बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली

बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली

तत्त्वज्ञानात्मक लेखन करताना रसेलने 'तार्किक विश्लेषण पद्धती' ही उपयोगात आणली. ते रसेलने विकसित केलेले तत्त्वज्ञान आहे. तिचे स्वरूप पाहाण्यापूर्वी रसेलची ही तार्किक आणि मानसशास्त्रीय विचारप्रक्रिया त्याच्या मनात आणि विचारांमध्ये कशी घडत, साकारत गेली, हे पाहाणे आवश्यक आहे. ती अतिशय काटेकोर होती. त्या प्रक्रियेत आणि त्या विचारांमध्ये सामान्य लोकांना प्रवेश नव्हता. तत्त्वचर्चेच्या क्लिष्टतम प्रांतात तत्त्वज्ञानात्मक दृष्ट्‍या अप्रशिक्षितांना पूर्ण मज्जाव करणारा "रसेल हा मानवी प्रज्ञेचा उच्च कोटीचा धर्मगुरू" (A High Priest of the intellect) होता, या भाषेत रसेलचा अभिप्रायवजा गौरव पॉल जॉन्सन (Paul Johnson) हा संशोधक-लेखक करतो.

तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान
तत्त्वज्ञानात्मक चिंतन
बर्ट्रंड रसेलचे तत्त्वज्ञानविषयक मत

रसेल अफाट लेखन शकला, त्यामागे त्याची लेखनशैली आणि त्याची लेखनचर्या महत्त्वाची ठरते. आधी पण त्याच्या लेखनचर्येची म्हणजे त्याच्या दिनचर्येची माहिती घेऊ. या विषयीची तीन उदाहरणे देतो. पहिले निरीक्षण सिडनी आणि बिआट्रीस वेब (Beatrice Webb) या फेबियन जोडप्याचे आहे. आणि दुसरे  माईल्स मॅलेसन (Mike Malleson) या रसेलच्या नजीकच्या मित्राचे आहे. तर तिसरे निरीक्षण रसेलच्या उत्तरायुष्यात झालेले मित्र युद्ध वार्ताहर अॅलन वूड याने दिलेली आहे.

बिआट्रीसचे निरीक्षण

सिडनी आणि बिआट्रीस जोडप्याशी रसेल आणि त्याची प्रथम पत्नी आयलीस यांची घनिष्ठ मैत्री होती, त्यांचे येणेजाणे होते. रसेलच्या निवासस्थानी आल्यानंतरच्या एका दीर्घकालिन भेटीचे वर्णन वेब करते, “रसेल आणि आयलीस त्याच्या अभ्यासिकेत सकाळी नऊ वाजता न्याहारी करत. मग रसेल १२.३० पर्यंत गणितावर काम करे, त्यानंतर जवळपास पाउण तास ते दोघेही मोठ्याने वाचन करीत, त्यानंतर ते तेवढाच वेळ त्यांच्या बागेत फिरून येत आणि दीड वाजता जेवत असत. जेवणानंतर रसेल त्याचा मेहुणा लोगन स्मिथबरोबर croquet हा खेळ खेळत असे. त्यानंतर ४.३० वाजता चहा होई, मग सायंकाळी ६ पर्यंत पुन्हा तो गणित करे, त्यांतर पुन्हा दीड तास ७.३० पर्यंत मोठ्याने वाचन रात्रीचे जेवण ८ वाजता, वेब जोडप्याबरोबर गप्पाटप्पा ९.३० पर्यंत होत असत. मग तासभर इतिहासाचे एखादे पुस्तक किंवा एखाद्या कादंबरीचे मोठ्याने वाचन, शेवटी रात्री १०.३० वाजता ती दोघे निद्राधीन होत असत.”

हा दिनक्रम कुठेतरी छापून आल्यानंतर रसेलची प्रतिक्रिया होतीकी, ” श्रीमती वेब यांना सगळ्याच गोष्टींच बैजावार टाईमटेबल करण्याची आणि सगळ्याचा काटेकोर हिशेब ठेवण्याची जबरदस्त चाह आहे एवढचं.” खुद्द रसेलच्या म्हणण्यांनुसार तो गणितासाठी जास्त वेळ देत असे आणि मोठ्याने वाचण्यासाठी कमी.. सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ८ हा प्रदीर्घ वेळ गणितासाठी राखून ठेवलेला असे. (पण तो कितीही कामात गुंतला असला तरी जेवणाच्या वेळा मात्र अतिशय काटेकोरपणे पाळत असे.)

माईल्स मॅलेसनचे निरीक्षण             

रसेलचा मित्र माईल्स मॅलेसन हा तत्कालिन ब्रिटिश अभिनेता आणि नाटककार होता, त्याच्या पहिल्या पत्नीशी लेडी कॉन्स्टन्स मॅलेसनशी रसेलचे प्रेमप्रकरण रंगलेले होते. रसेलने लेडी कॉन्स्टन्सला तुरुंगातून अनेक पत्रे लिहिली होती. त्यांचे प्रेमप्रकरण बरेच गाजले होते.

आपल्या बायकोच्या एका तत्त्ववेत्त्याशी असलेल्या प्रेमप्रकरणाचा आधार घेवून आणि स्वतःही तसा खुला विवाह करून माईल्स मॅलेसनने, ज्याला आपण आज ‘अविवाहित सहजीवन’ (Live In) म्हणतो तशी ‘खुला विवाह’ ही संकल्पना मांडणारे “Yours Unfaithfully या नावाचे नाटकही लिहिले. ते अर्थातच सेन्सॉरने अडकवले, त्याचा प्रयोगच होऊ शकला नाही. त्याचा पहिला जागतिक प्रयोग २०१७ च्या जानेवारीत ब्रिटनमधील The Mint Theater Company ने   the Beckett Theater येथे केला.

मॅलेसन१९२० साली एका लेखात लिहितो की “रोज सकाळी बर्टी एकटाच तासभर फिरून येत असे. त्यावेळी दिवसभराच्या कामाच्या आखणीची रूपरेषा हाच त्याच्या चिंतनाचा विषय असे. फिरून तो परत येई आणि उरलेली सारी सकाळ तो केवळ लिहित असे, संथपणे, सहजपणे आणि एकही दुरुस्ती न करता एकटाकी लिहित असे. त्याच्या साऱ्या कार्यकलापाचे फळ म्हणजे त्याच्या लेखनाने त्याला होणारी सारी मिळकत तो एका छोट्या नोंदवहीत नोंदवत असे, ज्यात प्रसिद्ध केलेल्या किंवा नभोवाणी अथवा दूरचित्रवाणीवर झालेल्या कार्यक्रमातून मिळणारे सारे मानधनाचे तपशील तो अतिशय सविस्तर लिहित असे. हा त्याचा नित्यक्रम होता. ही नोंदवही तो अगदी आतल्या खिशात ठेवी आणि त्याच्या एखाद्या रिकामटेकड्या क्षणी किंवा निराश मनःस्थितीत ती बाहेर काढून सतत तपासत राही, जिला तो “सर्वात किफायतशीर उद्योग” (a most rewarding occupation) म्हणत असे.

माईल्स मॅलेसनचे निरीक्षण १९२० सालचे आहे आणि त्यानंतरही रसेल मृत्यूपर्यंत लिहिता राहिला. या लेखानंतरच रसेलने लेखनाच्या नियमाविषयीची मते व्यक्त केली आणि अखेरीस “मी कसा लिहितो” (HOW I WRITE)  यावर १६ जानेवारी १९५१ रोजी बीबीसीला मुलाखत दिली. ही मुलाखत शब्दबद्ध झाली.

या लेखात रसेल लिहितो की,

“जॉन स्टुअर्ट मिलसारखी वाक्यरचना अंगिकारून लिहावे, त्याच्या विषयाचा विकास करण्याची पद्धती आवडावी अशी आहे’, असे रसेलला एकवीस वर्षांपर्यंत वाटत असे. पण एकविसाव्या वर्षी त्याच्या बायकोचा भाऊ लोगन स्मिथचा नवीन प्रभाव रसेलवर पडला. त्या वेळी स्मिथला एक छंदच जडला होता. लेखनाची शैली हा त्याच्या आस्थेचा एकमात्र विषय झाला होता. स्मिथने काही साधे नियम त्याला दिले होते. प्रत्येक चार शब्दानंतर स्वल्पविराम टाकावा, And हा शब्द फक्त वाक्याच्या आरंभीच वाटल्यास वापरावा, एरवी कधीही नाही. आणि आपले लेखन पुनःपुन्हा लिहून शुद्धातिशुद्ध करावे. रसेल लिहितो की “हा प्रयत्न मी सतत करून पाहिला. पण मला असे आढळले की, ज्या ज्या वेळी मी पुनर्लेखन करीत असे, त्या वेळी माझा दुसरा प्रयत्न पहिल्या प्रयत्नाहून जास्तच बिघडत असे! मग पुन्हा हा प्रयोग कधी केला नाही. त्यामुळे पुनर्लेखन करण्यासाठीचा वेळ कायमचा वाचवू शकलो. अर्थात यामुळे माझ्या लेखनातील विषयाचे काय झाले याची मला कल्पना नाही. ज्या वेळी माझ्या लेखनात मला महत्त्वाची चूक सापडते त्या वेळी मी सगळाच विषय पुन्हा हाताळतो. पण ज्या वेळी एखाद वाक्य असमाधानकारक रीतीने अर्थ व्यक्त करते त्या वेळी ते वाक्य का व कसे सुधारावे हेच मला समजत नाही. या प्राथमिक खटपटीनंतर कमीत कमी चिंता करून लेखन कसे करावे याचा मार्ग मी शोधून काढू शकलो.” लेखकांना तो सल्ला देतो की “तुम्ही लिहिल्यानंतर कधीही पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करु नका. खास करून कोणीतरी सांगते म्हणून तर कधीच नाही!” अर्थात रसेलचा हा सल्ला मानायचा की नाही, असे प्रत्येकावर अवलंबून आहे.”

“मी तरुण असताना एखादा गंभीर स्वरूपाचा नवीन लेख माझ्या वाचनात आला की, तो आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहे, असे वाटायचे. खूप कष्ट करूनही ज्या वेळी त्यातील काहीच समजायचे नाही , त्या वेळी हे सर्व प्रयत्नच मला व्यर्थ वाटू लागतो. गंभीर लिखाण आपल्याला कधीही समजले नाही अशा हताश मनःस्थितीत मी ढकलला जात असे. शेवटी मला समजले की, असे गोंधळलेले प्रयत्न की म्हणजे नुसता वेळ गमावणे आहे . अशा प्रयत्नांनी काहीच चांगले लेखन माझ्याकडून कधीच होणार नाही. एखाद्या विषयावर काही गंभीर चिंतन करावे लागल्यास, तसे केल्यानंतर, काही काळ मध्यंतरी जाऊ देणे आवश्यक आहे. या काळात त्या विषयाची सुप्त आंतरिक तयारी माझ्या बाबतीत चालू असते. त्या विषयाच्या मागे विषय बरोबर व्यक्तही होत नाही आणि तयारीही पूर्ण होत नाही, त्या विषयावर माझ्या पूर्ण मानसिक शक्तींचे केंद्रीकरण केल्यावर तो विषय माझ्या सुप्त वृत्तीत रुजत असे. नंतर त्यावर जरी व्यक्त विचार केला नाही, तरी त्या विषयाचे बीज माझ्या मनात विकसित होत राहते; आणि एखाद्या वेळ अकस्मातपणे तो गंभीर विषय इतक्या स्पष्टपणाने समोर येतो की, साक्षात्काराप्रमाणे मला सर्वच गोष्टी समजू लागतात, दिसू लागतात; आणि त्या फक्त शब्दांकित करावयाचे शिल्लक राहते. १९१४ च्या आरंभी या प्रक्रियेचे मोठे गमतीदार उदाहरण घडले; आणि त्यानंतर या प्रक्रियेवर मी नेहमीच विसंबून राहू लागलो. त्या वेळी बोस्टनला ‘लॉवेल लेक्चर्स’ देण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती. विषय असा होता- ‘Our Knowledge of the External World’.  संपूर्ण १९१३ साली या विषयावर मी विचार करीत बसलो. माझे केंब्रिजमधील कार्य करत असताना तेथील मोठ्या गंभीर खोल्यांत मी सतत विचार केला. सुट्टी लागल्यावर थेम्सच्या काठी प्रशांत हॉटेल्समध्ये मी विचार करीत वेळ घालवला. हा माझा विचार इतका तीव्र केंद्रीकरणासह होत असे की, कधी कधी अशा वेळी मी संपूर्ण भारावून गेलेल्या वातावरणात अक्षरशः अडकून बसत असे, माझ्या लक्षात यायचे की काही क्षण आपण श्वाससुद्धा घ्यायला विसरलो आहोत! केंद्रीकरणाच्या या दडपणाने मी पुरता भाबावून गेलो होतो. पण काही नाही. विषयाबद्दल एखादी कल्पना सुचावी आणि त्या कल्पनेला भयानक आक्षेप मीच घ्यावेत, असे सुरू होते. शेवटी काहीसा कंटाळून थोड्या बेदरकारपणाने ख्रिसमससाठी मी रोमला निघून गेलो. निदान हा बदल आणि विश्रांती माझी योग्य शक्ती मला पुन्हा देईल असे वाटले. १९१३ च्या शेवटच्या दिवशी मी केंब्रिजला परतलो. माझ्या त्या विषयावरील अडचणी अजून सुटल्या नव्हत्या, पण आता इलाजच नव्हता बोस्टनची व्याख्याने फार जवळ आली होती. माझ्या स्टेनोला दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास मी सांगितले. विषयाची उकल झाली नसताना मी तिला सर्व साहित्य घेऊन लिहिण्यास बोलावले होते! दुसऱ्या दिवशी सकाळी ती दारात उभी राहिली. आणि आश्चर्य असे की, त्याच क्षणी मला त्या विषयाबद्दल काय म्हणावयाचे आहे, हे फार स्पष्टपणे जाणवून गेले. स्टेनोला मी ते उतरवून घेण्यास सांगितले. आणि माझा हा ग्रंथ कुठेही न अडखळता मी पूर्ण करू शकलो. या उदाहरणापासून मला कोणताही चमत्कारपूर्ण ठसा वाचकांवर उमटवावयाचा नाही. त्या वेळी जे पुस्तक मी लिहिले, ते चुकांनी भरलेले आहे, हे आज मी जाणू शकतो. पण त्या वेळी जे काही त्या विषयाबद्दल सर्वोत्कृष्ट मी व्यक्त करू शकलो असतो, ते मी लिहिले होते. लेखनाची रीत इतरांच्या बाबतीत, काहीही असो, माझ्या बाबतीत मात्र मला ही अशी पद्धत उपयुक्त वाटते. नुसते शैलीकार, लेखनाचे तंत्र सांगणारे मार्गदर्शक, मी फार यशस्वीपणाने विसरलो आहे. अठराव्या वर्षी लेखनाबद्दल मला जे वाटायचे त्याहून मूलतः काहीतरी भिन्न आज वाटते आहे, असे मुळीच नाही. या शतकाच्या सुरुवातीला काही काळपर्यंत माझे लेखन जास्त आवेशपूर्ण आणि रम्य रचनेचे करण्याचा प्रयत्न मी केलाही. “A Free Man’s Worship” हे माझे पुस्तक अशाच अवस्थेत लिहिले गेले आहे. पण ते पुस्तक मला आज काही आवडत नाही. त्या वेळी मिल्टनच्या लयपूर्ण गद्यात माझे मन हळूहळू झोके घेत होते. पण आज स्थिती बदलली आहे. आज मला मिल्टन आवडत नाही, असे नाही. पण दुसऱ्याचे अनुकरण करणे, हा अप्रामाणिकपणा मात्र वाटतो. खरे तर सारेच अनुकरण धोक्याचे असते. तसे पाहिल्यास बायबलच्या शैलीपेक्षा जास्त आकर्षक शैली शोधून काढणे कठीण आहे. पण त्या शैलीतील विचार आणि भावना आजच्या काळातील विचार आणि भावनांपेक्षा वेगळे आहेत; आणि नुसती शैली उचलणे व्यर्थ आहे.”

अॅलन वूडची निरीक्षणे : रसेलच्या चिंतनपद्धतीची वैशिष्ट्ये  

जगप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन युद्धवार्ताहर अॅलन वूड (Alliott Alan Whitfeld Wood, जन्म: ०६ ऑक्टोबर १९१४, मृत्यू: २७ ऑक्टोबर १९५७, वय ४३ ) हा रसेलचा मित्र आणि चरित्रकार होता. त्याने त्याच्या “Bertrand Russell : The Passionate Sceptic या चरित्रग्रंथात रसेलच्या चिंतनपद्धतीची काही वैशिष्ट्ये नमूद केली आहेत.

कानसेन रसेल

पहिले वैशिष्ट्य म्हणजे, रसेलच्या बाबतीत त्याच्या ‘डोळा’ या इंद्रियापेक्षा ‘कान’ हे इंद्रिय जास्त संवेदनशील होते, तो कानानेच जास्त काम करत होता. याचा अर्थ काय? तर त्याला जे काही नीट समजून उमजून घ्यायचे असेल तर तो मजकूर रसेल इतर कोणाकडून तरी मोठ्याने वाचून घेत असे किंवा त्याला स्व:तलाच वाचण्याची वेळ आली तर तो स्वतःशीच ‘मनातल्या मनात पण मोठ्याने’ वाचत असे!  पुस्तकातील पानावरील छापील अक्षरापेक्षा ऐकलेले शब्द त्याच्या अधिक चांगले लक्षात राहात असत. ऐकलेले सारे काही जणू त्याला पाठच होत असत. मग लिहिताना त्याला स्वच्छपणे आठवत राही.

अॅलन वूड सांगतो, “रसेलची ‘अंतःप्रेरणा’ त्याला प्रत्यक्ष दृश्य आकारापेक्षा ऐकीव ध्वनीवर भर देण्यास प्रेरित करत असावी! एके ठिकाणी रसेल नमूद करतो की,”मी जेव्हा गायीचे चित्र काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते चित्र घोड्याचे आहे, असेच मला दिसते!” रसेलला चित्रकलेपेक्षा काव्य आणि संगीत या दोन कलांची उत्तम जाण होती. कदाचित ऐकताना मन वेगाने विचार करते आणि तेच वाचताना सावकाश वाचावे लागत असल्याने विचार करण्याची गति होते, त्यामुळे असू शकेल; पण रसेल वाचनापेक्षा ‘ऐकणे’ म्हणजे ‘तानसेन’ असण्यापेक्षा ‘कानसेन’ अधिक होता.”

रसेलचा ‘डोळ्यापेक्षा कान बरा’ हा दृष्टिकोन त्याच्या शिक्षणविषयक विचारांमध्येही आढळून येतो. विद्यार्थ्यांना शब्दाचा प्रथम योग्य व खणखणीत उच्चार करण्यावर जास्त भर दिला पाहिजे, स्पष्ट उच्चारांची त्यांना सवय लावली पाहिजे, त्यानंतरच त्यांना आपसूकच योग्य लेखन कसे करावे हे समजेल, असे रसेल म्हणतो. त्याच्या मते, कोणत्याही व्यक्तीची लेखनशैली नेहमीच अचूक शब्दोच्चारावर अवलंबून असते. श्वासोच्छवासाच्या नैसर्गिक प्रक्रियात कोणतीही अडचण न येता शब्दाचा उच्चार करता येणे हे एका अर्थाने वाचन प्रक्रियेचे पूर्वरूप असते.

रसेलने ही पद्धती स्वतः अमलात आणली. त्याच्या सामाजिक आणि तात्त्विक लेखनात ही शैली त्याने काटेकोरपणे अमलात आणली होती. त्याचे स्वतःचे उच्चार आणि त्याला नैसर्गिकरीत्या लाभलेला उच्च दर्जाचा उत्तम स्वर यामुळे तो उत्तम वक्ता बनला होता. त्याचे व्याकरणाचे आणि व्याकरणीय तर्कशास्त्राचे ज्ञान श्रेष्ठ होतेच, पण ते त्याने स्वतःच निर्माण केले होते. त्यामुळे शब्दांवर, भाषेवर त्याची उत्तम हुकूमत होती.

तथापि गणिताची सूत्रे किंवा भूमितीच्या आकृत्याही मात्र प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय, लिहिल्याशिवाय समजू शकत नाहीत, हे रसेल जाणत होताच. आणि Principia Mathematica सारखा ग्रंथ तर मोठ्याने वाचणे जवळपास अशक्य आहे, हेही त्याला माहित होतेच. पण लेखनाच्या शैलीप्रमाणे गणिती व भूमितीची सूत्रे लक्षात ठेवण्याची आणि त्यांचा उच्चार करण्याची वेगळी शैलीही रसेलने विकसित केली होती. वूडच्या मते, रसेल ‘दृक संवेदने’ (Visual Sensation) बाबत स्वतंत्र नव्हता, पण ‘दृक कल्पनाशक्ती (Visual Imagination) बाबत तो स्वतंत्र होता. ती त्याला निसर्गतः देन लाभलेली होती. तिचा तो मुक्त व अथांग वापर करीत असे. त्याला स्वप्नात अनेक विचार ‘दिसत असत’ असे रसेल एके ठिकाणी म्हणतो. कदाचित त्यामुळेच त्याने नंतरच्या काळात स्वप्नाभोवती गुंफलेल्या कथा लिहिल्या असाव्यात.

त्याची  अर्थात याचा अर्थ असा नव्हता की त्याचे डोळे अधू किंवा सदोष होते; त्याला निसर्गतः दीर्घदृष्टि लाभलेली होती. तो तासनतास वाचू शकत होता, वाचनामुळे त्याला डोकेदुखी कधी झाली नाही.

तार्किक अंतःप्रेरणा   

रसेलच्या लेखनशैलीचे आणि विचारशैलीचे दुसरे वैशिट्य म्हणजे, त्याची तार्किक अंतःप्रेरणा.  ब्रॅडली या चिद्वादी तत्त्ववेत्त्याला १९१४ सालच्या एका पत्रात रसेल लिहितो, ” इतर लोक तत्त्वचिंतन कसे करतात, हे मला माहित नाही; पण माझ्याबाबत असे घडते की, प्रथम मला एकाद्या विशिष्ट चिंतनक्षेत्रातील सत्याची तार्किक अंतःप्रेरणा स्फुरते आणि मग त्या सत्याचे नेमके स्थान शोधण्याचे प्रयत्न आपसूक सुरु होतात. ती अंतःप्रेरणा अंध आणि बहिरी असली तरी मी तिच्यावर मी पूर्ण विश्वास टाकतो, पण तिचा आविष्कार करण्यासाठी शब्द फारसे संदिग्ध नसतात, हे मी जाणतो. मी जर त्या क्षेत्रावर अचूक नेमका हल्लाबोल केला नाही तर, अनेक परस्परविरोध, विसंगती आणि अडचणी मला घेरून टाकतील, पण मी कमीजास्त प्रमाणात चुकत असलो तरी, मी चुकीच्या चिंतनक्षेत्रात आलेलो नाही, असा विचार मी करीत नाही. जर मी केलाच काही विचार तर माझ्या विचारांच्या अंतर्गाभ्यातून मी फक्त एवढाच दावा करू शकतो की माझा म्हणून जो काही दृष्टिकोन असा काही असेल तर त्या मार्गाने कोणी जाऊ पाहील तो सत्याप्रत पोहोचू शकेल- पण ते सत्यच असेल, असे कधी नाही.”

अंतर्दृष्टी

अॅलन वूड लिहितो की,  रसेलच्या मते, माणसाची तर्कबुद्धी त्याच्या कोणत्याही सर्जकतेपेक्षा विचारांमध्ये सुमेळ साधणारी शक्ती आहे. रसेल एके ठिकाणी म्हणतो, “निखळ शुद्ध तार्किक चिंतनक्षेत्रात, ही ती अंतर्दृष्टीच आहे की जी, जे काही नवे असेल तिथे ती प्रकट होते.” हे रसेलच्या तत्त्वज्ञानात्मक आणखी एक वैशिष्ट्य मानता येईल.

अबोध मनाची कामगिरी

चौथे वैशिष्ट्य असे की रसेलचे लेखन करताना अबोध मनाचा बोधपूर्वक, एका सजग जाणि‍वेने वापर करण्याचे तंत्र. त्याला अनुभवांती असे उमजले की त्याला जर काही कठीण विषयावर काही लिहायचे असेल तर त्याला त्याआधी खूप काही काळ -काही तास काही दिवस त्यावर अतिशय कठोर विचार-चिंतन करणे आवश्यक आहे, आणि त्यानंतर अंतर्मनाला ‘आता यावर काम कर’ अशी आज्ञा द्यावी लागते. मग काही महिन्यानंतर तो जाणिवपूर्वक त्या कामाकडे वळत असे आणि मग त्याला लक्षात येई की ते काम ‘आत’ पूर्ण झाले आहे. आणि आता ते बाहेर येण्यास पात्र बनले आहे.

रसेल म्हणतो, “या तंत्राचा मला शोध लागण्यापूर्वी, ‘मी या कामात काहीच प्रगती करीत नाही’ अशी काळजी करण्यात मी बराच काळ, काही महिनेही जात, मध्यंतर म्हणून घालवित होतो. …आता मात्र मी तोच वाया जाणारा काळ इतर कामात उपयोगात आणतो.”

अॅलन वूडच्या मते, ही सारी लेखनतंत्रे त्यांनी वापरली असोत वा नसोत, पण त्याच्या विचारांचा अंतिम परिपाक असा की त्याचे विचार अतिशय अचूक, तर्कशुद्ध असत. आणि त्याच्या मनात परिपूर्ण स्वरुपात अवतरत असत.

वूड लिहितो की, “मी पाहिले आहे की, एखाद-दुसरा अपवाद वगळता रसेलची हस्तलिखिते आणि त्याने लिहिलेली पत्रे अतिशय अमानवी नेटकी (inhuman neatness), अचूक असत. रसेल मला सांगत असे की, एकदा का त्याचे चिंतन त्याच्या मनात पूर्ण झाले आणि तो लिहायला बसला की, जणूकाही कुठून तरी नक्कल करीत असल्याप्रमाणे त्याचे लेखन कागदावर उतरत असे. रसेल मला म्हणे की, तो आधी डोक्यात लिहितो, कारण कागदावर खाडाखोड करण्यापेक्षा डोक्यातच खाडाखोड करणे सोपे आणि जलद घडते.” लिहिणाऱ्या वाक्याचा शेवट काय करायचा आहे, हे मनाशी आधी निश्चित केल्याशिवाय तो कधीही ते वाक्य लिहिण्यास सुरुवात  करीत नव्हता. त्याच्या स्वप्नात देखील त्याच्या पात्रांचे सारे संवाद व्याकरणीयदृष्ट्या परिपूर्ण वाक्यरचनेत असत.

रसेलचे तत्त्वज्ञानविषयक लेखन  

रसेलचे पहिले तत्त्वज्ञानविषयक लेखन केवळ गणित आणि तत्त्वज्ञानात प्रशिक्षित विद्वानवर्गासाठी लिहिलेले पारिभाषिक, जडजंबाळ, शब्दबंबाळ भाषेत होते. शिवाय ते इंग्लिशमध्ये लिहिलेले नव्हते, तर जर्मन भाषेत होते. Die Gesetze und Elemente des wissenschaftlichen Denken (The Laws And Elements Of Scientific Thought: A Textbook Of Epistemology In Basic Features) हे १८९५ सालचे त्याचे पहिले लेखन पुस्तक परीक्षणरुपात जर्मन भाषेत आले होते. German Social Democracy हे १८९६ सालचे त्याचे पहिले इंग्लिश भाषेतील पुस्तकही मूळ जर्मन भाषेतच प्रथम प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्या वर्षभरात त्याने अनेक लेख जर्मन भाषेत लिहिले. त्याचे हे सर्व लेखन तांत्रिकदृष्ट्या अतिशय किचकट होते. ती रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली होती. कारण ते केवळ त्या त्या विषयातील तज्ज्ञांसाठी होते, सामान्य वाचकाला समजेल-उमजेल असे विषयच नव्हते. नंतर मात्र रसेलने तत्त्वज्ञानावर लिहिणे सुरू केले तसे त्याने तात्त्विक संकल्पनांचे भाषिक सुलभीकरण केले. 

Principia Mathematica

रसेलला प्रसिद्धी लाभली ती प्रथम त्याच्या तांत्रिकदृष्ट्या किचकट अशा Recent Work on the Principles of Mathematics (१९०१) The Principles of Mathematics (१९०३), आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेडच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली लिहिलेले Principia Mathematica चे तीन खंड (१९१०,१९१२,१९१३) या ग्रंथांनीच. Principia Mathematica त्याचा हा ग्रंथ न्यूटनच्या 1687 मध्ये प्रसिद्ध झालेल्या Mathematical Principles of Natural Philosophy (मूळ लॅटिन भाषेतील) ग्रंथासारखाच रचला गेला आहे.

इथे Principles of Mathematics ची गोष्ट कथन करणे योग्य राहील. तर्कशास्त्र आणि गणित हे दोन वेगळे ज्ञानविषय नसून मूलतः ते एकच आहेत, हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रसेलने Principles of Mathematics हा ग्रंथ पूर्ण करण्याची योजना केली. हा ग्रंथ योजनेनुसार दोन खंडात येणार होता. पहिला खंड Principles of Mathematics याच शीर्षकाने प्रसिद्ध झाला.

त्याआधी समांतर अर्थाने व्हाईटहेडने १८९८ ला A Treatise on Universal Algebra हा ग्रंथ प्रसिद्ध केला. तो अर्थातच रसेलला माहित होताच. १८९८ नंतर दोघांनी एकत्र काम करण्याचे ठरवले. दोघांनी जे अथक आणि प्रचंड कष्ट केले त्याचे फलस्वरूप म्हणूनच Principia Mathematica चा पहिला खंड १९१० ला प्रसिद्ध झाला. दुसरा १९१२, तिसरा १९१३ ला आला. हे खंड केंब्रिज विद्यापीठाने प्रसिद्ध केले. Universal Algebra आणि Principles of Mathematics हे दोघांचे स्वतंत्र ग्रंथ हे त्रिखंडात्मक खंडाच्या Principia Mathematica जणूकाही पूर्वपीठिका ठरले.

केंब्रिजमध्ये गणित, तत्त्वज्ञान या विषयावर व्याख्याने देत असतानाच्या काळात अध्ययन व अध्यापन दरम्यानच्या चिंतनप्रक्रियेतून रसेलने ग्रंथाची रूपरेषा निश्चित केली. दोघांनी त्याचे विविध विभाग केले आणि ते वाटून घेतले. आपापल्या भागाचा प्राथमिक मसुदा प्रत्येकाने तयार केला, तो एकमेकांना पाठवून दिला. एकमेकांच्या टीका-समीक्षणाच्या आधारे त्यात सुधारणा केल्या. याच्या तीन तीन आवृत्या केल्या. दोघेही एकमेकांना गरज असेल तेव्हा भेटून प्रदीर्घ, सविस्तर, प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करीत असत. मग परस्पर अनुमतीने त्या त्या भागाचा मसुद्याला अंतिम स्वरूप देत असत. त्यानंतरही कोणाला काही शंका आली तर पुन्हा त्यावर सखोल चर्चा होई.

Principia Mathematicaची मुद्रणप्रत रसेलने स्वहस्ताक्षरात तयार केली. प्रत्येक विधान (Proposition) त्याने स्वतंत्र पानावर लिहिले. त्यामुळे कोणत्याही विधानात अधिक-उणे करता येणे शक्य झाले. येथे ‘विधान’ या संज्ञेचा अर्थ भाषिक नसून ‘गणिती स्वरूपाची सूत्रात्मक रचना’ असा आहे. प्रमेय सिद्धी करणे म्हणजे ‘गणिती विधान’ करणे असा अर्थ होतो. अशा गणिती रचेनेचे प्रत्येक विधान स्वतंत्र पानावर लिहिले आहे. त्यामुळे कोणत्याही विधानात अधिक-उणे करण्याची जागा तयार होते. त्यामुळे ग्रंथाच्या बॉक्स फाईल्सची थक्क करणारी आश्चर्यकारक लांबलचक रांगच तयार झाली!

पहिला खंड पाने ७१९, दुसरा खंड पाने ७६८, तिसरा खंड पाने ४९६, असे एकूण १९८३ पानांचा हा ग्रंथ आहे. (हे खंड येथे उपलब्ध आहेत. खंड १ -१९६३ ची प्रत, खंड २ -१९२७ ची प्रत , खंड ३,-१९२७ ची प्रत). 

आश्चर्यकारक न्यूनगंड

शक्य झाल्यास या ग्रंथावर स्वतंत्र लेख लिहिण्याचा प्रयत्न मी करेन, पण आश्वासन देत नाही. याचे कारण ‘गणित नको’ किंवा ‘गणित येत नाही’, म्हणूनच ‘आर्टस’ जाण्याची पवित्र प्रथा इयत्ता ११ पासूनच, १९७७ पासून पाळणाऱ्या भारतातील प्राचीन पिढीतला मी आहे. आणि आजही ती पवित्र प्रथा अत्यंत काटेकोरपणे श्रद्धायुक्त अंतःकरणाने पाळली जाते, असे निवृत्त प्राध्यापक या भूमिकेतून प्रखर अधिकारवाणीने कथन करण्याचे नैतिक धैर्य माझ्यात जणूकाही नैसर्गिकरीत्या बाणले गेले आहे, हे ज्या विद्यार्थीवर्गाला गेली तीस वर्षे मी शिकविले त्याआधारे मी हे प्रमेय अतिशय भक्कमपणे सिद्ध करू शकतो. विशेषतः तत्त्वज्ञानाकडे विद्यार्थी खेचण्याची जी परमपवित्र पद्धती एकूण भारतात आणि महाराष्ट्रात एका मोठ्या आत्मविश्वासाने पाळली जाण्याचे अधिष्ठानच मूलतः ‘गणित, भूमिती आणि विज्ञान हे विषय नसलेला विषय’ हे आहे. परिणामी मलाही गणितात फारशी गति असण्याचे कोणतेही वैध व सत्य – Valid and True कारण उरत नाही. तरीही “Principia Mathematica ओळख करून देणारा लेख लिहिण्याचा प्रयत्न मी करेन” असे विधान करण्याचे औद्धत्य मी केले आहे, याचा मला आश्चर्यकारक न्यूनगंड अधिक आहे.   

सहकार्य पद्धती

व्हाईटहेड आणि रसेल यांनी ‘संशोधक-लेखक परस्परांनी सहकार्य कसे करावे’, या पद्धतीचा आदर्श घालून दिला आहे, असे मला दिसते. त्या पद्धतीकडेही रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली या अर्थाने पाहिले पाहिजे, असे मला खूप व्यक्तिगतरीत्या वाटते. कारण वर्तमानकालीन ‘भारत’ या आपल्या ‘राष्ट्रा’त (ज्यात आपले ‘ ‘महा’ राष्ट्र’ ही सामालेले आहे.) विद्यापीठीय पातळीवर जे संशोधन प्रसिद्ध होते, त्यात संशोधक मार्गदर्शक (उपाख्य guides), विभागप्रमुख, अधिष्ठाता (deans), आणि प्राचार्य तसेच क्वचित प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष (Chairman), अध्यक्ष (President) यांचीही नावे ‘संशोधक’ म्हणून समाविष्ट करण्याची पद्धत सुरू झाली आहे. ही वाङमयचोरी आणि श्रेयचोरी पद्धती अबलंबून भारतीय संशोधनक्षेत्र कोणत्या वैचारिक अघोरी, आत्मघापणाकडे वळत आहे, जागतिक पातळीवर ते कसे अपकीर्तिपात्र ठरत आहे, याचा अंदाज येईल. संशोधनाबाबत विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत ‘राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिस्वीकृती परिषद’  (NAAC- The National Assessment and Accreditation Council) या संस्थने  कितीही उदात्त हेतू ठेवला असला तरी राजकारण आणि अर्थकारण या दोन्हींनी  परिषदेचा हेतू धुळीस मिळविला आहे, हे दिसून येते/ भारतीय संशोधन क्षेत्राचे आणि साहित्यक्षेत्राचेही मूल्यमापन व्हाईटहेड-रसेल या गुरु-शिष्यांच्या संशोधन-लेखन पद्धतीच्या करणे योग्य राहील.

रसेलच पहिला सामाजिक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ 

Mathematica लिहित असतानाच १९१२ ला त्याचे तत्त्वज्ञानात रुचि असलेल्या सामान्य वाचकांसाठी The Problems of Philosophy लिहिला. हा त्याचा सामान्य वाचकांसाठी लिहिलेला पहिला ग्रंथ होता. त्यामुळे तत्त्वज्ञानाबाहेर सुशिक्षित वाचकांमध्ये प्रसिद्ध झाला. तसे पाहाता हा ग्रंथही तांत्रिकदृष्ट्या किचकट म्हणावा लागतो.

मानवी प्रज्ञेचा उच्च कोटीचा धर्मगुरू

Mathematica किंवा The Problems of Philosophy स्पष्टपणे सांगायचे तर शुद्ध ज्ञानाच्या क्षेत्रात सामान्य वाचकांनी कोणताही हस्तक्षेप (की मुखक्षेप!?) करू नये किंवा त्यांना करू देऊ नये, या मताचा होता. हे तत्त्व तो स्वतः अतिशय दक्ष आणि काटेकोरपणे पाळत होता. गणितातील त्याचे व्यावसायिक लेखन त्याने अतिशय उच्च तांत्रिक आणि पूर्ण पारिभाषिक शिस्तीत केले आहे. गणिततज्ज्ञ नसलेल्या कोणालाही त्यात शिरकाव करता येईल, एवढी बारीकही फट त्याने या लेखनात ठेवलेली नाही. तत्त्वज्ञानात्मक चिंतन किंवा तत्त्वज्ञानात्मक स्वैरकल्पना सुद्धा एका निखळ विशिष्ट स्वरूपाच्या ‘विशेष भाषेत’ च मांडल्या पाहिजेत, असा त्याचा आग्रह होता. त्याने केवळ त्यासाठी एक ज्ञानयुद्ध केले, एवढेच नाही तर ‘ती सांकेतिक भाषा’ च त्याने निर्माण केली. जणू प्राचीन इजिप्शियन धर्मगुरूंनी धार्मिक सत्ये अवगुंठीत करण्यासाठी निर्माण करावी तशी रसेलची भाषा आहे. तत्त्वचर्चेच्या क्लिष्टतम प्रांतात अप्रशिक्षितांना पूर्ण मज्जाव करणारा “मानवी प्रज्ञेचा उच्च कोटीचा धर्मगुरू” (A High Priest of the intellect) होता, या भाषेत रसेलचा अभिप्रायवजा गौरव पॉल जॉन्सन (Paul Johnson) हा संशोधक-लेखक करतो.

ज्याच्यामुळे रसेल गणिताकडून तत्त्वज्ञानाकडे वळला त्या त्याचा तत्त्वज्ञानातील पहिला मित्र जॉर्ज एडवर्ड मूरच्या मते मात्र ‘तत्त्वज्ञान व त्यातील वादचर्चा सामान्य भाषेत मांडाव्यात. कारण ‘सामान्य भाषेतच तत्त्वज्ञानातील अनेक गूढे लपलेली असतात’. रसेलला हे मत बिल्कुल मान्य नव्हते. त्याच्या मते, ‘तात्त्विक गूढे त्यांच्या उच्चस्थानीच शोभायमान असतात, ती अढळ राखावीत. पण सामान्य माणसांकडे असलेल्या ज्ञानाच्या साठ्याचा आदर करून, त्या ज्ञानसाठ्याच्या आधारे त्यांचे शहाणपण पचवू शकेल इतकी आणि त्या स्वरुपाचीच ज्ञानफळांची मेजवानी मात्र त्यांना देणे, हे तत्त्ववेत्त्यांचे कर्तव्य आहे.’

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की,  सुशिक्षित सुजाण व तत्त्वजिज्ञासेसाठी उत्सुक वाचकांचा रसेल अवमान करीत नाही, उलट त्यांच्या सुशिक्षित असण्याचा व जिज्ञासू वृत्तीचा आब राखून पण त्याचवेळेस त्यांना तत्त्वचर्चेचा जाच होणार नाही, याची काळजी घेतो. अशा रीतीने ‘व्यावसायिक तत्त्वज्ञान’ आणि ‘लोकप्रिय नीतिशास्त्र’ ह्यात रसेलने अचूक सीमाआखणी केली.

सार्वजनिक क्षेत्रात त्याने पाउल ठेवले त्यावेळी त्याचे अर्धे आयुष्य सरलेले होते. उरलेले जीवन त्याने जणू लोकांनाच अर्पण केले होते. लोकांनी कोणता विचार करणे अनिवार्य आहे आणि तो त्यांनी कसा अमलात आणणे, ही त्यांची कर्तव्यात आहे, याचे आवाहन करण्यातच त्याने जीवन व्यतित केले. रसेलचे जीवन म्हणजे ‘बौद्धिक उपदेशकवाद’ (Intellectual evangelism) च झाला होता. आइनस्टाइनसारखा तो साऱ्या जगताचे जणू प्राणतत्त्व बनला होता, जणू अमूर्त तत्त्ववेत्त्याचा आदिबंध! सतत बोलणारे अशरीरी डोके!

पॉल जॉन्सन लिहितो की “विसाव्या शतकात असे झाले की ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय? ” तर… ते, की रसेल बोलेल ती प्रत्येक गोष्ट म्हणजे तत्त्वज्ञान ! हे समीकरण झाले होते.’ ”

श्रीनिवास हेमाडेतत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि  व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0