दावा म्हणजे औषध नव्हे!

दावा म्हणजे औषध नव्हे!

कोरोनावर औषध शोधल्याचे खूप दावे सध्या होऊ लागले आहेत. इलेक्ट्रॉनिक मिडियावरही ‘ब्रेकिंग न्यूज, अब तक की सबसे बडी खबर’, असे म्हणत वेड्यासारखा थयथयाट सुरू आहे. त्यामुळे औषधं, त्यांची परिणामकारकता आणि दावे याविषयी खऱ्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

राष्ट्रपती भवनातील ११५ कुटुंबे विलिगीकरणात
रविवारी ‘जनता कर्फ्यु’ – मोदींचे आवाहन
भारतात कोरोनाचे २ रुग्ण, जगभरात ८८ हजारांना लागण

कुठलाही उपाय किंवा कुठलीही गोष्ट ही ‘औषध सापडले’, म्हणून वृत्त वाहिन्या दाखवू शकतात, पण अनेक वाहिन्यांवर दाखवलंय, अनेक जण तसं म्हणत आहेत, अनेक जण ते घेत आहेत, म्हणून ते ‘औषध’ होत नसतं!

उपाय, उपचार, लस आणि औषध, म्हणजे नेमके काय?

१.  एखादा रोग किंवा विकार आपल्या शरीरात आल्यावर कसा वागेल, काय परिणाम करेल, कधी जाईल, याचा अभ्यास करणाऱ्या मॉडर्न मेडिसिनच्या (अॅलोपॅथीला आता मॉडर्न मेडिसीन म्हणलं जातं) ब्रँचला ‘पॅथॉलॉजी’ म्हणतात आणि आपल्या शरीरात इन्फेक्शन/रोग गेल्यावर किंवा विकार झाल्यावर तो शरीरात जो धुमाकूळ माजवतो, त्याचा ‘नॅचरल कोर्स’ कसा असतो, त्याला ‘पॅथोजेनेसीस’ म्हणतात.

कोरोनाचा ‘कोविड १९’ हा विषाणू ८० ते ८५ टक्के लोकांमध्ये काहीच लक्षणं दाखवत नाही. १० ते १५ टक्के लोकांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे दिसतात. ७ ते १० टक्के लोक आयसीयूत जातात, तर ३ ते ५ टक्के लोक मरण पावतात, असा आतापर्यंतचा अभ्यास आहे.

मग जर कोणी दावा केला, की आमचं औषध घेतलेल्या लोकांना कोरोनाचा काहीच त्रास झाला नाही, तर ते बरोबर नाही, कारण ८० टक्के लोकांना असंही काही होत नाही. त्यांनी निवडलेले लोक नेमके याच ऐंशी टक्क्यांमधले असू शकतात. त्यांच्या इतक्या मोठ्या भ्रामक आणि नकारात्मक परिणामाला कमी करायचं असेल तर पन्नास शंभर रुग्णांवर नव्हे, तर हजारो रुग्णांवर प्रयोग झाले पाहिजेत, तेही वेगवेगळ्या स्टेजमधल्या..

२.  या पॅथॉजेनेसीसच्या कुठल्या टप्प्यावर कुठले औषध उपयुक्त आहे, हे वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ काही अँटिबायोटिक्स bacteriostatic असतात, (म्हणजे ते बॅक्टेरियाचे मल्टिप्लिकेशन थांबवतात) तर काही अँटिबायोटिक्स bacteriocidal असतात (म्हणजे असलेले बॅक्टेरिया मारून टाकतात). तर काही दोन्ही असतात. तसंच anti viral drugs चंही असतं. एकंच अँटिबायोटिक सगळ्या बॅक्टेरियावर चालत नाही. ठराविक अँटिबायोटिक्संच त्यांचं पेशीआवरण (Cell wall) भेदू शकतात किंवा इतर पध्दतीने मारा करू शकतात.

म्हणून एखादं इन्फेक्शन झालं, तर त्या आजारात अमुक अँटिबायोटिक ९९ टक्के परिणामकारक असते, दुसरे एखादे ९० टक्के परिणामकारक, तर आणखी एखादे ५० टक्के परिणामकारक असते, तर एखादे शून्य उपयोगाचं असू शकतं.

म्हणून, गेल्या वेळी आजारी (इन्फेक्शन) झाल्यावर डॉक्टरांनी या गोळ्या दिल्या होत्या, म्हणून आताही मी त्याच गोळ्या परस्पर खातो, हे बहुधा बरोबर असत नाही.

३.  स्ट्रेन्स (Strain) म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे बॅक्टेरिया/व्हायरस म्युटेट (mutate) होऊन स्वतःचं रूप/फॉर्म बदलतो. त्या त्याच्या वेगवेगळ्या आकारांना (फॉर्म्सना) स्ट्रेन्स (किंवा variants किंवा serotypes) म्हणतात. म्युटेशन (Mutation) म्हणजे जीन्सच्या स्तरावर घडलेला सूक्ष्म बदल.

समजा एखाद्या गोऱ्या युरोपियन व्यक्तीला आफ्रिकेत कडक उन्हात राहावं लागू लागलं, तर त्याच्या त्वचेवरचं मेलानिन (melanin deposition) वाढू लागतं, त्वचा काळी (डार्क) व्हायला लागते. काही पिढ्यांनंतर तर जन्मतःच मूल डार्क असायला लागते. म्हणजे तो बदल जीन्स मध्येच होतो. डीडीटी( DDT) हे पिकांवरचं औषध आलं, तेंव्हा जितकं परिणामकारक होतं तितकं आता उरलं नाही. म्हणजे त्या रोगाच्या जंतूंमध्ये डीडीटीसोबत लढायची ताकद काही पिढ्यांनंतर तयार झाली आहे.

समजा, तुम्ही क्षयरोगाचे (TB) च्या औषधाचे डोस सतत चुकवले किंवा मध्येच उपचार सोडले, तर ते क्षयाचे जंतू औषधांना प्रतिसाद द्यायचं कमी किंवा चक्क बंद करतात. त्याला एमडीआर टिबी (Multi drug resistant TB – MDR TB ) म्हणतात. यात मग दुसरी औषधं वापरावी लागतात किंवा जगण्याची शाश्वती नसते.

म्हणजे, म्युटेशन ही त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसची जगण्यासाठीची धडपड असते. होस्टसोबत जुळवून घेण्यासाठीचा त्याने केलेला प्रयत्न असतो. एचआयव्ही (HIV) विषाणूचे देखील दोन स्ट्रेन्स सापडले आहेत.

या वेगवेगळ्या स्ट्रेन्समुळे तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात कसा वागेल, हे बदलतं. हे तपासणारे चाचणी किट्स (test kits) बदलतात. याची लक्षणं, कोर्स, घातकता बदलते आणि यावरची लस आणि औषधंही बदलतात.

पूर्वी आलेले एमईआरएस (MERS) आणि सार्स (SARS) हे विषाणूही कोरोना कुटुंबातीलच आहेत. सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कोविड (Covid-19) चा नोव्हेल कोरोना विषाणू आहे. वेगवेगळ्या देशातून त्याचे आतापर्यंत सहा स्ट्रेन्स समोर आले आहेत. त्यातले तीन प्रकार (serotypes)सर्व ठिकाणी दिसतात. जे सध्या चाचणी किट्स (test kits) सध्या आहेत, ते सर्वांत माहिती असलेल्या स्ट्रेन्सला शोधू शकतात. पण बाकीच्या स्ट्रेन्सचे शोध घेणे अजूनही अवघड असल्याने भ्रामक आणि नकारात्मक (falls negative) निकाल येऊ शकतात. ‘कोविड १९’च्या या म्युटेशनमुळेच लस बनवायलाही उशीर होत आहे.

४. प्रत्येक चाचणी किट्स (test kit) ची अचूकता (Specificity) आणि संवेदनशीलता (sensitivity) हा प्रकार असतो.

अचूकता (Specificity) म्हणजे नेमका तोच व्हायरस शोधण्याची (detect) करण्याची क्षमता. तर संवेदनशीलता (Sensitivity) म्हणजे तपासणीसाठी दिलेल्या नमुन्यातील (सॅम्पल) अत्यल्प प्रमाणही शोधून काढण्याची क्षमता.

जितकी अचूकता जास्त, तितकं फॉल्स पॉझिटिव्ह (false positive) येण्याचं प्रमाण कमी आणि जितकी संवेदनशीलता जास्त, तितकं फॉल्स आणि निगेटिव्ह येण्याचं प्रमाण कमी असतं.

आणि ही अचूकता आणि संवेदनशीलता ही कोणत्याही चाचणीच्या प्रकारानुसार आणि टेस्टिंग किट्सच्या प्रकारांनुसार देखील बदलते.

‘कोविड-१९’ साठीचे सध्याचे जे ‘आरटीपीसीआर’ (rtPCR test kits) आहेत, त्यांची अचूकता ९० टक्के आहे. म्हणजे टेस्टसचे निकाल नक्की करण्यासाठी कमीत कमी दोन टेस्टस करायला लागतात. दोन टेस्ट्सनंतर भ्रामक आणि नकारात्मक प्रमाण १ टक्का इतके उरतं आणि तीन टेस्ट्स नंतर ते <०.१ टक्के होतं..

५. लस म्हणजे व्हॅक्सिन. रोगाचा तो प्रतिबंधात्मक उपाय आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की उपाय आणि उपचार यातही फरक असतो. उपाय हे सहाय्यकारी (supportive) असतात, तर उपचार हे नेमके असतात. वेदना कमी करण्याचे उपाय, लक्षणांवरचे उपाय आणि प्रतिबंधात्मक (Preventive) उपाय, हे उपचारांचा भाग असते..

डोकेदुखीवर अमृतांजन लावणे, हा ‘उपाय’ झाला, ‘उपचार’ नाही. ती डोकेदुखी ताणतणाव किंवा इतर तात्पुरत्या कारणांनी असेल, तर उपायांवर भागतं, पण तसं नसेल तर मात्र एम आर आय (MRI) सारख्या तपासण्या करून योग्य निदान आणि त्याचे उपचार केलेच पाहिजेत. पण जर समजा कोणी अमृतांजन हाच डोकेदुखीचा उपचार आहे, असा प्रसार करू लागला, तर ते शास्त्रीय दृष्टिकोनातून तितकंसं बरोबर ठरत नाही..

व्हॅक्सिन हे रोग व्हायच्या आधीच (prevention म्हणून) घ्यायचे असते. ते खूप संबंधीत (specific) असते आणि ते त्या त्या रोगाच्या (मेलेल्या किंवा निष्प्रभ केलेल्या) व्हायरसपासूनच बनवले जाते. ते टोचल्यानंतर शरीरात त्या ठराविक व्हायरस विरुद्धच प्रतिपिंडे (antibodies) तयार होतात. म्हणून घाऊक प्रमाणात इम्युनिटी वाढविणारी लस शोधल्याचा दावा करणे आणि कोणी त्यावर विश्वास ठेवणे हा तर अज्ञानाचा कळस आहे.

६.   औषध म्हणजे तरी काय असतं? ते रसायन असतं, केमिकलच असतं. एखादा मोलेक्युल किंवा मिक्श्चर (compound) असते.. मग ते प्रयोगशाळेत बनवलेलं असो किंवा जडिबुटीतून काढलेलं असो, ते केमिकलच असतं..

आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन) हे फार तर फार १५०-२०० वर्षांपासून आपली पाळेमुळे घट्ट करत आले आहे. ते काही आकाशातून पडलेले नाही. वनस्पती, खडक, बुरशी आणि इतरही अनेक नैसर्गिक स्त्रोतांपासून आपल्या रोगावर नेमका परिणाम करणारा मोलेक्यूल (molecule किंवा compound) आधुनिक पद्धतीने प्रयोगशाळेत वेगळे केले जाते. जसे जसे विज्ञानात निरनिराळे शोध लागत गेले तसे त्यांचा वापर या आधुनिक वैद्यकाने करून घेतला आणि अनेक रोगांवर नैसर्गिक मॉलेक्युल, सेमी सिंथेटिक आणि पूर्णपणे सिंथेटिक मॉलेक्युल शोधले. प्रयोगशाळेत आणि वैद्यकीय चाचण्या (Clinical trials) वापरून आणि पुराव्यांच्या आधारे (Evidence based study) अभ्यास करून जास्तीत जास्त परीणामकतेच्या जवळ जायचा प्रयत्न केला. इतर परिणाम (Side effects) कमी कसे होतील, हे ही पाहिले. निरनिराळ्या विषाणू आणि जीवणू यांचा अभ्यास (pathogenesis) करून त्यांच्या जीवनचक्रात नेमका कुठे व कसा आपण औषधांचा वापर करू शकतो हे शोधले. त्यांच्यावर लसी (vaccines) शोधल्या.

उदाहरणार्थ, सर्पगंधा या वनस्पती पासूनच Reserpin हे रकतदाबावरचे औषध बनवलेले आहे. Papaver Somniferum या झाडापासून आपल्याला मिळते ती अफू. त्याचा प्रयोगशाळेमधून शुद्ध मॉलेक्युल मिळवला तर त्याला मॉर्फीन म्हणतात. मॉर्फीनच्या अणू रचनेतून काही अणू बदलून आपण डाय मॉरफीन (Diamorphine) आणि बुरप्रेनॉरफीन (Buprenorphin) मिळवतो.  ज्यात मॉरफीनचे बरेच साईड इफेक्ट कमी केलेले आहेत. तशीच संरचना असलेले पण वेगळे असे फेंटानाईल (Fentanyl, Alfentanyl, Sufentanyl ) ही अत्यंत भारी पेन किलर्स (pain killers) आपण पूर्णपणे प्रयोगशाळेत शोधलेली आहेत. ही मॉर्फीनपेक्षा कैक पटींनी भारी आहेत आणि सुरक्षितही आहेत..

म्हणजे, अफू झाली हर्बल ड्रग, मॉरफीन झालं नॅचरल ड्रग, बुरप्रेनॉरफीन झालं सेमी सिंथेटिक ड्रग, तर फेंटाईल झालं सिंथेटिक ड्रग. म्हणून, “हर्बल म्हणजे चांगलं आणि सिंथेटिक म्हणजे वाईटच”, असा आपल्याकडं समज आहे तो चुकीचा आहे.. उलट सिंथेटिक मॉलेक्युल ‘नेमका’ परिणाम करतो म्हणूनच तो शोधला गेलेला असतो आणि चाचण्या करून स्पर्धेमध्ये टिकलेलाही असतो.

७.  कुठलंही औषध मग ते नैसर्गिक असो वा सिंथेटिक, त्याचं फार्माकोडायनामिक्स (pharmacodynamics) ठरलेलं असतं. म्हणजे, ते तोंडावाटे दिलं तर किती शोषले (absorb) जाईल,  स्नायूंत इंजेक्शन दिलं तर किती, सलाईन मधून दिलं तर किती? वगैरे. दिलेल्यापैकी किती टक्के औषध ‘टार्गेट’ पर्यंत पोहोचेल, शरीरात किती काळ त्याचा जास्तीत जास्त परिणाम राहील, किती वेळानंतर डोस पुन्हा द्यावा लागेल. शरीरात आवश्यक तो परिणाम केल्यावर त्याचं चयापचय (metabolism ) कसं होईल, शरीरातून ते बाहेर कसं पडेल? या सगळ्याचा अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात.

दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक औषधासाठी त्याची काम करण्याची क्षमता (Potency) किती आणि परिणामकारकता किती हे माहिती असणं खूप आवश्यक असतं. समजा एखादं औषध कॅन्सरवर खूपच परिणामकारक आहे, पण फक्त पाच टक्के लोकांवरच त्याचा परिणाम दिसतो, तर मग अशी औषधे पास होऊन बाजारात येऊ शकत नाहीत. चाचणी पास व्हायला 90 टक्क्यांच्यावर परिणामकारकता ५० टक्क्यांच्यावर तरी लोकांमध्ये दिसली पाहिजे. याला त्या औषधाचा इडी५० (ED50) इंडेक्स म्हणतात.  डबल ब्लाईन्ड स्टडी (Double blind study) मध्ये डमी औषध वापरून आपण परिणामकारकता किती आणि प्लासीबो इफेक्ट किती ते तपासू शकतो..

उदाहरण सांगतो,  क्रोसिन तापावर का चालते? तर ते ८० टक्के लोकांमध्ये ते जास्तीत जास्त परिणाम (नव्वद टक्क्यांच्या वर) करते. म्हणून ते तापावर चालते. मग जर तुम्ही उरलेल्या वीस टक्क्यांत असाल तर तुम्ही म्हणता,  आर या डॉक्टरचा गुण नाही आला, चला डॉक्टर बदलून बघू! खरंतर तेंव्हा औषध बदलायची गरज असते.

उद्या समजा जर शरीरातील हॉर्मोनल बदलांमुळे, इम्युनिटीतील किंवा जीन्समधील बदलामुळे क्रोसीनला रिस्पॉन्स द्यायची आपली क्षमता कमी झाली, तर त्याला पर्याय म्हणून दुसरा मोलेक्युल शोधायची गरज आहे, क्रोसीनला कवटाळून बसण्यात काहीच अर्थ नाही. सतत बदलत अपडेट करीत राहिलं, तरच ती उपचारपद्धती(पॅथी) टिकते.. काहीही फिडबॅक न घेता, किंवा चाचण्या (trials) न घेता तेच तेच औषध चालू ठेवलं, तर तुमच्या उपचारांची परिणामकारकता आणि उपचारपद्धती दोन्हीही काळाच्या कसोटीवर मागं मागं जाऊ लागतात.

त्यासाठी सतत संशोधनाची गरज असते, क्लिनिकल ट्रायल्सची गरज असते, फीडबॅकच्या नोंदीची गरज असते. म्हणून पोकळ दावे करून काही उपयोग नाही, रिझल्ट्स मिळाले पाहिजेत आणि त्यात सातत्यही राहिलं पाहिजे.

उत्क्रांतीत प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रात बदल होत असतात. पिढ्या दर पिढ्या रोगप्रतिकार शक्तीत बदल घडतो.  एकाच वेळेसचीही समाजाची प्रतिकार क्षमता ( हर्ड इम्यूनिटी herd immunity) वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते.. प्रत्येक व्यक्तीगणीकही प्रभाव कमीजास्त होऊ शकतो. प्रत्येकाचं जेनेटिक मेकअप वेगळं असल्याने औषधाचं फार्माकोडायनामिक्स (pharmacodynamics) बदलतं. (दारू प्रत्येकाला वेगळी चढते, तसं काहीसं..)  सामाजिक-आर्थिक, पर्यावरणीय घटकही औषधांच्या फार्माकोडायनामिक्सवर प्रभाव टाकत असतात. त्याचा सतत अभ्यास करून नोंदी ठेवाव्या लागतात. ‘सब घोडे बारा टक्के’ असं सायन्समध्ये नसतं.

८.   औषधं हे केमिकलच असतं हे आपण पाहिलंय. जे एखादं केमिकल आपण अन्न म्हणून खात असू, ते दुसऱ्या एखाद्या प्राण्यासाठी विष देखील असू शकतं. सडलेलं मांस खाल्लं तर आपण मरू कदाचित, पण गिधाडे ते सहज पचवू शकतात, त्यांचं ते अन्न असतं.  कारण ते पचवायची विकरं (Enzymes) त्यांच्याकडं असतात. विंचवाच्या विषाचं भिंतीवरच्या पालीला काही होत नाही, कारण ते केमिकल पचवायची/त्याला निष्प्रभ करायची/किंवा त्याचा परिणाम न होऊ द्यायची ‘सिस्टीम’ पालीत विकसित असते. तसंच माणसातही काहींना विंचू चढतो, तर काहींना नाही.

सापाच्या किंवा विंचवाच्या विषाचा एखाद्यावर कमी परिणाम झाला (किंवा परिणामच झाला नाही) तर त्याचं क्रेडिट नेमकं त्यावेळी त्याला खायला दिलेल्या एखाद्या झाडपाल्याला किंवा कुठल्या मंत्रतंत्राला आपण देणार असू, तर ते आपलं निव्वळ अज्ञान असतं.

९.  जेंव्हा कोणतीही गोष्ट औषध म्हणून शोधली जाते किंवा तसा दावा करण्यात येतो, तेंव्हा त्याच्या शास्त्रशुद्ध (सायंटिफिक) ट्रायल्स घ्याव्या लागतात.

एखाद्याने ‘माती’ जरी कोरोनावर उपाय म्हणून शोधली, तरी काही हरकत नाही. त्या मातीच्या घटकांचे (ingredients) मोलेक्यूल प्रमाणित ( molecule standardization) करणे, त्याची आधी प्राण्यांमध्ये चाचणी (Randomized control trial) घेणे, मग मानवी स्वयंसेवकांमध्ये (human volunteers) मध्ये चाचणी (Double blind study) करून त्याचा परिणाम (Placebo ) नोंदवणे (rule out) आणि मग मोठ्या प्रमाणावर त्याच्या मानवी (human trials) चाचण्या घेणे आणि मग औषध प्राधिकरणाकडून (FDA) संमती घेणे. अशी चाचण्यांची जगमान्य पद्धत आहे, ती तशीच पार केली पाहिजे. औषधांच्याच बाबतीत नव्हे तर संशोधनाच्या इतर शाखांत देखील चाचण्यांची अशीच पद्धत असते. म्हणून ‘आमच्या पॅथीची औषधे तुमच्या चाचण्या लावून कशा तपासण्यात येतील’ असं म्हणणारा निव्वळ अज्ञानी असतो.

रोगावरचे कोणतेही उपाय हे औषध नसतात, ते फक्त उपाय असतात. उपयुक्तता चाचणीतून गेल्याशिवाय आणि औषध प्राधिकरणाची मान्यता (FDA approval) असल्याशिवाय कोणताही उपाय ‘औषध’ होत नाही. कोणाच्या भावनांना किंवा वैयक्तिक अनुभवांना तिथं स्थान नसते. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’, असा मामला असतो. केवळ ‘आमच्या पुस्तकांत लिहिलंय’, ही गोष्ट ‘सबब’ म्हणून चालून जाईल, पण ते शास्त्रीय (scientific) होत नाही.

१०.  अजून एक प्रकार कोणत्याही औषधाच्या बाबतीत महत्त्वाचा असतो. तो म्हणजे त्यांचं प्रमाणीकरण (Standardization). एका मिलीग्राममध्ये किती अॅक्टिव्ह मोलेक्युल असावेत, एक डोस किती मिलिग्रामचा असावा, याला प्रमाणीकरण म्हणतात. समजा एखादी कॅप्सूल लहान आतड्यात विरघळणारी बनवायची असते. कारण तिथं त्या औषधाचं शोषले जाण्याचं प्रमाण (absorption) जास्त असतं, पण जर का ती जठरातच विरघळून गेली तर उपयोग होत नाही, अपेक्षित परिणाम मिळत नाही.

घरगुती बनवल्या जाणाऱ्या औषधांची किंवा औषध प्राधिकरणाचं काहीही नियंत्रण नसलेल्या औषधांची प्रमाणीकरणाची (Standardizationची) शाश्वती असेलच असं नाही.

११.  रोग आणि विकार हे देखील वेगवेगळे आहे. रोग म्हणजे डिसीज (disease) आणि विकार म्हणजे डिसऑर्डर (disorder). नेहमीच्या गोष्टी (‘Order’) बिघडल्याने होणारे आजार म्हणजे विकार (disorders). डायबेटीस हा विकार आहे तो रोग नाही. तसेच काही आजार हे मनोकायिक असतात. मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (Psychosomatic). याबद्दल गुगलवर अधिक माहिती मिळेल. आपल्याला जालीम औषध मिळालंय, किंवा आपल्याला चांगला डॉक्टर भेटलाय या विचारांनी सुद्धा रुग्णाच्या लक्षणांमध्ये फरक पडायला लागतो. ‘डॉक्टरने दोन शब्द गोड बोलले तरी निम्मा आजार पळून जातो’ हे आपल्याकडे म्हणलं जातं ते यामुळेच. पण याचाच फायदा बऱ्याच पॅथी घेतात. पॅथीचं सोडा, याचा फायदा बाबा बुवा हकीम यांना देखील होतो. मंत्रतंत्र, गंडादोरा यांनी होणाऱ्या काहीशा मनोकायिक परिणामांमुळे त्यांचं फावतं, अन त्याचीच प्रसिद्धी जास्त होते. पण ज्यांना काही फरक पडला नाही, ते लोक मात्र गप्प बसतात अन उपचारांचा मार्ग बदलतात.

खूप साऱ्या लोकांना आपल्याकडं ‘आजाराचा स्वीकार’ करता येत नाही. आपल्याला आजार झालाय, किंवा आपला आजार बरा होणारा नाही, याला सामोरं जाता येत नाही. आजाराविरुद्ध लढण्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद कमी असल्यास, माणूस चमत्कारांच्या आणि भोंदूच्या मागे लागतो.  मग हे भोंदू लोक देवाधर्माच्या सहाऱ्याने किंवा सिद्धी प्राप्त असल्याचा बहाणा करत अनेक तंत्रमंत्र, तोडगे, झाडपाला, जडिबुटी विकतात आणि श्रीमंत होतात. घेणाऱ्याला पण आजारासाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळतं. पण हा उपचार नसतो. त्याने तुम्ही आर्थिक आणि भावनिक दुष्टचक्रात सापडता..

“इसे सुबह शाम खाने से डायबेटीस, ब्लडप्रेशर, तथा हृदयरोग जैसी बीमारियां नष्ट होगी”, म्हणणारी औषधे. एक महिन्यात वजन उतरवून शरीर पिळदार करणाऱ्या गोळ्या. स्तन सुडौल करणाऱ्या क्रीम्स, आणि भूक वाढवते, इम्युनिटी वाढवते म्हणत जाहिरातबाजीतून हातोहात खपणारी टॉनिके. ही सगळी याच कॅटेगरीतली.

मॉडर्न मेडिसिन मधली पूर्वी शोधलेली कितीतरी औषधं आज निरुपयोगी (outdated) आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक परिणामकारक औषधांचा शोध लागला आहे. आणि अजून तो सुरूच आहे. एखादं औषध प्रमाणीत (FDA approved) झालं, पुस्तकांत छापलं म्हणजे ‘ते आता कायमचं झालं’ असं होत नाही. त्याचे फीडबॅक घेणं चालूच असतं. म्हणून २०० किंवा २००० वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात दिलं आहे, म्हणून आपण त्याच त्या औषधांची भलावण करत असू, (आणि त्यामुळं ते औषध authentic trials ना सामोरे जात नसेल), तर त्याच्या परिणामकारकतेची विश्वासार्हता कमी होते.  जे आपल्याच उपचारपद्धती साठी घातक असते. समजा, आज जर कोणी डॉक्टरला म्हणाले, की ‘पेनिसिलिनचा वापर अलीकडे अजिबात सुरक्षित नाही’, तर बोलणाऱ्याच्या अंगावर धावून जाणारा अलोपॅथीक डॉक्टर मी तरी अजून पाहिलेला नाही. किंवा एकेकाळच्या लाडक्या निमस्यूलाईड (Nimesulide) वर बंदी घातल्यावर अमेरिकेतील औषध प्राधिकरणाला (USFDA) ला कोणी शिवीगाळ केल्याचंही ऐकिवात नाही.

मला सांगा, औषधं आपल्यासाठी असतात की आपण औषधांसाठी असतो?

उपचारपद्धती आपल्यासाठी असतात की आपण उपचारपद्धतीसाठी असतो?

मग कुठल्याही औषधावर किंवा एखाद्या उपचारपद्धतीवर कोणी शंका उपस्थित केली, तर आपल्याला राग का येतो?   जर औषधं आपल्यासाठीच असतात तर त्यांच्या परिणामकारकतेवर कोणी शंका घेतली, तर त्याला अधिकृत अभ्यास (authenticated studies) दाखविणे, नसतील तर तो कसा होईल (किंवा होतील) त्याचा पाठपुरावा करणे, हे करण्यापेक्षा आपण जर समोरच्याला दूषणं देत असू, त्याची लायकी काढत असू तर मग आपण ‘सायन्स’ चे विद्यार्थी कसे?

सतत प्रश्न उपस्थित करत राहणे आणि कुठल्याही नव्या बदलाची तयारी ठेवणे, हे ‘सायन्स’च्या विद्यार्थ्यांचं पहिलं लक्षण आहे. एकदा का तुमच्यात पोथीनिष्ठता किंवा ग्रंथप्रामाण्य आलं, की तुमची प्रगती खुंटलीच म्हणून समजा.

आज मॉडर्न मेडिसिननं जी प्रगती केली आहे, त्याचं कारण त्याची विश्वासार्ह परिणामकारकता हेच आहे. ‘आपली स्वतःचीच चूक सुधारायची संधी जिथं असते’, ती गोष्ट जास्तीत जास्त परफेक्शनकडे जात असते. (ही गोष्ट व्यवहारात देखील लागू पडते). उदाहरण सांगायचं झालं, तर सोलापूरच्या डॉ. सुमन सरदेसाई यांनी प्री इक्लेमपसिया (Pre Eclampsia) साठीच्या अगोदर वापरात असलेल्या औषधाला  (Magsulf regime) आव्हान दिले आणि अत्यल्प उत्पन्न गटातील भारतीय महिलांसाठी नवे औषध (Magsulf regime) शोधून काढले. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या, अभ्यास केला, त्याचे फीडबॅक घेतले, त्याचे संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले. तिथून मान्यता घेतली. त्याला आता सोलापूर रिजीम (‘Solapur regime’) असं नावही दिलं. मग ते क्रमिक पुस्तका(टेक्स्ट बुक)मध्ये आले. आता हे क्रमिक पुस्तकामध्ये किती दिवस राहणार?  जोपर्यंत त्याला पुन्हा कोणी आव्हान देत नाही आणि नवा अभ्यास प्रसिद्ध करीत नाही तोपर्यंत! अजून पन्नास शंभर वर्षांनी समजा राहणीमानातले बदल, पर्यावरण, आहार, प्रतिकारक्षमता, यातल्या बदलामुळे कोणीतरी नवीन अभ्यास करून दाखवून देईल की सोलापूर रिजीम (Solapur regime) तितकेसे परिणामकारक उरले नाहीये. मग डॉ सरदेसाई यांचे चाहते त्या नवीन अभ्यास प्रसिद्ध करणाऱ्याच्या डोक्यात दगड घालणार नाहीत. तर ते त्याचे निकाल तपासतील, त्याची अधिकृतता (authentication) तपासतील आणि त्या नवीन अभ्यासाला मान्यता देतील. मॉडर्न मेडिसिनचं पुराव्यावर आधारित (Evidence based) होत जाणंच त्याला विश्वासार्हता देतं.

आपली पॅथी टिकवायची असेल तर ती जास्तीत परिणामकारक आणि विश्वासार्ह होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. औषधांच्या सत्यासत्यतेवर कोणी शंका घेतली, की नाराज न होता त्यांनी काय संदर्भ घेतलेत, त्यांचा डेटा बेस काय आहे, सॅम्पल साईझ किती निवडली आहे, बायस रुलआऊट केलेत का, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत.. तरंच आपण सायन्सचे विद्यार्थी. आपण ‘औषध की तरफ से’, नाही तर ‘सायन्स की तरफ से’ असलं पाहिजे.

आपल्याला आयुर्वेद, अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी माहिती असते. पण जगात मान्यता असलेल्या- नसलेल्या मिळून शंभरेक तरी उपचारपद्धती असतील. कोणत्याही एखाद्या उपचारपद्धतीच्या परिणामकारकते विषयी बोललं, की “तुम्हाला ज्यातलं ज्ञान नाही त्याविषयी बोलता कशाला”, असं प्रत्येकजणच म्हणतो. वास्तविक हा तर्कदोष (Fallacy) आहे. प्रत्येकवेळी अनुभव घेतल्याशिवाय बोलूच नये असं नसतं. त्या त्या विषयी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर केलेल्या अभ्यासावरून आणि चर्चेतून आपल्याला निष्कर्ष काढता येतो..

एखाद्या औषधाविषयी किंवा पॅथीविषयी बोललं, की त्या पॅथीचे लोक ते स्वतःवरच का घेतात?  समजा, ‘आपल्या पॅथीवर खूप प्रेम आहे म्हणून!’ असं गृहीत धरलं तर त्या पॅथीच्या प्रगतीसाठी आपण काय प्रयत्न करतो? त्या पॅथीची आपली निवड ऐच्छिक होती का? आताही त्या पॅथीचेच उपचार देण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत किंवा स्वतःसाठी घेण्यासाठी किती प्रयत्नशील आहोत? आपल्या पुढच्या पिढीला पण त्या पॅथीचेच शिक्षण घेण्यासाठी आपण किती आग्रही असू? या प्रश्नांची उत्तरे ज्याची त्यांनीच शोधायची आहेत.

“कोणत्याही औषधांबद्दल किंवा उपायांबद्दल अवास्तव दावे करत आहेत तर करू देत. ज्यांना घ्यायचंय ते घेतील ज्यांचा विश्वास नाही, ते नाही घेणार”. असं आपल्याकडं सर्रास म्हणलं जातं. त्यात या कोव्हीडच्या भीतीच्या काळात तर जास्तच.

पण आपल्या या ‘काही तोटा तर नाही ना, मग करून बघायला काय हरकत आहे’, अशा मानसिकतेचाच फायदा लोक उठवतात. आपल्या विश्वासावर आणि भावनांवर त्यांचा बाजार मांडतात आणि कसलेही सुरक्षित, परिणामकारक आणि प्रमाणित वगैरेंचे प्रोटोकॉल न पाळलेले उपाय ‘औषध’ म्हणून आपल्या माथी मारू शकतात. ही फसवणूक नव्हे तर काय आहे?  त्यामुळं एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकतं.

आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झाल्यास, अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नसलेली आणि भोंदू औषधं घेणाराने उगीच अती आत्मविश्वासात जाऊन मास्क, सॅनीटायझेशन, फिजिकल डिस्टनसिंगचे नियम पाळले नाहीत, तर त्याची सजा सगळ्यांनाच भोगावी लागणार आहे.

अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भोंदू लोकांच्या दाव्यांमुळे अन त्यांच्या तथाकथित औषधांमुळे लोक वैद्यकीय ट्रीटमेंट घ्यायचं सोडतात आणि मग अत्यंत वाईट पद्धतीने अडचणीत येतात. अनेकदा भोंदू धंदेवाईक बाबांमुळे लोकांचे आजार बळावतात आणि यांच्या नादी लागून सुरुवातीचा महत्वाचा वेळ घालवल्याने कॅन्सरसारखे आजार पुढच्या स्टेजमध्ये जातात. म्हणून, पॅरॅलीसिसपासून कॅन्सरपर्यंत सगळं बरं करणारा सॅबिस्टीन असो किंवा होली वॉटर पाजणारे भोंदू असो, उलेमा-सुलेमा असोत किंवा कोणी बाबा बुवा असो. कोणी का असेना.  यांनी काहीही गंडे दोरे बांधावे, कसलंही मंतरलेलं पाणी पाजावे, पण लोकांना मेडिकल ट्रीटमेंट बंद करायला मात्र सांगू नये, अन लोकांनीही त्यांचं ऐकून उपचार बंद करू नयेत.

जितकी मार्केटिंग हे लोक स्वतःच्या औषधांची करतात आणि जितकी प्रसिद्धी ते स्वतःच्या तात्पुरत्या रिझल्टसला देतात, तितकी अपकिर्ती त्यांच्या अपयशाची मात्र होत नाही. फसलेले लोक ‘आपल्यालाच पथ्यपाणी सांभाळणं झालं नाही’, वगैरे समजूती करून घेऊन गप्प बसतात आणि नवीन लोक फसतच जातात.

फसवणारे असतात म्हणून लोक फसतात, आणि फसणारे असतात म्हणून काही जण फसवतात. फसणं-फसवणं चालूच राहणार आहे. पण ज्ञानाच्या आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या मदतीनं आपण ते आपल्या आणि आपल्या आजूबाजूंच्या पुरतं तरी टाळू शकतो.

डॉ सचिन लांडगे, हे डॉक्टर असून, वैद्यकीय शास्त्राचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0