मुंबई: ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाययोजनांच्या दृष्टीने 'शरद शतम्' नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यासाठी का
मुंबई: ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाययोजनांच्या दृष्टीने ‘शरद शतम्’ नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत. लवकरच या योजनेची मान्यता आगामी मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ आयोजित ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.
यावेळी मुंडे म्हणाले, आजाराचे वेळीच निदान व्हावे व त्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी केल्या जाव्यात व त्या मोफत असाव्यात या उद्देशाने ‘शरद शतम्’ ही योजना खूप महत्त्वाची आहे. या योजनेची कार्यपद्धती, सर्वेक्षण या सर्व बाबींबरोबरच आजाराचे निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात उपचार केले जावेत यासाठीचे समन्वयन या सर्व बाबी ठरवून अंतिम ऍक्शन प्लान तयार करण्यासाठी आरोग्यसह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती नुकतीच स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार आहोत. ही सगळी कार्यवाही येत्या काही दिवसातच पूर्ण होणार आहे असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
मुंडे पुढे म्हणाले, आपण आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील आदर केला पाहिजे. त्यांना वेळ देवून आजवर त्यांनी ज्याप्रकारे आपल्याला मायेची ऊब आपल्या लहानपणी दिली तीच ऊब या वृद्धापकाळात आपण त्यांना देण्याची आवश्यकता आहे आणि आजच्या दिवशी अशी शपथ सर्वांनी घेणे गरजेचे आहे. बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण अशा चार अवस्था मनुष्य जीवनात येतात. प्रत्येक अवस्था आपापल्या जागी महत्वाची असते.प्रत्येकाला आपला वृद्धापकाळ आनंदात जावा ही एकमात्र अपेक्षा असते.
राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे एक कोटी आहे म्हणजेच लोकसंख्येच्या सव्वा आठ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.
COMMENTS