कोकणातील वादळग्रस्तांना मदत मिळणारः ठाकरे

कोकणातील वादळग्रस्तांना मदत मिळणारः ठाकरे

रत्नागिरी:  तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहण

गणेशोत्सवः कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सवलत
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस
नाणार रिफायनरी… आता हे अति झाले!

रत्नागिरी:  तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रत्नागिरी येथे केले.

जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान  राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचा पाहणी दौरा करण्यासाठी ठाकरे एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते.

जिल्ह्यात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पद्धतीने करून नेमकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करा असे निर्देश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 कोव्हिड आढावा

यावेळी जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून  सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्ह्यात सुरू असणारे लसीकरण आणि त्याबाबतीत इतर माहिती यावेळी सादर करण्यात आली.

मोठ्या प्रमाणावर नुकसान

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्ह्यात २जणांचा मृत्यू झाला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे.

जिल्ह्यात १७च घरे पूर्णत: बाधित झाली असून  अंशत: बाधित घरांची संख्या ६,७६६ आहे. यात सर्वाधिक दापोलीत २,२३५ आहेत. रत्नागिरी तालुक्यात १, ०८४ तर राजपूरातील  ८९१ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठ्यांची जिल्ह्यातील संख्या ३७० इतकी आहे.

वादळात वाऱ्यामुळे १,०४२ झाडे पडली. यात सर्वाधित ७९२ झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या २५० इतकी आहेत. चक्रीवादळात ५९ दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६ आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यातील आहेत, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.

शेती

चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे १,१०० शेतकऱ्यांचे या साधारण २,५०० हेक्टर इतके नुकसान झाले. यातील ३,४३० शेतकऱ्यांच्या ८१०.३०हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण झाले आहे.

वीज

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे.

बाधित उपकेंद्राची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसाय

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर  आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचे अंशत: नुकसान झाले. ७१ जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत आहे.

या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार रु.पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

ई-उद्घाटन

जिल्हा पोलिसांतर्फे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.याचे ई-उद्घाटन याप्रसंगी ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी केंद्राबाबत यावेळी माहिती दिली तसेच त्यावरील एक लघुपट यावेळी दाखवण्यात आला.

साधेपणाने बैठक

बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जाता ठाकरे यांनी व्यासपीठा समोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार – बुके देखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पद्धतीनेच पूर्ण बैठक पार पडली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: