्येनंतर कायद्याची प्रॅक्टिस सुरू करणारे खालिद आझमी म्हणतात.

एप्रिल २०११ मध्ये, शाहिद आझमी प्रकरणातील आरोपींशी संबंधित काही व्यक्तींनी खालिद आझमी यांचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन व्यक्तींना न्यायालयाच्या परिसरातच गनसह अटक करण्यात आली.

मंगळवारी, ११ फेब्रुवारी २०२० रोजी खालिद यांनी हैद्राबाद येथे एका स्मृतीसभेला संबोधित केले. हैद्राबाद व्यतिरिक्त, दिल्ली आणि मुंबई येथेही शाहिद आझमी यांचे काम आणि वारसा यांची स्मृती जागवण्यासाठी बैठका आणि व्याख्यानांचे आयोजन केले गेले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: