राज्यात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात

राज्यात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात त

शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण आवश्यक
मुख्यमंत्री निधीला काँग्रेस आमदारांकडून मासिक वेतन
‘सोना अलॉयज्’मधून रोज १०-१५ टन प्राणवायू मिळणार

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात हे निर्बंध शिथील झाले आहेत. असे असले तरी भविष्यात कोविड-१९ चा संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क घालणे व दोन्ही लस घेणे या आरोग्यासंबंधी सर्व नियमांचे पालन करून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण कमी झाला आणि स्थिती नियंत्रणात असल्याने नियमांमध्ये पुढीलप्रमाणे शिथिलता देण्यात आली आहे.

१. राज्य शासनाने कोविड-१९ निर्बंधांसंबंधी लागू केलेले सर्व आदेश मागे घेतले असून १ एप्रिल २०२२ च्या मध्यरात्री १२:०० पासून हे निर्बंध संपुष्टात येतील.

२. सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध मागे घ्यावेत.

३. दि. २२ मार्च रोजी केंद्रीय गृह सचिव आणि त्यानंतर २३ मार्चला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकातील सर्व आदेशांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

४. सर्व नागरिक, व्यापारी प्रतिष्ठान, संघटना, संस्था यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायायोजनांची अंमलबजावणी कायम ठेवावी.

५. सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दक्ष रहावे व आपल्या अखत्यारितील कार्यक्षेत्रात कोविड-१९ चा नवीन प्रकार, उपचार चालू असलेल्या रुग्णांची संख्या, पॉझिटिव्हिटी दर तसेच वैद्यकीय संस्था आणि रुग्णालयात किती रुग्ण भरती आहेत याकडे बारकाईने लक्ष द्यावे. जर यामध्ये काहीही धोकादायक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला याची तात्काळ माहिती द्यावी.

केंद्रीय गृहसचिव यांनी २२ मार्च २०२२ रोजी राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या एका पत्रकात देशाच्या कोविड-१९ स्थिती बाबतीत सविस्तर माहिती दिली होती. कोविड-१९ च्या स्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा आता लागू करू नये, असा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासन तसेच केंद्रशासित प्रदेशांनी पूर्ण सतर्क राहावे व स्थितीचे सनियंत्रण करावे. जर कोणत्याही ठिकाणी कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास स्थानिक पातळीवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आदर्श कार्यप्रणालीची अंमलबजावणी पुढे चालू ठेवावी. यात कोविड-१९च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना, लसीकरण आणि इतर कोविड-१९ प्रतिबंधात्मक वर्तन यांचा समावेश आहे.

यानंतर २३ मार्च २०२२ रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने एक परिपत्रक काढून आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राला चालना देण्यासाठी निर्बंध शिथील करत असल्याची माहिती दिली होती. सोबतच कोविड-१९ प्रतिबंधात्मक वर्तणुकीची अंमलबजावणी करण्याची सूचना ही देण्यात आली आहे. यामध्ये कोविड-१९ ची चाचणी करणे, मास्क घालणे, रुग्ण-शोधणे, उपचार करणे, लसीकरण या पंचसुत्रीचा पालन करावे, असे राज्य सरकारतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: