अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले

अरुणाचलमध्ये चीनने गांव वसवले

नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेशात चीनकडून एक गाव वसवले जात असल्याची माहिती सरकारकडे असून देशाच्या संरक्षणाला आव्हान देणार्या चीनच्या अशा बांधकामांवर सरकारच

‘सानताय’च्या आठवणीतला तीआनमेन
वुहानला मुंबईने मागे टाकले
तैवानी तिढा

नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेशात चीनकडून एक गाव वसवले जात असल्याची माहिती सरकारकडे असून देशाच्या संरक्षणाला आव्हान देणार्या चीनच्या अशा बांधकामांवर सरकारचे पूर्वीपासून लक्ष असल्याचे स्पष्टीकरण परराष्ट्र खात्याने मंगळवारी दिले. भारताने या भागातील भारतीय नागरिकांना त्यांच्या विकासासाठी पायाभूत सुविधाही पुरवण्यास सुरूवात केली असून स्थानिकांना रोजगार व संपर्क सुविधा दिल्याचे परराष्ट्र खात्याने सांगितले. अरुणाचल प्रदेशातील नागरिकांना आपल्या जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यास सरकारने मदत देऊ केली आहे, असेही परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

सोमवारी एनडीटीव्हीने अरुणाचल प्रदेशातील एका वादग्रस्त भागात चीनने एक १०१ घरांचे गाव वसवल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. २६ ऑगस्ट २०१९मध्ये एकही बांधकाम नसलेल्या ठिकाणी नोव्हेंबर २०२०मध्ये पूर्ण बांधकाम झाल्याचे छायाचित्र एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले होते. ही छायाचित्रे ‘प्लॅनेट लॅब इंक’कडून एनडीटीव्हीने मिळवली होती.

ही छायाचित्रे १ नोव्हेंबर २०२०मधील होती व या छायाचित्रांचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यानंतर असे स्पष्ट झाले की, चीनच्या लष्कराने भारताच्या हद्दीत सुमारे ४.५ किमी इतकी घुसखोरी केली असून तेथे गाव वसवले गेले आहे.

हा प्रदेश भारताचा असला तरी १९५९ पासून तो चीनच्या ताब्यात आहे. तेथे चीनच्या सैन्याचे एक ठाणे होते. आता एक पूर्ण गाव वसवले गेले असून तेथे हजाराहून अधिक माणसे राहू शकतात.

हे गाव त्सारी चू नदीच्या किनार्यानजीक सुबनसिरी जिल्ह्यातील असून गेली अनेक दशके या भागावर चीन व भारताकडून ताबा सांगितला जात आहे.

भाजपच्या खासदाराने पूर्वीच इशारा दिला होता

गेल्या वर्षी लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीमुळे व भारतीय जवानांच्या मृत्यूनंतर भारत व चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी अरुणाचलमधील भाजपचे खासदार तापिर गाओ यांनी अरुणाचल प्रदेशातही चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्याचे संसदेत सांगितले होते. गाओ यांनी सुबरसिरी जिल्ह्याचा उल्लेखही केला होता. सोमवारी एनडीटीव्हीला प्रतिक्रिया देताना गाओ यांनी चीनकडून दुहेरी मार्ग असलेला रस्ताही पूर्ण झाल्याचे सांगितले होते. या भागात अजूनही चीनकडून बांधकाम सुरू आहे. नदीच्या किनार्यालगतचा भाग तपासल्यास चीनने सुबनसिरी जिल्ह्यात सुमारे ६०-७० किमी अंतर इतकी घुसखोरी केली असून नदीच्या किनार्यावर मोठ्या प्रमाणावर चीनकडून बांधकाम केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

दरम्यान परराष्ट्र खात्याने सुबनसिरी जिल्ह्यात चीनच्या घुसखोरीवरून अद्याप चीनशी चर्चा सुरू केलेली नाही. केवळ घटनांवर आपले लक्ष असल्याचे परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: