टीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक

टीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक

मुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी रिपब्लिक इंडिया मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक केली. आपल्या कार्य

अर्णव प्रकरणात प्रेस कौन्सिलचा हस्तक्षेप पक्षपाती!
आपले प्रजासत्ताक आणि त्यांचे रिपब्लिक
अर्णववरच्या दोन फिर्यादींवरील कारवाई रोखली

मुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी रिपब्लिक इंडिया मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक केली.

आपल्या कार्यक्रमाची लोकप्रियता बनावट रेटिंगच्या माध्यमातून वाढवायची व त्यावर जाहिराती मिळवायचा असा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी शोधून काढला होता. त्यावेळी दोन मराठी वाहिन्या व रिपब्लिक इंडियाच्या विरोधात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल (बार्क)ने बनावट टीआरपी संदर्भात तक्रार नोंदवली होती. आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक झालेली आहे.

टीआरपी घोटाळा नेमका काय होता?

गेल्या ऑक्टोबर महिन्यात ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवला असल्याचा खळबळजनक खुलासा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात त्या दिवशी पोलिसांनी ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्याच्या मालकांना अटक केली होती व त्यांच्याकडून ८ लाख रु.ची रक्कम जमा करण्यात आली होती. या रॅकेटमध्ये आढळलेल्या या वाहिन्यांमधील प्रमोटरपासून कोणाही वरिष्ठ, कनिष्ठाची चौकशी केली जाईल, असे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशीही सुरू केली होती.

मुंबई पोलिसांच्या मते, ‘रिपब्लिक टीव्ही’च्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या, ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ यांनी हंसा या टीआरपी एजन्सीला हाताशी धरून आपला टीआरपी वाढवला होता. या एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांनी या वाहिन्या पाहाव्यात म्हणून त्यांना दर महिना ४०० ते ५०० रु. दिले जात होते. अशिक्षित घरांना इंग्रजी वाहिनी बघण्यास सांगितले जात होते. टीआरपीच्या आकडेवारीत बदल केले जात होते. या रॅकेटमध्ये ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ वाहिन्यांचे चालकही आढळल्याचा पोलिसांचा संशय होता. ‘रिपब्लिक टीव्ही’ने पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्याचे पुरावे हाती लागल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले होते.

या वाहिन्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी ग्राहकांना पैसे दिले असून ती फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.

पण टीआरपी रॅकेटमध्ये ‘रिपब्लिक टीव्ही’चे नाव आल्यानंतर या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिस आयुक्तांवरच आरोप करत सुशांत सिंह आत्महत्येच्या संदर्भातल्या चौकशीवरून  परमबीर सिंग यांना सतत प्रश्न विचारल्याने त्यांनी असे आरोप केल्याचा आरोप केला. परमबीर सिंग यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे, असा इशारा गोस्वामी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता.

१४०० पानांचे आरोपपत्र

गेल्या नोव्हेंबर महिन्यात रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांनी केलेल्या कथित टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या आरोपपत्रात १४० साक्षीदारांची नावे होती. त्यात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)चे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, फॉरेन्सिक ऑडिटर, जाहिरातदार, बॅरोमीटर लावणारे ग्राहक व अन्य काही जणांचा समावेश आहे. या ३ वाहिन्यांनी आपल्याला फसवले असा आरोप जाहिरातदारांचा आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अगोदरच रिपब्लिक टीव्हीच्या पश्चिम भागाचे वितरण प्रमुख व दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांसह १२ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही तपासात नोंद केली आहे. या नोंदीवर पुढे आणखी २ हजार पाने आरोपपत्रात समाविष्ट केली जातील. यात फॉरेन्सिक व तंत्रज्ञांच्या साक्षी असतील. पोलिसांनी आरोपींचे फोन, लॅपटॉप व त्यांच्या कम्प्युटरमधील संभाषण, ईमेल, मेसेज व अन्य माहिती जप्त केली आहे.

टीआरपी काही काळासाठी स्थगित

‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवल्याचा घोटाळा लक्षात आल्यानंतर ऑक्टोबरमध्येच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) या टेलिव्हिजन रेटिंग कंपनीने ८ ते १० आठवड्यांसाठी टीआरपी जाहीर करणे बंद केले होते. बीएआरसीचा हा निर्णय इंग्रजी, हिंदी व प्रादेशिक भाषा व बिझनेस टीव्ही चॅनेलवर लागू झाला आहे. बीएआरसीने एक पत्र प्रसिद्ध करून आपल्या तांत्रिक समितीने टीआरपी घोटाळ्याची दखल घेत आपल्या कार्यप्रणालीमध्ये दुरुस्त्या, माहिती योग्य रितीने गोळा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

बीएआरसी इंडियाचे संचालक पुनीत गोयंका यांनी टीआरपी प्रसिद्ध करण्यावर स्थगिती आणण्यामागे टीव्ही इंडस्ट्री व बीएआरसी यांच्यातील संबंधांची नव्याने तपासणी व्हावी, एकमेकांवर विश्वास राहावा, नियमांचे कठोर पालन व्हावे, अशी कारणे दिली होती. टीव्ही बाजारपेठेत स्पर्धात्मक वातावरण पारदर्शी राहावे जेणेकरून या उद्योगाला आपल्या वाढीसाठी विविध घटकांवर लक्ष्य केंद्रीत करता येईल, असेही ते म्हणाले होते.

बीएआरसीच्या या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशनने स्वागत केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: