‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या’

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या’

मुंबई : सुमारे दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मराठ

वस्त्रोद्योग उत्पादनावरचा जीएसटी ५ टक्केच
याचसाठी केला होता अट्टाहास !
राज्यामध्ये सरकार नेमके कोणाचे आहे?

मुंबई : सुमारे दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मराठी भाषा गौरव वर्षभरच नव्हे तर आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रधान सचिव भूषण गगराणी यांचेसह साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते. राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. त्यांच्या कर्तृत्वाचा थोडा तरी अंश आपल्यात आला पाहिजे. आपल्या साधू-संतांनी आपल्याला दिलेला वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाची मातृभाषा ही त्याच्या आईकडून त्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी असते. तिचा गौरव करणे आवश्यक आहे. शिवसेनेची सुरुवात झाली तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मराठी भाषिकांना सांगितले होते नोकऱ्या मागणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा असे सांगून व्यवसाय करण्याचे आवाहन मराठी युवकांना त्यांनी केले होते. मराठी भाषा यापुढे वर्षानुवर्षे टिकली पाहिजे याची जबाबदारी आपल्यावर आहे. घरा-घरांतून मराठी बोलली गेली पाहिजे असे सांगून इतर भाषा शिकाव्यात मात्र मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यापुढचा गौरवदिन हा मोठ्या पटांगणात व्हावा तो संपूर्ण राज्यभर साजरा व्हावा. जगभर मराठी माणसं पसरलेली आहेत. या ठिकाणी मराठी कुटुंब एकत्र येतात आणि मराठी भाषा गौरव दिन एखाद्या सणासारखा साजरा करतात. आज पाच गावात पुस्तकाचे गाव तयार होते आहे या साठी अभिनंदन करून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी, मालवणी, अहिराणी या सारख्या भाषेतील   साहित्य ठेवले पाहिजे. जर आपल्या राज्यात कोणीतरी चरितार्थासाठी येत असेल तर त्याने इथे आपल्या भाषेत बोलले पाहिजे हा आग्रह केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठी भाषेची उपयोगिता वाढावी ती संपर्काची भाषा व्हावी यासाठी राज्यशासन विविध उपक्रम राबवित असून येत्या गुढीपाढव्याला मराठी भाषा भवन उभारणीस सुरुवात होणार आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  मराठीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात दिली. नवी मुंबई येथे मराठी भाषा उपकेंद्रासाठी सिडकोने जागा निश्चित केली असून त्यासाठी 25 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. भिलार पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यात येत असून टप्प्या-टप्प्याने राज्यभर असे पुस्तकांचे गाव तयार होणार आहेत, यासाठीही निधीची तरतूद केली असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी पुर्ण व्हावी यासंदर्भातील घोषणा प्रधानमंत्री यांनी लवकर करावी अशी विनंती करुन मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी बहुजात आणि बहुज्ञात भाषा होणे आवश्यक आहे. विज्ञान, विधी, संगणक या विषयांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याची गरजही पवार यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिन हा केवळ शासकीय स्तरावर न राहता  विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित घेऊन मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी कार्य व्हावे. यासाठी ठोस कृतीकार्यक्रम करावा लागेल समाज म्हणून प्रत्येकाने यात सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठी ही केवळ ओठातून नव्हे तर ती पोटातून येणारी भाषा व्हावी. उद्योगाची भाषा मराठी असावी, कोणत्याही देशावर हल्ला करतांना आधी तिथल्या संस्कृतीवर आणि भाषेवर हल्ला केला जातो. इंग्रजी ही रोजगार देणारी भाषा आहे हा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. प्रत्येक दुकांनावर मराठी पाटी लावण्याचा निर्णय घेतला तर त्यास विरोध करणाऱ्यांना समज देण्याची गरज व्यक्त करुन. इथल्या मातीचे ऋण मान्य करुन मराठीचा अभिमान बाळगावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: