साहित्यिक नेहरु

साहित्यिक नेहरु

आत्मचरित्र हे आत्मशोधाचे प्रकटीकरण असते मात्र नेहरूंच्या आत्मशोधाचे मुख्य माध्यम इतिहास हे आहे. ज्यात त्यांनी प्राचीन भारताचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आणि त्यातील मानवी जीवनाचे महत्त्व मांडत आपला, आपल्या देशाचा आणि जगाचा शोध घेतला.

मंत्र्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश द्यावेतः हायकोर्टात मागणी
बाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष
आयडीबीआयने ४५ हजार कोटी राईट ऑफ केले

पं. नेहरूंचे विरोधक अनेक प्रकारचे आहेत आणि होतेही. नेहरू एका बाबतीत सुदैवी होते की त्यांच्या हयातीत त्यांना चांगले टीकाकार भेटले. राम मनोहर लोहिया एकदा म्हणाले की, नेहरू एवढे चांगले साहित्यिक वा लेखक आहेत की खरेतर त्यांनी अजून लेखन करायला हवे होते. पण त्यासाठी त्यांना पुन्हा तुरूंगात टाकावं लागेल म्हणजे भारतीयांना अधिक चांगलं साहित्य वाचायला मिळेल ! यात नेहरूंच्या साहित्यशैलीचे कौतुकही आहे आणि राजकीय उद्देशही होता !

नेहरू राजकारणी नसते तर ते नक्कीच इंग्रजी भाषेत लिहिणारे जगप्रसिद्ध असे लेखक झाले असते, असे मत प्रख्यात साहित्यिक रस्किन बॉंड आणि मुल्कराज आनंद यांनी व्यक्त केले होते.

मध्यंतरी एकदा ‘कोटेशन्स’ चे पुस्तक वाचत होतो. त्यात अनेक प्राचीन भारतीय आणि ग्रीक, युरोपियन विचारवंतांचे विचार अभ्यासायला मिळाले. आधुनिक कालखंडातील अनेक साहित्यिक, लेखक विचारवंताचे आणि काही राजकीय नेत्यांचे विचार त्यात नमूद केले होते. भारतातील अनेक विचारवंत, तत्वचिंतक यांचेही विचारधन त्यात होते. मात्र राजकीय व्यक्ती असूनही ज्यांच्या विचारांचा समावेश केला होता , अशात भारतीय म्हटले तर दोनच नेते पाहायला मिळाले, ते म्हणजे गांधी आणि दुसरे नेहरू!

भारतातील इतर नेत्यांचे ‘कोटेशन्स’ तेवढ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत आढळून येत नाही, याचं कारण कदाचित इतर नेत्यांचे इंग्रजी भाषेत लेखन नसेल, किंवा असलेच तर ते जागतिक स्तरावर पोचलं नसेल किंवा ते मोजकं लेखन असेल. जागतिक स्तरावर वितरण असणाऱ्या प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होणे, याचाही फरक पडतो. नेहरूंची सर्वच पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी प्रकाशित केली. याचा अर्थ असाही की त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनापूर्वीच त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता अशी झाली होती.

१९वे शतक हे जगभर पसरलेल्या साम्राज्यशाहीच्या विस्ताराचे शतक होते. मात्र याच शतकाच्या उत्तरार्धात विविध वसाहतीत स्वातंत्र्य आंदोलनास सुरुवात झाली. याच कालखंडात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला जगाच्या पाठीवर अनेक देशात त्यात त्या देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रचंड लोकप्रियता लाभलेले अनेक नेते तयार झाले. म्यानमारमध्ये ऑंग सान, चीनमध्ये चैंग कै शेक, श्रीलंकेत बंदरनायके अगदी त्याच प्रमाणे अरब देशात, काही आफ्रिकन देशातही नेल्सन मंडेला वगैरे अनेक नेते निर्माण झाले ज्यांनी चळवळीत, आंदोलनातही भाग घेतला, कारावासही भोगला, लोकप्रियताही मिळवली, यशस्वी राजकारणही केले आणि तत्वचिंतनपर लेखनही केले. पण हे सर्व नेते सर्व पातळ्यांवर काम करू शकले नाहीत. काही लेखक होते पण चळवळीत नव्हते, कोणी तत्वचिंतनपर लेखन केले पण ते लोकप्रिय व यशस्वी राजकारणी होऊ शकले नाहीत.परंतु जवाहरलाल नेहरूंनी मात्र यशस्वी राजकारणासोबतच लेखन केले आणि त्यांचे संशोधनात्मक न राहता त्यास साहित्यिक मूल्य लाभले आणि त्यातून त्यांची ओळख एक साहित्यिक राजकारणी अशी निर्माण झाली.

नेहरूंनी भारताचा स्वतंत्रलढा आणि त्यानंतरच्या कालखंडात त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. आपल्या आयुष्यातील बराच मोठा कालखंड प्रत्यक्ष, सामाजिक सुधारणा आंदोलन, साम्राज्यशाहीच्या विरोधातील स्वातंत्र्य आंदोलनात आणि या दरम्यान तब्बल ९ वर्ष कारावासही भोगला. त्याचसोबत आपले राजकीय वैचारिक चिंतन मांडणारे अनेक ग्रंथ देखील लिहिले.

जवाहरलाल नेहरूंचा जन्म भारतात, मात्र पूर्ण शिक्षण युरोपात झाले होते. उच्चभ्रू वर्तुळात वावरत पाश्चात्य विचारांचा व आचारांचा प्रभाव असणाऱ्या नेहरूंचे भारतीय जनतेचा नायक बनणे तसे अवघडच होते. मोतीलाल नेहरूंनी त्यांची जडणघडणच तशी केली होती. श्रीमंती प्रचंड होती. नेहरूंना इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना जे पैसे पाठवले जायचे ते त्या काळाच्या मानाने खूप होते. पण नेहरूंनी या पैशाचा वापर खूप सुयोग्य पद्धतीने केला. त्यांनी विविध ग्रंथांची खरेदी केली. जगातील विविध भाषेतील पुस्तके त्यांनी विकत घेतली. प्रचंड वाचन केले आणि त्यातूनच त्यांच्यातील साहित्यिक घडला.

हॅरोमध्ये शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीस ‘हॅरोवियन’ म्हणून प्रचंड मान इंग्लंडमध्ये दिला जातो. याचा नेहरूंना खूप फायदा झाला. बडे बडे ब्रिटिश अधिकारीही ‘हॅरोवियन’ म्हणून नेहरूंबद्दल एक वेगळाच मान आणि आदब राखून असत. यामुळे त्यांची प्रतिमा इंग्लंडमध्ये खूप आदराची बनली आणि त्यामुळे त्यांच्या लेखनास युरोपात खूप प्रसिद्धी मिळाली.

नेहरूंची एक आठवण नेहरूंबरोबर केम्ब्रिजमध्ये शिकलेल्या श्री. प्रकाश यांनी लिहिली आहे. ते नेहरूंना प्रथम एका भारतीय डॉक्टरच्या घरी भेटले तेव्हा, असे जाणवले हा एक केम्ब्रिजमध्ये शिकणारा हुशार तरुण असून श्रोत्यांवर प्रभाव टाकण्यासाठी अतिशय प्रभावी इंग्रजी भाषेत बोलतो आणि शेक्सपियरच्या हॅम्लेटप्रमाणे प्रश्नही विचारतो ! खरेतर प्रभावी संभाषण, शैलीदार लेखन ही त्यांची ओळख पुढे अनेक वर्षांनी १९३६ नंतर अधिकृतपणे तयार झाली.

नेहरूंचे लेखन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या तुलनेत विपुल आहे. त्यांची प्रमुख चार पुस्तके प्रकाशित आहेत. ‘Glimpses over world history’, ‘An autobiography’ , ‘Discovery of India’ आणि ‘Bunch of old letters’. या शिवाय इतर लेखन आहे, जे टिपण अथवा भाषणांच्या आणि वृत्तपत्रीय लेखांच्या स्वरूपात आहे.

या सर्व लेखनामुळे व पुस्तकांमुळे नेहरूंचा नावलौकिक नेहरू एक साहित्यिक म्हणून झालेला आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निव्वळ राजकीय, सामाजिक आंदोलन अथवा संशोधन स्वरूपाचे न राहता ते एक साहित्य मूल्य म्हणून पुढे आले.

आत्मचरित्र हे आत्मशोधाचे प्रकटीकरण असते मात्र नेहरूंच्या आत्मशोधाचे मुख्य माध्यम इतिहास हे आहे. ज्यात त्यांनी प्राचीन भारताचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आणि त्यातील मानवी जीवनाचे महत्त्व मांडत आपला, आपल्या देशाचा आणि जगाचा शोध घेतला.

नेहरूंची भाषा प्रवाही आणि अतिशय शैलीदार अशी आहे. आजच्या इंग्रजीपेक्षा ती वेगळी आहे, कारण २०व्या शतकाच्या सुरवातीला युरोपियन लेखकांची वा साहित्यिकांची ज्या प्रमाणे लेखनशैली होती तशीच ती भाषा आहे. त्यांच्या लेखनात फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश भाषातील कादंबऱ्या, नाटके, कविता यांचा संदर्भ आहे. यातून त्यांच्या चौफेर वाचनाचा प्रत्यय वारंवार दिसून येतो. त्यामुळे ते रटाळ वा कंटाळवाणे न वाटता रंजक आणि लाघवी वाटते.

नेहरूंनी स्वतःला कधीही इतिहास संशोधक म्हटले नाही मात्र ते अभ्यासक होते आणि त्या अध्ययनातून आणि निरीक्षणातून त्यांनी लेखन केले, ज्याचा मुख्य आधार त्यांची मानवकेंद्री चिंतनाची बैठक आणि संवेदनशीलता आहे. आश्चर्य वाटेल, पण नेहरू समीक्षक देखील आहेत. अनेक नामवंत लेखकांच्या, साहित्यिकांच्या पुस्तकांचे परीक्षण आणि काही पुस्तकाच्या प्रस्तावना त्यांनी लिहिल्या आहेत.अनेक वेळी ‘Forworded by J.Nehru’ अशा स्वरूपात पुस्तकांची जाहिरात केली जात असे. व्हिक्टर वॅलेसच्या ‘Path Of Peace’ या पुस्तकाची प्रस्तावना खास त्यांच्या आग्रहावरून नेहरूंनी लिहिली होती.

अमेरिकी लेखिका डोरोथी नॉर्मन यांनी नेहरूंचा एक किस्सा सांगितला आहे. ‘The Good Earth’ या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक पर्ल बक यांनी नेहरूंच्या स्वागतासाठी न्यू यॉर्कमध्ये एक मेजवानी आयोजित केली होती. त्या मेजवानीची निमंत्रितांची यादी पाहून नेहरू नाराजीने म्हणाले की, या यादीत असेच जुने लेखक आहेत, ज्यांचे लेखन मी वाचलं आहे, वा ज्यांना मी ओळखून आहे पण यात कोणीही तरूण, प्रोग्रेसिव्ह लेखक, संपादक वा प्रकाशक दिसून येत नाही.

व्यासंग व्यापक असल्यामुळे विषयांचे बंधन नेहरूंना कधीच नव्हते, इतिहास, वर्तमान, जागतिक आणि राष्ट्रीय राजकारण, सामाजिक चळवळी, धर्मचिंतन व विवेकवाद, काव्य, नाट्य यावर ते लिहीत व बोलत असत. वेद,उपनिषद, वेदांतापासून ते कालिदासाच्या संस्कृत काव्यापर्यंत आणि सिग्मंड फ्राईडच्या ‘इडिपस कॉम्प्लेक्स’ मानसशास्त्रीय संकल्पनेपासून निशस्त्रीकरणापर्यंत त्यांचे चिंतन, मनन आणि लेखन सतत चालू असे.

व्यापक चिंतन, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि आधुनिक पाश्चात्य विचासरणी यातून त्यांनी स्वीकारलेला आधुनिक राजकारणाचा विचार अशी नेहरूंच्या व्यक्तिमत्वाची मुख्य ओळख आहे. ती त्यांच्या साहित्यात दिसते. नेहरू आणि गांधीजी यांची भेट झाली नसती तर नेहरूंचा दृष्टीकोन निव्वळ पाश्चात्य राहिला असता. मग फार फार तर नेहरू ‘ग्लिम्प्सेस’ लिहू शकले असते आणि त्यांचे आत्मचरित्रही निव्वळ युरोपातील अनुभवाची मांडणी एवढेच राहिले असते.

पूर्वेकडील संस्कृती आणि पश्चिमेकडील संस्कृती यांचे त्यांच्या अंतर्मनातील द्वंद्वच खरेतर त्यांचा लेखनासाठी प्रेरणास्रोत बनले. याचे वर्णन रशियन कादंबरीकार इलिया इरेनबर्ग करताना म्हणतात, ‘Nehru succeded in giving India some features of Europian Culture without abandoning the wealth of national traditions. one can speak about politician’s successes and failures, but I would like to say that, morals principles and conscience permeate the whole life of Nehru.’

इंग्रजी साहित्यातील नामवंत साहित्यिक मुल्क राज आनंद, नेहरूंच्या साहित्याविषयी लिहितात “ The phenomenon of an Indian, born in an exalted nineteenth century Europeanized household, educated in England, becoming an Indian Writer of the highest excellence in the English language is strange and inexplicable’. इतिहासकार अर्नौल्ड टॉयन्बी नेहरूंबद्दल लिहितात ‘ When a noble soul takes on itself the burdon of political leadership for politics are always in need of redeeming’ पण नेहरूंनी हे दोन्ही बाजूंवर यशस्वीपणे केलं. राजकीय व्यासपीठ आणि सुधारणावाद याची अवघड सांगड त्यांनी यशस्वी केली.

मुल्क राज आनंद यांच्या म्हणण्यानुसार नेहरूंच्या लेखनात टॉल्स्टॅाय, दातोवस्की आणि गांधीजी यांच्याप्रमाणेच तत्वचिंतन, आत्मकथन, निरीक्षण आणि संवेदनशीलता यांचा अपूर्व संगम आढळतो. अर्नोल्ड टॉयन्बी यांनीही नेहरूंच्या या इंग्रजी भाषेमुळे आणि लेखनशैलीमुळे त्यांची लोकप्रियता साहित्यिक क्षेत्रात एक प्रतिभावान लेखक आणि तत्वज्ञ राजकारणी म्हणून असल्याचे म्हटले आहे.

आईनस्टाईन यांनी नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी इंडिया’ या पुस्तकाचे वर्णन ‘ – gives an understanding of glorious intellectual and spiritual tradition of a great country’ असे केले. शिवाय नेहरूंबद्दल ते म्हणाले ‘ We the worshipers of science are today looking upto Nehru – for leadership in mankind’s resolute stand to the implications of atomic war’

रामचंद्र गुहांच्या लेखातील एक संदर्भ असा की, १९५८ साली ई.एम.फॉस्टर यांनी अशी कल्पना केली की, व्हॉल्टेअर हा विचारवंत पुन्हा जन्माला आला असून त्यास मानवजातीच्या भविष्यासंबधी एक पत्र लिहायचे आहे, तर ते कोणाला लिहावे यासाठी जगभरातील नेत्यांचा विचार केला पण त्यात त्याला नेहरूंशिवाय असे पत्र पाठविण्यासाठी एकही सुयोग्य राजकारणी व्यक्ती सापडली नाही!

नेहरूंनी आयआयटी, आयआयएम, एनसीएल, आदी रिसर्च इन्स्टिट्यूट्स, रिसर्च कॉन्सिल्स प्रयोगशाळा, अणुसंशोधन-अंतराळ आयोग, धरणे, विद्यापीठे याबरोबरच ललित कला अकादमी, एनएसडी, एनबीटी, एफटीआयआय, साहित्य अकादमी यांच्या निर्मितींना तेवढेच प्राधान्य दिले. विज्ञान तंत्रज्ञान याच्या प्रगतीबरोबरच मानवी जीवनातील कला आणि साहित्य यांचे महत्त्व ते जाणून होते. कारण मानवी जीवनातील हरप्रकारचे सौंदर्य हा त्यांच्या आस्थेचा विषय होता आणि तोच त्यांच्या साहित्याचा लेखनाचा आत्मा आहे !

राज कुलकर्णी, हे नेहरुवादाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0