‘सुपर ३०’ : साचेबद्ध, ‘आहे रें’चा दृष्टिकोन

‘सुपर ३०’ : साचेबद्ध, ‘आहे रें’चा दृष्टिकोन

विकास बहल आपल्याला स्वाभाविक तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. कुमारच्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेतून पाहता येऊ शकले असते पण बहल यांनी अगदी सुरुवातीपासूनच या कथेत एक विचित्र प्रकारची असुरक्षितता आणि वरचढपणाची भावना आणली आहे.

प्रकाशमय सणात रुपेरी पडदा अंधारातच
आ लौटके आजा मेरे मीत……
है कली कली के लबपर…….

विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सुपर ३० मधले पहिलेच दृश्य एखाद्या देशभक्तीपर व्हॉट्सॅप फॉरवर्डसारखे उलगडते. इथे, आपल्याला एक तरुण भारतीय शास्त्रज्ञ दिसतो, फुगा कुमार (विजय वर्मा). एका संवेदनशील परदेशी श्रोतृवर्गासमोर तो हिंदीत भाषण देत आहे. “हो, मी भारतातून आलो आहे– तिसऱ्या जगातला, स्वस्त कामगारांचा देश,” तो म्हणतो. “पण मग हाही विचार करा : पेप्सिकोचे जागतिक स्तरावरील प्रमुख कोण आहे? युनिलिव्हर कोण चालवते? मास्टरकार्ड, व्होडाफोन, डॉईश बँक कोण चालवते?”

सुपर ३० ही गरीब मुलांना आयआयटीसाठी तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था आहे. आनंद कुमार (हृतिक रोशन) यांनी सुरू केलेल्या या संस्थेमध्ये दाखल होण्यापूर्वी फुगा कुमार बिहारमध्ये एक सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

आनंद कुमार यांच्या जीवनावरून प्रेरणा घेऊन बनवलेला ‘सुपर ३०, भारताची जगाबरोबर तुलना करत राहतो. “अमेरिकेसारखा अभ्यास करा,” राज्याचा शिक्षणमंत्री श्रीराम सिंग (पंकज त्रिपाठी) भाषणात सांगतो. “भारत लोकांना तयार करतो – कॅलक्युलेटरसारखे लोक.” कुमारला वाचनालयाचा सदस्य नसल्यामुळे तिथून हाकलले जाते तेव्हाही हेच पुन्हा ऐकू येते. त्याला प्रवेश हवा असेल तर त्याला प्रतिष्ठित (वाचा : आंतरराष्ट्रीय) जर्नलमध्ये पेपर लिहावा लागेल असे त्याला सांगितले जाते. तो ते करतो आणि केम्ब्रिजमध्ये प्रवेश मिळवतो – पोस्ट ऑफिसमधले एक दृश्य आहे, ज्यात कुमारच्या वडिलांचे सहकारी फार मोठे स्वप्न पाहत असल्याबद्दल त्यांची चेष्टामस्करी करतात – पण अखेरीस आर्थिक स्थिती चांगली नसल्याने तो तिथे जाऊ शकत नाही.

कुमारच्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेतून पाहता येऊ शकले असते पण बहल यांनी अगदी सुरुवातीपासूनच या कथेत एक विचित्र प्रकारची असुरक्षितता आणि वरचढपणाची भावना आणली आहे.

बहुतांश कथा जेव्हा चांगल्या प्रकारे सांगितल्या जातात तेव्हा त्यांचा कोणताही सुटा भाग चांगला असतोच. पण ‘सुपर ३० थोडक्यात समाधान मानत नाही. त्याला एक कथाही सांगायची आहे आणि त्याबाबत आपल्याला काय वाटले पाहिजे तेही सांगायचे आहे. तेही चालले असते, जर चित्रपटाचा नायक, हृतिकने कुमार, त्याचा प्रवास किंवा एकूण परिस्थितीमध्ये थोडी जरी रुची दाखवली असती!

सुरुवात करायची, तर रोशन एक विचित्र दिखाऊ बोलीमध्ये बोलतो जिला ‘बांद्रा बिहारी’ म्हणता येईल. ही एक जुनी, सोपी युक्ती आहे : ‘फ’ वर जोर द्यायचा, ‘श’ ऐवजी ‘स’, ‘क्य’ ऐवजी ‘क’, वगैरे.. रोशनची संवादफेक इतकी चुकीची आहे, इतकी विसंगत आहे की तुम्हाला ‘आहे हे असं आहे’ असं म्हणून ती स्वीकारावीच लागते – नाही तर तुम्ही पहिल्या २० मिनिटांमध्येच उठून जाल.

त्यातले व्यंग्य तुमच्यासमोर लगेच उघड होते, वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्प्रचारासारखे : मूठभर विशेषाधिकार असलेले भारतीय – जे सांस्कृतिकदृष्ट्या ‘पहिल्या जगातल्या’ त्यांच्या बरोबरीच्या लोकांसारखेच आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्तच संपन्न आहेत – ते ‘गरीब’ भारताबद्दल सिनेमा बनवत आहेत, आणि त्या प्रक्रियेत त्यातले उच्चारसुद्धा व्यवस्थित नाहीत, जणू एक दुर्बिण घेऊन ते आपल्या शेजाऱ्यांकडे पाहत आहेत.

या सगळ्या ढिसाळपणात चकित करणाऱ्या चमकदार गोष्टीही आहेत : कुमारच्या गर्लफ्रेंडची भूमिका करणाऱ्या मृणाल ठाकूरची उपस्थिती आकर्षक, लक्षवेधक आहे. उदित नारायणने (जो कुमार सानूबरोबरच राज्यातील लोकप्रिय गायक आहे) गायलेले एक रोमँटिक गाणे आहे. जे ९० च्या दशकातील बिहारी प्रेमातली सुश्राव्यता पकडण्याचा प्रयत्न करते. काही संवाद अनपेक्षितपणे मजेदार आहेत, जे उदासी सहजपणेदूर करतात.

पण बहल केवळ जीवन आहे तसे दाखवण्यात समाधानी नाहीत, त्यांना ते मोठे करून दाखवायचे आहे, जे स्वाभाविक आहे तेच आपल्याला बघायला लावायचे आहे. कुटुंबात केम्ब्रिजबद्दल बोलणे चालू असताना कुमारचे वडील हृदयविकाराचा झटका येऊन कोसळतात; कुमार त्यांना सायकलवरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना अर्थातच जोरात पाऊस येत असतो; आणि – आधीच्या दृश्यात संकेत दिल्याप्रमाणे – सायकल तुटते, वडील मरतात आणि कुमारचे हृदय विदीर्ण होते. अशा भावनिक प्रसंगांची रेलचेल ही फार मोठी समस्या आहे असेही नाही; पण त्यांच्या मागची प्रक्रिया आहे. सुपर ३०ची दृष्टी कंटाळवाणी साचेबद्ध आहे – निसर्गातल्या गोष्टी, रडके पार्श्वसंगीत, दुःखामागून येणारी दुःखे. हा चित्रपट एक कादंबरी असता तर पहिली ओळ असती, “ती एक अंधारी आणि वादळी रात्र होती.”

काही काही प्रसंगात बहल यशस्वी होतो. उदाहरणार्थ, कुमारचे स्थानिक प्रशिक्षण संस्थेचा मालक लल्लन सिंगबरोबर (आदित्य श्रीवास्तव) वाद होत असताना : लल्लन कुमारला त्याच्या विद्यार्थ्यांच्या समोरच त्याच्या संस्थेत ये म्हणून पटवत असताना बाहेर एक मोठे वादळ येऊ घातले आहे, जे पहिल्यांदा त्याच्या गरीब संस्थेच्या छत आणि भिंतीच्या पत्र्याच्या आवाजाने जाणवते; मानवी आणि नैसर्गिक अशा दोन्ही शत्रूंकडून कोंडी झालेला कुमार मात्र ठाम उभा राहतो. हा त्याचा पवित्रा अधोरेखित करणारा हुशारीने घेतलेला प्रसंग आहे.

असाच अजून एक प्रसंग म्हणजे कुमारच्या प्रशिक्षण संस्थेतील मुले शोले सिनेमातील दृश्य त्यांच्या श्रीमंत मित्रांसमोर इंग्रजीतून सादर करतात. हे खरे तर एक हास्यास्पद दृश्य होऊ शकले असते – लाजिरवाण्या दारिद्र्यावर सादरीकरणाच्या कलेतून मात करता येत नाही – पण दिग्दर्शकाचा विश्वास आणि सुरेख अभिनय यांच्यामुळे ते तसे होत नाही.

पण चित्रपटातल्या दोषांमुळे बाकी सर्व फोल ठरते. अनेक बॉलिवुड दिग्दर्शकांसारखेच बहलला उच्चशिक्षणातले कष्ट समजत नाहीत. त्यामुळे तो आणखी एक जुनी गुळगुळीत युक्ती वापरतो : शिक्षणाला ‘सेक्सी’ बनवायची – कुमार त्याच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर नेऊन गणित आणि भौतिकशास्त्रातली कोडी वास्तव जगातल्या परिस्थितींमध्ये आणणारे प्रश्न विचारतो (जर सचिनने शोएब अख्तरला चौकार मारला तर चेंडू बॅटपासून दूर जाताना त्याच्यावर लागलेले बल किती?) – अशी दृश्ये ‘सिनेमॅटिक’ वाटू शकतात, पण वास्तवातल्या आयआयटी इच्छुकांच्या जगाशी त्यांचा काहीही संबंध नाही.

पण शेवटच्या प्रसंगात विचित्रपणाचा कळस गाठला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी लल्लनच्या गुंडांना लोळवण्यासाठी मिनी-रॅम्बो बनतात (आयआयटी परीक्षेच्या एक दिवस आधी), आणि तेही भौतिकशास्त्राच्या संकल्पना वापरून! हा गरीब मुलांबद्दलचा, त्यांचे दुर्दैवी आयुष्य, निराशा आणि निर्धाराबद्दलचा चित्रपट नाही – किंवा व्यवस्थेच्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये विज्ञानाचा प्रकाश पाहणाऱ्या माणसाचाही नाही. हा त्या अनुभवांचे पैसे करणारा चित्रपट आहे – ‘प्रेरणादायी’ कथेच्या बुरख्याखाली. ते अनुभव कुठून येतात हे समजून घेण्याचाही तो प्रयत्न करत नाही. आणि स्वतःची देशभक्त छाती पिटणाऱ्या या चित्रपटाचा शेवट मात्र तीन गोष्टींमधून कुमारच्या यशाची ग्वाही देतो : टाईम मासिक, न्यूजवीक आणि बराक ओबामा. तुम्हीच गणित करा.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0