पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन

पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन

चेन्नईः आपल्या दर्दभऱ्या व हळुवार गायकीतून ‘एक दुजे के लिए’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’ असे सुपरहीट सिनेमे देणारे व पाच दशकांच्या कार

तानसेन महोत्सवातून अखिलेश गुंदेचांचे नाव वगळले
तत्त्वचिंतक कुमार गंधर्व!
आपकी याद आती रही!

चेन्नईः आपल्या दर्दभऱ्या व हळुवार गायकीतून ‘एक दुजे के लिए’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’ असे सुपरहीट सिनेमे देणारे व पाच दशकांच्या कारकिर्दीत ४० हजाराहून अधिक गाण्यातून लाखो चित्रपट रसिकांच्या हृदये जिंकणारे प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम (७४) यांचे शुक्रवारी चेन्नई येथे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती व ऑगस्टमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना व्हेंटिलेटर व ईसीएमओ (एक्स्ट्राकोर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिडेशन सपोर्ट) वर ठेवण्यात आले होते. एसपीबी यांच्या निधनाची वार्ता त्यांचे पुत्र एसपी. चरण यांनी दिली.

बालसुब्रह्मण्यम एसपीबी या नावानेच चित्रपटसृष्टीत ओळखले जायचे. त्यांचा जन्म ४ जून १९४६ मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथे तेलुगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील एस. पी. सम्बापूर्ती एक हरिकथा आर्टिस्ट होते. डिसेंबर १९६६मध्येच एसपीबी यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. नंतर केवळ तेलुगू नव्हे तर तमिळ, कन्नड व नंतर हिंदीमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. सुमारे ४० हजाराहून अधिक गाण्यांचा त्यांचा विक्रम गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदला गेला. त्यांनी ४० हून अधिक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

पार्श्वगायनातील त्यांचे योगदान पाहून २००१मध्ये पद्मश्री तर २०११मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

१९८१मध्ये प्रदर्शित झालेल्या एक दुजे के लिए या हिंदी चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी त्यांना कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील पार्श्वगायनाबद्दल त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.

त्यानंतर मैने प्यार किया, या सुपरड्यूपर हीट सिनेमाने त्यांनी आणखी एक यशोशिखर पादाक्रांत केले. या चित्रपटातील त्यांचा आवाज सलमान खान या नवोदित अभिनेत्याला वरदानच ठरला व ते एक समीकरण बनून गेले. पुढे हम आपके हैं कौन, साजन या चित्रपटांनी इतिहास रचला. रोजा, अंगार, 100 डेज, चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटांतील त्यांनी म्हटलेली गाणीही लोकप्रिय झाली होती.

चित्रपट गायनाव्यतिरिक्त त्यांनी संगीत दिग्दर्शन, अभिनय, डबिंग व निर्माते म्हणूनही काम केले. त्यांना ६ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.

त्यांना निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, अभिनेता कमल हसन, सलमान खान यांच्यासह शेकडो कलावंतांनी शोक प्रकट केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: