‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’

‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी आखून दिलेल्या मार्गावरच ट्रॅक्टर परेडला परवानगी देण्यात आली होती पण ही अट शेतकरी संघटनांच्या आंदोलकांनी उधळून लावली, त्या

संघप्रणित किसान संघाची बंदपासून फारकत
कृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का?
मंडई कर गरजेचाः अर्थ खात्याचे मत

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनी आखून दिलेल्या मार्गावरच ट्रॅक्टर परेडला परवानगी देण्यात आली होती पण ही अट शेतकरी संघटनांच्या आंदोलकांनी उधळून लावली, त्यामुळे हिंसाचार झाला. त्यामुळे लाठीमार व अश्रुधुराचा वापर करावा लागला, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. शेतकर्यांनी संयम न पाळल्याने ते दिल्लीच्या वेशीवरून शहरात आले, लाल किल्ल्यापर्यंत ते पोहचले. या दरम्यान आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी करण्यात आली, अनेक पोलिस जखमी झाले, असे पोलिसांचे म्हणणे असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.  

तर मंगळवारी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारात आमच्या संघटनेचे कार्यकर्ते सामील नव्हते असा दावा ४१ शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान संघटनेने केला आहे. या परेडमध्ये समाजकंटक घुसले आणि त्यांनी हिंसाचार सुरू केला असे संघटनेने म्हटले आहे. झालेला हिंसाचार दुर्दैवी होता. पोलिसांनी आखून दिलेला मार्ग काही शेतकरी गटांनी बदलल्यानंतर हिंसाचार सुरू झाला याकडे संयुक्त किसान संघटनेने लक्ष वेधले आहे. मंगळवारच्या ट्रॅक्टर परेडमध्ये सामील झालेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत संयुक्त किसान संघटनेने झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत आमचा या घटनांशी संबंध नाही असे पत्रकात नमूद कले. आमचे आंदोलन शांततापूर्ण होते व शांतता मार्गाने आंदोलन करणे यातच खरी ताकद असते, मंगळवारच्या आंदोलनात समाजकंटक उतरले व त्यांनी हिंसा केली असे संघटनेचे म्हणणे आहे.

इंटरनेट काही काळ बंद

ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेला हिंसाचार व लाल किल्ल्यावर आंदोलकांनी मारलेली धडक पाहता केंद्रीय गृहखात्याने दिल्लीच्या सीमेनजीक सिंघु, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक व नांगलोई भागात १२ तास इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

कायदे मागे घ्यावेत- राहुल गांधी

शेतकरी आंदोलक व पोलिसांमध्ये झालेली चकमक व हिंसाचाराबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त करत हिंसेमुळे प्रश्न सुट शकत नाहीत. सरकारने तीन शेती कायदे त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. हिंसेने प्रश्न सुटत नाही, कोणालाही त्याची झळ बसू दे अखेरत्याने नुकसान देशाला होते. देशहितासाठी सरकारने कायदे मागे घ्यावेत असे ट्विट त्यांनी केले आहे.

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी लाल किल्ल्यावर आंदोलकांनी फडकवलेला झेंडा ही दुर्दैवी घटना असून अशा अराजकतेला मी स्वीकारू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ट्विटवरून दिली आहे. माझे पहिल्यापासून शेतकरी आंदोलनाला समर्थन आहे पण अराजकता मला मान्य नाही. प्रजासत्ताक दिनी फक्त तिरंगाच फडकवला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: