टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन

पालघर येथे झालेल्या या अपघातात ५४ वर्षीय सायरस मिस्त्री यांच्याशिवाय आणखी एकाचा मृत्यू झाला. पालघरमधील चारोटी परिसरात कार रस्ता दुभाजकाला धडकली. त्यावेळी मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारने परतत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द
पररराज्यातल्या ७ जणांकडून जम्मूत भूखंड खरेदी
नुपूर शर्मा, नवीन जिंदालमुळे परराष्ट्र खाते अडचणीत

मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते.

अपघातस्थळावरील फोटोंमध्ये मर्सिडीज कारचे तुटलेले अवशेष दिसत आहेत. मुंबईपासून १३५ किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील चारोटी परिसरात कार रस्ता दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. त्यावेळी मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारने परतत होते.

कारमध्ये मिस्त्री यांच्याव्यतिरिक्त जहांगीर पांडोले, अनहिता पांडोले आणि दारियस पांडोले होते. या अपघातात जहांगीर पांडोळे यांचाही जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, “दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात होते. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला.

“अपघातात मिस्त्री आणि अन्य एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले,” असे त्यांनी सांगितले.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की कासा पोलिस स्टेशन हद्दीतील सूर्या नदीच्या पुलावरील चारोटी नाका येथे ही घटना घडली. मिस्त्री यांची कार दुभाजकाला धडकल्यानंतर रिटेन्शन भिंतीवर आदळली.

अपघातात जीव गमावलेले मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कासा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत असल्याचे पालघरचे पोलीस अधिकारी सचिन नावडकर यांनी सांगितले.

या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. फडणवीस म्हणाले, की पालघर येथे झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले आहे.

राज्याच्या गृहमंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे फडणवीस यांनी ट्विट केले, की “डीजीपींशी बोललो आणि सविस्तर चौकशीचे आदेश दिले.” ते म्हणाले, “त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांबद्दल माझ्या मनापासून संवेदना.”

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, डॅरियस पांडोले हे टाटा ग्रुप ऑफ फर्म्समध्ये स्वतंत्र संचालक होते आणि त्यांनी मिस्त्री यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यास विरोध केला होता. मिस्त्री यांच्यासोबत त्यांनीही टाटा समूह सोडला होता.

दारियस हे अनाहिताचे पती आहेत आणि जहांगीर हा तिचे सासरे होते. अनाहिता पांडोले या कार चालवत होत्या. अनाहिता आणि दारियस पांडोले यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले.

मिस्त्री कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. यापूर्वी जूनमध्ये सायरसचे वडील पालोनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले होते. त्याच्या व्यावसायिक साम्राज्याने आशिया खंडात लक्झरी हॉटेल्स, स्टेडियम आणि कारखाने बांधले आहेत.

शापूरजी पालोनजी कुटुंबातील सायरस मिस्त्री यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. ते टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष होते. रतन टाटा यांनी पद सोडल्यानंतर २०१२ मध्ये मिस्त्री यांनी पदभार स्वीकारला होता. नंतर समूहातील वादामुळे त्यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळातूनही काढून टाकण्यात आले.

या वादाशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करताना, डिसेंबर 2019 मध्ये, राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण (NCLAT) ने मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले होते. मात्र मार्च २०२१ मध्ये, न्यायाधिकरणाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.

मूळ वृत्त 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0