हिस्ट्री रिपिट्स इटसेल्फ...इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असतो... हे वाक्य उघड्या डोळ्यांनी तपासलं. ते तपासताना वर्तमान वास्तवाचा अदमास घेतला की, मुसोलिनी-हिटरलरप्रणित फॅसिझमचा अर्थही लागतो आणि भारताची आताची दिशाही स्पष्ट होते. मुसोलिनीच्या नॅशनलिस्ट फॅसिस्ट पार्टीच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने स्थानिक संदर्भाने लक्ष वेधून घेणाऱ्या फॅसिझमचे रचनाशास्त्र उलगडणारा हा लेख...
९ नोव्हेंबर १९२१ रोजी बेनिटो मुसोलिनी या इटालियन नेत्याने “पार्टीटो नाझिओनेल फॅसिस्टा” (नॅशनलिस्ट फॅसिस्ट पार्टी) या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला, या घटनेच्या शताब्दी वर्षात आता आपण वावरतो आहोत. ९९ वर्षांपूर्वीच्या या घटनेनंतर वर्षभरात या पक्षाची एक निमलष्करी शाखा ‘ब्लॅक शर्ट्स’ (Blackshirts) या नावाने सुरू करून फॅसिस्ट पक्ष व ब्लॅकशर्ट्स मार्फत जागोजाग सरकारविरोधी आंदोलने उभारून देशभर असंतोष माजवला. अखेर या ब्लॅकशर्ट्स च्या हजारो स्वयंसेवकांसह मुसोलिनी इटलीच्या राजधानीवर (मार्च ऑन रोम) चालून गेला आणि २९ ऑक्टोबर १९२२ रोजी या ब्लॅक शर्ट्सच्या स्वयंसेवकांच्या दबावाला बळी पडून इटलीच्या राज्यकर्त्यानं मुसोलिनीच्या हाती सत्ता सुपूर्द केली.
फॅसिझमची रुजुवात
सत्ता हाती घेण्यापूर्वी मुसोलिनीने निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार त्यानं दोन वर्षांत निवडणुका घेतल्या. या निवडणुकांत फॅसिस्ट पार्टी प्रचंड बहुमतानं विजयी होऊन पुन्हा मुसोलिनीच सत्ताधीश झाला. त्यानंतर मात्र मुसोलिनीने कायदेशीर – संविधानात्मक बदल करून मरेपर्यंत खुल्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत आणि तोच सर्वंकष एकमेव सत्ताधारी राहिला. सर्वंकष सत्ता हस्तगत करून सत्ता कायमस्वरूपी आपल्या एकट्याकडे ठेवण्याचं हे मुसोलिनीचं तंत्र जगभरातल्या त्या काळातल्या अनेक नेत्यांना भूरळ पाडत होतं. आपणही आपल्या देशात मुसोलिनीचं तंत्र राबवावं, असं त्यांना वाटत होतं. त्यात काही भारतीय नेतेही होते आणि जर्मनीचा हिटलरदेखील होता. पुढील दहा वर्षांत हिटलरनं मुसोलिनी आणि `नॅशनल फॅसिस्ट पार्टी‘ यांचं कौशल्य-तंत्र आत्मसात तर केलंच, पण पुढील दहा वर्षांत ते अधिकाधिक `विकसित‘ करून जर्मनीत अधिक `यशस्वीरित्या‘, अधिक `परिणामकारकरित्या‘ राबवलं.
कारकिर्दीच्या अखेरीस मुसोलिनीला जनतेच्या तीव्र रोषास-असंतोषास सामोरं जाऊन बळी पडावं लागलं. पण संपूर्ण जर्मनी उध्वस्त झाला, तरी हिटलरने आत्महत्या करेपर्यंत जनतेनं त्याच्याविरुद्ध उठाव केला नाही. म्हणून हिटलरचा फॅसिझम (याला नाझीझमदेखील म्हणतात) हा मुसोलिनीपेक्षा अधिक यशस्वी ठरतो.
वस्तुतः “फॅसो” (fascio) या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ मोळी, पेंढी किंवा `संघ‘. फॅसी (fasci) हे `फॅसो‘चे बहुवचन. जगभरातल्या सर्व भाषा परस्परांतले शब्द स्वीकारत असतात, बरेचदा परक्या भाषेतला शब्द आत्मसात करताना त्यांचे मूळ उच्चार आणि अर्थही बदलतात. पण, एखाद्या शब्दाचा मूळ भाषेतच अर्थ बदलला आणि तो शब्द जगभरातल्या सर्व भाषांमध्ये नवीन अर्थासह स्वीकारला गेला, असं उदाहरण विरळच. अशा विरळ शब्दांमध्ये `फॅसी‘ या शब्दाची गणना होईल.
मुसोलिनीच्या हाती इटलीची सत्ता आल्यानंतर इटलीसकट जगभर या शब्दाचा वापर विशिष्ट प्रकारच्या `राजकारणा‘साठी होऊ लागला. हा वापर इतका सर्रास झाला की त्यावरून पुढे `फॅसिझम‘ असा एक शब्द आणि अर्थात `इझम‘ देखील अस्तित्वात आला, त्या शब्दाची जगन्मान्य व्याख्यादेखील तयार झाली. “जनतेमध्ये आक्रमक राष्ट्रवाद, बहुसंख्याकवाद, बहुसंख्याकांचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व, पुराणमतवाद पसरवून, बहुसंख्याकांमध्ये अल्पसंख्याकांविषयी पराकोटीचा द्वेष भिनवून लोकप्रियता मिळवून सत्ता मिळवायची. मग बहुसंख्याकांना उदारमतवाद, लोकशाही यांविरुद्ध चिथावून एकाधिकारशाही स्थापन करायची. या साऱ्या प्रक्रियेत विरोधकांना नेस्तनाबूत करण्यास अफवा, असत्य पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमे ताब्यात घ्यायची व अर्थपुरवठ्यासाठी कॉर्पोरेट्सशी संगनमत करायचे” अशा प्रकारच्या राजकारणाला गेली ९९ वर्षे जगभरातल्या सर्व भाषांमध्ये `फॅसिझम” हाच शब्द वापरला जातो. एका अर्थी फॅसिझम म्हणजे हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही किंवा लष्करशाही असते. कारण फॅसिझममध्ये लष्करापासून, शिक्षण-क्रीडा आणि परराष्ट्र धोरणापर्यंत सर्वाधिकार एकाच व्यक्तीच्या हाती असतात. पण केवळ एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही किंवा लष्करशाही या एकेका शब्दांमध्ये किंवा अधिकृत व्याख्येत फॅसिझमचा अर्थ किंवा वर्णन सामावणं शक्य नाही. फॅसिझमचा खरा अर्थ समजण्यासाठी व्याख्येपेक्षा हिटलर जाणून घेणं आवश्यक आहे.
हिटलरची विघातक कार्यशैली
हिटलरच्या उदयाच्या काळात जर्मनीत तीन-चार प्रमुख पक्ष होते. १] सोशल डेमोक्रॅट्स – समता व बंधुत्व हा त्यांचा नारा होता २] ख्रिश्चन सोशलिस्ट- यांचा `ज्यू‘ना प्रखर विरोध असला, तरी पक्षाचे नेते मात्र खाजगीत `ज्यूं‘शी मैत्रीचे संबंध ठेवत. त्यांच्या नेत्याचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. नेत्यांच्या व त्यांच्या भाषणांच्या लोकप्रियतेच्या बळावर हा पक्ष अवलंबून होता. ३] पॅन जर्मन नॅशनॅलिस्ट – जर्मन वंश [प्रामुख्याने प्रोटेस्टंट] व जर्मन भूभागाचे एकीकरण आणि डाव्यांचा विरोध असे यांचे प्रमुख उद्दिष्ट होते [यांच्यातही बहुतांश जणांना `ज्यूं‘बद्दल द्वेष वाटे]. ४] कम्युनिस्ट- जर्मनीचा पराभव त्यांना साम्राज्यवाद-भांडवलदारीचा पराभव वाटत होता व जगातील कामगारांचे एकीकरण करून `वर्ग कलह‘ निर्माण करण्यासाठी, कामगार-क्रांतीसाठी चालून आलेली दुसरी सुवर्णसंधी वाटत होती [पहिली क्रांती बरोबर एक वर्षापूर्वी रशियात झाली होती.] याखेरीज अन्य पक्ष होतेच. परंतु ते प्रमुख चार पक्षांना आलटून पालटून पाठिंबा देत भुरट्या राजकारणातच गर्क होते. जर्मनीचा राजा कैसर पळून गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रॅट्सना आपोआप सत्ता मिळाली. वस्तुत: सत्ता व शरणागती या दोन्ही बाबी सोशल डेमोक्रॅट्सना परिस्थितीमुळे क्रमप्राप्त होत्या. परंतु बाकीच्या सर्व पक्षांनीशरणागतीचे खापर सोशल डेमोक्रॅट्सच्या माथी मारायला सुरुवात केली. तरीही त्यानंतरच्या पहिल्या संसदीय निवडणुकीत सोशल डेमोक्रॅट्सना १८५ जागा मिळाल्या. विविध प्रजासत्ताकवादी पक्षांना मिळून १६६ जागा, तर प्रजासत्ताकविरोधी [म्हणजे राजेशाही/हुकुमशाही वादी] पक्षांना ६३ जागा मिळाल्या. परिणामत: सोशल डेमोक्रॅट्स हा पक्ष इतर पक्षांच्या सहकार्याने कसाबसा सत्तेवर आला.
हिटलरची एकाधिकारशाही
यापुढील काळात जर्मनीवर युध्द व पराभव या दोन्हींचे प्रचंड परिणाम घडू लागले. पायाभूत सुविधा बऱ्याच अंशी उध्वस्त झाल्या होत्या, चलन फुगवटा प्रचंड होऊन महागाईने टोक गाठले होते. विरोधक तर होतेच, पण सत्तेत सहभागी असलेले पक्षदेखील सोशल डेमोक्रॅट्सना धमकावून अडचणीत आणत, स्वत:च्या मर्जीतल्या लोकांना सरकारी कंत्राटे मिळवून देत. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता. सर्व विरोधक व कम्युनिस्ट जनतेत सतत असंतोष माजवत होते. कम्युनिस्ट तर अव्याहतपणे सरकारी कर्मचाऱ्यांना संपासाठी हाक देऊन सत्ता उलथवण्यास चिथावणी देत होते. शरणागती करारावर सोशल डेमोक्रॅट्सना (नोव्हेंबर १९१८ मध्ये) सह्या कराव्या लागल्या होत्या, त्याबद्दल सर्व पक्ष त्यांच्यावर दोषारोप करत होते. या काळात हिटलरचा प्रभाव नगण्य असला, तरी त्याची लोकप्रियता मूळ धरू लागली होती. याच सुमारास, हिटलरनं सोशल डेमोक्रॅट्स विरुद्ध `नोव्हेंबरचे हरामखोर’ ही नवी संज्ञा तयार करून जनतेला चिथवायला सुरुवात केली आणि शरणागतीचे खापर सोशल डेमोक्रॅट्स बरोबरच अल्पसंख्य असलेल्या ‘ज्यूं’वर फोडायलाही सुरुवात केली.
या नव्या संज्ञेमुळे आणि `ज्यूं‘विरुद्ध चेतवलेल्या द्वेषामुळे हिटलरच्या लोकप्रियतेनं एकदम मुसंडी मारली. (त्याकाळी बहुतांश बँका-पतपेढ्यांसह सावकारी धंदा `ज्यूं‘च्या हाती होता. बरेचसे अवैध धंदेही `ज्यू‘ लोकांच्या हाती होते. तसेच काही `ज्यूं‘वर फितुरी केल्याचा व जर्मनीची काही गोपनीय कागदपत्रे शत्रूस विकल्याचा आरोप केला जात होता.) त्याकाळी युरोपियन्सना, विशेषत: जर्मन्सना `ज्यू‘ लोकांबद्दल कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे हिटलरने `ज्यूं‘च्या विरुध्द भाषणे देण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. लोकांच्या प्रतिसादाचा कानोसा घेऊन त्याने एप्रिल १९२०मध्ये आपल्या पक्षाचे नाव बदलून `नाझी‘ [नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी] असे नाव केले. व पक्षाचे धोरण व उद्दिष्ट जाहीर केले. : १] सर्व जर्मन भूमी एकत्र करून `विशाल जर्मनी‘ स्थापन करणे २] `ज्यूं‘चे नागरिकत्व काढून घेऊन सरकारी पदांवरून काढून टाकणे. त्यानंतर त्याने शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी `व्यायाम, खेळ व [जर्मन] संस्कृतीचे‘ प्रशिक्षण देण्यासाठी `एस. ए.‘ (स्टुर्मऍब्तेलंग) नामक एक संघटना सुरु करून जागोजाग त्या संघटनेच्या शाखा स्थापन केल्या. यानंतर लागलीच पक्षाची `एस.एस.‘ (शुट्झस्टॅफेल) नामक एक `निमलष्करी संघटना‘ही सुरु केली. जर्मन वंशाचा, संस्कृतीचा व देशाचा जाज्वल्य अभिमान तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य या नावाखाली प्रत्यक्षात मात्र विरोधकांबद्दल व विशेषतः `ज्यू‘ धर्मियांबाबत अफवा पसरवण्याचे, त्यांच्याबद्दल जनतेत द्वेष भिनवण्याचे विषारी कार्य `एसएस‘ व `एसए‘ या संघटना करीत असत. हे सर्व सांभाळण्यासाठी काय करावे हे सोशल डेमोक्रॅट्सना कळत देखील नव्हते. आणि कळले, तर उपाययोजना करण्याची धमकच त्यांच्या नेत्यांत नव्हती. अन्य पक्षीयांचा पाठिंबा मिळवत कशीबशी सत्ता टिकवण्याची केविलवाणी धडपड करण्यात त्यांचा शक्तिपात होत होता.
राजकीय खलनायक निर्मितीचे तंत्र
सुरुवातीच्या काळात केवळ २.६टक्के मते मिळवू शकणाऱ्या हिटलर आणि त्याच्या पक्षाला १९३२ साली, म्हणजे पुढील केवळ १०-१२ वर्षांत ३७ टक्के मते मिळाली. एवढी दीर्घ व वेगवान झेप नाझींनी घेतली, याचे एक कारण एसएस आणि एसए या संघटनांनी चोख बजावलेले `ज्यू‘ द्वेष पसरवण्याचे कार्य हे जितके होते, तितकेच शेवटच्या तीन वर्षांत आलेली जागतिक मंदी, त्यामुळे आलेली बेरोजगारी, भडकलेली महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार व ही सारी परिस्थिती हाताळण्यात सोशल डेमोक्रॅट्सना येणारे सपशेल अपयश, त्यांच्या नेतृत्वात असलेला दुबळेपणा हेदेखील होते! सर्व प्रश्नांवर सोशल डेमोक्रॅट्सकडे फक्त “शांतता, समता व बंधुभाव!” यापलीकडे उत्तर नव्हते.
परधर्म-परवंश द्वेषाची लागण
याउलट हिटलर बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार या साऱ्याचे अगदी सोप्पे कारण देत होता, ते म्हणजे `ज्यूं‘चा देशद्रोह व सोशल डेमोक्रॅट्सनी चालवलेले `ज्यूं‘चे तुष्टीकरण!! जणू देशभक्ती म्हणजेच `ज्यू‘ द्वेष!! त्यासाठी तो वेळोवेळी ज्यूंबाबतीत विविध अफवा पसरवत असे. या अफवा पसरवण्यात त्यावेळची प्रसारमाध्यमं खोट्या बातम्या देऊन त्याला साथ देत. हे जनतेला झटकन आकर्षून घेणारं राजकारण होतं. `ज्यूं‘चा द्वेष हा ते आपल्या देशभक्तीचा पुरावा मानू लागले. हिटलर त्याच्या सभांमध्ये गर्जत असे, “सोशल डेमोक्रॅट्स हा पक्ष म्हणजे समता व बंधुभावाचा बुरखा पांघरलेली रोगट वेश्या आहे!!” आणि जनता टाळ्यांचा कडकडाट करत असे. हिटलरच्या सभांना होणारी गर्दी पाहून कॉर्पोरेट्स मागे राहणे शक्यच नव्हते. हिटलरच्या बाहूंना आर्थिक बळ देण्यासाठी `हायडेलबर्ग‘च्या कारखानदारांपासून बीएमडब्ल्यू, फोक्स-वॅगनपर्यंत सारे विख्यात कॉर्पोरेट्स हिटलरचे गोडवे गात नाझींच्या तंबूत दाखल झाले. हे बळ वापरून कम्युनिस्टांसह अन्य पक्षांची मदत घेऊन [नाझी विरोधी] सोशल डेमोक्रॅट्सप्रणीत आघाडी सरकार विरुद्ध सप्टेंबर१९३२मध्ये अविश्वासाचा ठराव आणून हिटलर तो संमत करून घेऊ शकला. याच उद्योगांच्या `आर्थिक बळावर‘ पुढच्या मुदतपूर्व निवडणुकीत नोव्हेंबर १९३२ मध्ये नाझी पक्षाला ५४५ पैकी १९६ जागा मिळूनही तो चान्सलरपद हस्तगत करू शकला.
१९३२ सालच्या नोव्हेंबरमधल्या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला ६०८ पैकी १९६ जागा मिळून तो संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सोशल डेमोक्रॅटस, कम्युनिस्ट आणि सीएनपी या पक्षांना अनुक्रमे १२१, १०० व ५२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्याच्या मतांची टक्केवारी ३२ टक्क्यांपेक्षा कमी होती. म्हणजे, ६८ टक्के मतदान हिटलरविरोधी असूनही त्याचा नाझी पक्ष हा सर्वात प्रबळ पक्ष ठरला होता.
निवडणुकांचं फॅसिस्ट प्रारुप
पुढच्या दोन महिन्यात स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढून, उद्योगपतींच्या आर्थिक मदतीने अन्य पक्षीयांत तोडफोड करून त्यांच्यातल्या काही गटांचा आणि अध्यक्ष हिंडेनबुर्ग याचा पाठिंबा मिळवून हिटलर चॅन्सलरपदी (प्रधानमंत्रीपदी) विराजमान झाला. स्वतः चॅन्सलरपदी आल्याबरोबर त्यानं गृहमंत्रीपदी आणि संसदेच्या अध्यक्षपदी (सभापती) आपला अत्यंत विश्वासू साथीदार `गोअरिंग‘ याची नेमणूक करून लगेच पुन्हा निवडणुका घेण्यासाठी अध्यक्षांमार्फत संसद बरखास्त करून घेतली. अर्थात संसद बरखास्त झाली तरी सत्ता हिटलरच्याच हाती होती. पुढच्या महिनाभरात गृहमंत्री गोअरिंगने पोलिसांमधल्या ८० टक्के जागा नाझींनी भरून टाकल्या. यानंतर कम्युनिस्ट आणि नाझींच्यात जागोजाग हाणामाऱ्या घडवून, हिंसाचाराचे कारण पुढे करत कम्युनिस्ट पक्षावर बंदी आणली. निवडणुकांची तारीख घोषित झाली ५ मार्च १९३३.
२० फेब्रुवारीला हिटलरने गोअरिंगच्या अध्यक्षीय निवासस्थानी काही उद्योगपतींची आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यांना सांगितलं, “ही निवडणूक शेवटची व्हावी. यानंतर पुन्हा निवडणूक घेण्याची गरज पडायला नको अशी माझी इच्छा आहे. यानंतर एकाच आठवड्यात, २७ फेब्रुवारी रोजी, म्हणजे निवडणुकीला एक आठवडा उरला असताना अचानक राईशटॅगला प्रचंड मोठी आग लागली. राईशटॅगला आग लागल्याची बातमी ऐकून हिटलर, त्याचा विश्वासू सहकारी गोबेल्स आणि गोअरिंग थोड्याच अवधीत तिथे पोहोचले. आग पाहून गोअरिंग म्हणाला, “हे कम्युनिस्टांचेच कृत्य असणार.” गोअरिंगचे हे वाक्य संपतानाच पोलिसांनी `लुबी‘ नावाच्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याला संसद भवनातून पकडून बाहेर आणले. हिटलरने त्वरित ४००० नाझीविरोधी व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबले आणि रेडियोवरून भाषणे करून `राईशटॅग फायर‘चे खापर नाझीविरोधी राजकारण्यांवर फोडायला सुरुवात केली.
गोअरिंग आणि हिटलर रेडियोवरून गर्जू लागले, “संसद भवन जाळणाऱ्या देशद्रोह्यांना धडा शिकवल्याखेरीज आम्ही थांबणार नाही. राष्ट्रशक्ती आणि पोलिसांची शक्ती वापरून या देशद्रोह्यांचा नायनाट केला जाईल.” हिटलरच्या अगोदरचा पंतप्रधान ( चॅन्सलर ) हेन्रिच ब्रुएनिंग हा अध्यक्षांपासून जनतेपर्यंत सर्वांना आवाहन करत होता, “अध्यक्षांना विनंती आहे की, जुलुमाच्या या थैमानाला आवर घाला. राईशटॅगच्या आगीची सखोल चौकशी करा. संविधानाचे पावित्र्य राखून सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचा आमचा निर्धार आहे.” पण जनतेला राष्ट्रवादाचा आणि निवडणुकीचा ज्वर इतका चढला होता की, या माजी प्रधानमंत्र्याच्या विनंतीला कोणीही भीक घातली नाही.
आता, जर्मनीच्या संपूर्ण मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्गाच्या राष्ट्रवादाला `राईशटॅग फायर‘ मुळे उधाण आलं होतं. राईशटॅगवरचा हल्ला जनतेला जर्मन सार्वभौमत्वावरचा, लोकशाहीवरचा हल्ला वाटत होता. नाझीविरोध म्हणजेच राष्ट्रद्रोह याची मध्यमवर्गाला खात्रीच पटली होती. ५ मार्चला निवडणूक झाली आणि नाझी पक्षाला २८८ जागा मिळाल्या. १९६ वरून २८८ जागांची झेप नाझी पक्षानं `राईशटॅग फायर‘मुळे घेतली. या उत्तुंग झेपेमागे अन्य कारणंही होती पण ती फार उशिरा लोकांना कळली.
या साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत एकटा लुबी इतक्या प्रचंड मोठ्या इमारतीला आग कशी लावू शकला? हा साधा प्रश्न राष्ट्रवादाने भडकलेल्या जनतेपैकी एकालाही पडला नाही. वास्तविक, `राईशटॅग‘ला इमारतीत जाण्याचा एकच अंतर्मार्ग होता, जो राईशच्या अध्यक्षांच्या निवासाच्या तळघरातून जात होता. राईशचा अध्यक्ष होता दस्तूर खुद्द गोअरिंग!! म्हणजे, `राईशटॅग फायर‘साठी लागणारं इंधन, स्फोटकं वगैरे सामग्री गोअरिंगच्याच योजनेनुसार त्याच्याच देखरेखीखाली नाझींनी संसद भवनात पोहोचवली असणार. पण असा तर्क करण्यासाठी जर्मन जनता भानावर होती कुठे? जनता सूड भावनेनं पेटली होती. जनतेनं `राईशटॅग फायरचा‘ प्रतिशोध घेण्यासाठी हिटलरच्या हाती सत्ता दिली. हिटलर सत्ताधीश झाल्यावर लुबीवर खटला भरला गेला. मात्र, `राईशटॅग‘मध्ये स्फोटकं, इंधन केव्हा, कसे आणले गेले याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करून सगळेच पुरावे नष्ट करण्यात आले होते. या प्रकरणात एकही नाझी सापडला नाही. धरपकड केलेल्या नाझीविरोधी चार-पाच हजार लोकांचं काय झालं, तेही कोणाला नेमकं कळलं नाही. लुबीचा शिरच्छेद केला गेला…
पुढे न्युरेंनबर्ग खटल्याच्या काळात असं कळलं की मार्च १९३२च्या निवडणुकांमध्ये हिटलर-गोबेल्स या जोडगोळीनं ४/५ टक्के बनावट मतपत्रिकांचा वापर केला होता आणि एसए, एसएस यांनी खोटं मतदानदेखील केलं होतं, या खोट्या मतदानाबाबत काही उमेदवारांनी व पक्षांनी तक्रारीही केल्या होत्या. पण राईशटॅग फायरने जनतेत पेटवलेल्या राष्ट्रवादामुळे कोणालाही त्या तक्रारींत तथ्य वाटलं नव्हतं.
प्रोपगंडा हेच शस्त्र
थोडक्यात, बनावट मतपत्रिका, बनावट मतदान आणि बनावट हल्ला (राईशटॅग फायर) या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे, नाझी पक्षाची १९६ वरून २८८ जागांवर झेप!! अशा या निवडणुकीनंतर हिटलर हयात असेपर्यंत निवडणुका झाल्याच नाहीत…. युद्धच होत राहिली. यानंतर दुसरं महायुद्ध, त्यात घडलेला संहार, ज्यूंच्या छळछावण्या, त्यांचं हत्याकांड, ज्यूंना हुडकून छळछावण्यांमध्ये कोंडण्यासाठी `उपयुक्त‘ ठरलेले एसए व एसएसचे स्वयंसेवक हा सारा इतिहास सर्वज्ञात आहे.
एकंदरीत `अल्पसंख्याकांच्या, भिन्न धर्मीयांच्या द्वेषावर आधारित `राष्ट्रवाद‘, भिन्न धर्मीयांविरुद्ध खोट्या बातम्या, विरोधकांविरुद्ध खोटे आरोप, खोटे मतदान आणि कॉर्पोरेट्सचे आर्थिक बळ यांनी जनतेवर केलेल्या सामूहिक बलात्कारातून २१ मार्च १९३३ रोजी हिटलरचे `थर्ड राइश‘ जन्माला आले आणि हिटलरनं ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या करेपर्यंत ते अबाधित राहिले !! तोपर्यंत जर्मन जनता ज्यूंच्या रक्षणासाठी, हिटलरच्या अत्याचाराविररुद्ध जाब विचारायला रस्त्यावर उतरली नाही. कारण, जनतेतील ज्यू द्वेषावर आधारित राष्ट्रवाद तेवत ठेवण्यात आणि युद्धात जर्मनी हरते आहे, हे जनतेपासून लपवून ठेवण्यात हिटलर-गोबेल्स ही जोडगोळी यशस्वी झाली होती. एव्हाना, जगातले कोट्यवधी लोक हे हिटलर-मुसोलिनीप्रणित दुसऱ्या महायुद्धात आणि लक्षावधी ज्यू हिटलरच्या छळछावण्यांत मृत्यमुखी पडले होते.
फॅसिझमची उकल
फॅसिझम अंगीकारून त्याचा `यशस्वी‘ वापर करणाऱ्या हिटलरची कारकीर्द पाहता, केवळ एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही किंवा लष्करशाही या एकेका शब्दांमध्ये `फॅसिझम‘चा अर्थ किंवा वर्णन सामावणे शक्य नाही. एकाधिकारशाही, हुकूमशाही, लष्करशाही आणि फॅसिझम या साऱ्या प्रकारांत `विरोधकांचं निर्दालन‘ हे तत्व सामायिक आहे. तरीही फॅसिझम अन्य तीन प्रकारांपेक्षा वेगळा ठरतो. कारण, त्यात सत्ता प्राप्त करतानाचा मार्ग क्रांती, बंड किंवा उठाव हा नसून तर जनमत-निवडणूक-लोकशाही हाच असतो. मात्र फॅसिस्ट याच लोकशाही मार्गात असत्य, अफवा, बनावट हल्ले यांच्या वापरातून जनतेत विवक्षित अल्पसंख्य- भिन्न धर्मीय गटाविरुद्ध द्वेष भिनवतात. त्या द्वेषाला `राष्ट्रभक्ती ठरवून ३५-३८ टक्के जनतेची मते मिळवून १०० टक्के सत्ता मिळवतात. सत्ता हस्तगत झाल्यावर ती ३५-३८ टक्के जनता अल्पसंख्य-भिन्न धर्मीय गटाच्या द्वेषाने पेटत राहील, अशा अफवा-खोट्या बातम्या पेरत राहतात, बहुसंख्याक गटाचा स्वधर्माभिमान-स्वसंकृती गर्व चेतवत राहतात, जेणेकरून जनमताचा मोठा भाग कायम स्वतःच्या बाजूने राहील. यासाठी ते देशसेवेचा व सांस्कृतिक कार्याचा बुरखा घातलेली शिस्तबद्ध- निमलष्करी स्वरूपाची संघटना चालवतात. स्वपक्षाच्या सत्कार्याच्या व विरोधकांच्या दुष्कृत्याच्या प्रसारासाठी ते प्रसारमाध्यमं बगलेत घेतात व निधीसाठी कॉर्पोरेट्स यांना ते हाताशी धरतात.
एकंदरीत, मुसोलिनी आणि विशेषतः हिटलरनं सत्तेपर्यंत पोहोचण्यापासून आत्महत्येपर्यंत जे काही केलं, ते इतकं व्यापक आणि विविधांगी आहे की फॅसिझमचा अर्थ किंवा वर्णन थोडक्यात करणं अवघड आहे. त्यापेक्षा फॅसिझम म्हणजे, `हिटलरने जे केले ते‘ असा त्याचा अर्थ, सोपा आणि नेमका आहे.
(मुक्त-संवाद, १५ नोव्हेंबर २०२० मधून साभार.)
COMMENTS