तौक्ते वादळाचे ६ बळी, १२ हजार जणांचे विस्थापन

तौक्ते वादळाचे ६ बळी, १२ हजार जणांचे विस्थापन

मुंबईः महाराष्ट्र व गुजरातला धडकलेल्या तौक्ते वादळाने सोमवारी ६ जणांचे बळी घेतले तर ९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसात किनारपट्टीलगतच्या

तत्त्वचिंतक कुमार गंधर्व!
‘मोदींवर पुस्तक लिहिणारे पत्रकार माहिती आयुक्तपदी’
अजित पवार यांना क्लीन चीट

मुंबईः महाराष्ट्र व गुजरातला धडकलेल्या तौक्ते वादळाने सोमवारी ६ जणांचे बळी घेतले तर ९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसात किनारपट्टीलगतच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील १२ हजार ४२० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

रत्नागिरी  जिल्ह्यातील ३ हजार ८९६  ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीजपुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरू आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरू राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. रविवारपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालागत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाऊस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर मुंबईत दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस सुरू झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ठाणे-डोबिंबली, कल्याणमध्ये दिवसभर जोराचे वारे व पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. या शहरांच्या कित्येक भागामध्ये वीज पुरवठा खंडित होता. मोबाइल सेवाही विस्कळीत झाली.

२ हजार ५४२ बांधकामांची पडझड
या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. ठाणे २, रायगड ३, सिंधुदुर्ग १ असे ६ जण मरण पावले आहेत. मुंबईत ४, रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत. मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.
वादळ गुजरातला धडकले
हे चक्रीवादळ सोमवारी रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरातला धडकले. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशे किमी प्रती तास इतका होता. मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती मुंबई पालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली होती, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: