बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

मुंबई : बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला बोलवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिले असून,

राजस्थान विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव
लढवय्यी लोव्हलिना बोर्गोहेन
८ महत्त्वाच्या क्षेत्रांना मंदीचे धक्के

मुंबई : बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला बोलवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिले असून, शिवसेना या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य विधानसभेच्या सचिवांना ३० जून रोजी विशेष अधिवेशन घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातील विश्वासदर्शक ठराव या एकाच उद्देशासाठी हे अधिवेशन बोलावण्यात यावे असे राज्यापालांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हे आदेश राज्यपालांनी मागे घ्यावेत कारण आमदारांच्या आपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या विषयावर न्यायालयात संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार असून, त्यामध्ये केंद्र सरकारही आपली बाजू मांडणार आहे.

३९ आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ७ आमदारांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील परिस्थिती लक्षात आणून दिली आहे. राज्यातील सरकारने बहुमत गमावल्याचे निदर्शनास आणले आहे.

अधिवेशनची कार्यवाही ३० जूनला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण करावी.  आमदारांना सुरक्षा पुरवावी. अधिवेशनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. त्याचे लाईव्ह प्रसारण करावे. अधिवेशनाची कार्यवाही ५ वाजेपर्यंत पूर्ण करावी आणि कोणत्याही परिस्थितीत सभागृह तहकूब करू नये, असे राज्यपालांनी विधानमंडळ सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.

सरकार अल्पमतात आले असून, सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असे पत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी रात्री राज्यपालांना देण्यात आले.

भारतीय जनता पक्षातर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनघंटीवार, प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र दिले आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर माध्यमांना माहिती दिली होती. ते म्हणाले होते, “आम्ही राज्यपालांना इमेलने आणि प्रत्यक्ष भेटून, पत्र दिले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, की ते कॉँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर राहू इच्छित नाही. त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावे.” फडणवीस म्हणाले, की राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: