उ. प्रदेश विधान सभा निवडणूकः काँग्रेसचा स्वबळाचा नारा

उ. प्रदेश विधान सभा निवडणूकः काँग्रेसचा स्वबळाचा नारा

नवी दिल्लीः आगामी उ. प्रदेश विधानसभा निवडणुका आपण स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही, र

काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज
उद्योगस्नेही राजकीय शक्तीचा अभाव
गेहलोत सरकारला जोशी मदत करतील का?

नवी दिल्लीः आगामी उ. प्रदेश विधानसभा निवडणुका आपण स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही, राज्यातल्या विधानसभेच्या सर्व ४०३ जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार असल्याचे काँग्रेसच्या महासरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी बुलंद शहर येथे जाहीर केले.

उ. प्रदेशात योगी आदित्य नाथ सरकारच्या काळात दलित आणि मुस्लिम व अन्य अल्पसंख्याक जातींविरोधात अत्याचार झाले. गेल्या काही वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले. पण राज्यातले प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बसपा व सपाने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली नाही. त्याला काँग्रेसचा आक्षेप आहे. त्यामुळे या पक्षांशी युती न करता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

काही दिवसांपूर्वी जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दल पक्षाशी काँग्रेस युती करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रियंका गांधी व जयंत चौधरी एका विमानाने दिल्लीहून लखनौला गेले होते. त्यानंतर युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता काँग्रेसने एकला चलो रेचा निर्णय घेतला आहे.

२०१७च्या उन्नाव बलात्कार व हत्याकांड प्रकरण आणि त्यानंतर २०२०मध्ये झालेले हाथरस प्रकरण यात सपा व बसपाकडून कोणताही विरोध दिसला नाही. या काळात या दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते मूकपणे सर्व काही पाहात होते. अशा कठीण काळात फक्त काँग्रेसने सामान्य माणसाच्या बाजूने लढा देण्याचा प्रयत्न केला असे प्रियंका गांधी यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसच्या या भूमिकेसंदर्भात पक्षातील एका नेत्याने सांगितले की, गेली ५ वर्षे उ. प्रदेशातील विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक बाबींवर काँग्रेसने सातत्याने जनतेच्या हिताची भूमिका घेतली आहे. या वेळी पक्ष संघटना वाढवणे, कार्यकर्त्यांना विधायक कार्यक्रम देणे व संघटनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले गेले. आता पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या निमित्ताने संधी देण्याची वेळ आली असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे असल्याने पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी बुलंदशहर येथील अनुपशहर भागात प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना उ. प्रदेशातील विधान सभा निवडणूक काँग्रेससाठी करा किंवा मरा अशी असून सर्व कार्यकर्त्यांनी झटून काम करावे अशी विनंती केली.

गेल्या काही दिवसांत प्रियंका गांधी यांनी बुलंदशहरमध्ये राज्यातल्या १४ जिल्ह्यातल्या ७,४०० पक्ष कार्यकर्ते, पदाधिकार्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी काँग्रेसचा सोशल मीडिया अधिक सक्रीय करणे, जनतेपुढे सत्ताधारी सरकारची अपयश कामगिरी सांगणे, पक्षाकडून विधायक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. महागाई, इंधनाचे वाढते दर या महत्त्वाच्या मुद्यांवर राज्य सरकारला कोंडीत धरण्याची रणनीती आखावी अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

उ. प्रदेशातल्या २०१७च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी अत्यंत दारुण अशी झाली होती. त्या वेळी काँग्रेसला फक्त ७ जागा मिळाल्या होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0