लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा

लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा

नवी दिल्लीः उ. प्रदेशमधील लखीमपूर खिरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट होता, असे या प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीचे म्हणणे आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्

नवं भागवत पुराण
काँग्रेसवरची टीका अज्ञान मुलक, अवास्तव व पूर्वग्रह दूषित
दिल्ली निवडणुका – विकास विरुद्ध विभाजन

नवी दिल्लीः उ. प्रदेशमधील लखीमपूर खिरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट होता, असे या प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीचे म्हणणे आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात लखीमपूर खेरी जिल्ह्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आपली कार आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर नेली होती. या घटनेत दोन शेतकरी चिरडून ठार झाले होते व नंतर झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार तर शेकडो जखमी झाले होते. या वेळी संतप्त जमावाने काही गाड्या पेटवून दिल्या होत्या. मृतांमध्ये ४ शेतकरी असल्याचे नंतर उ. प्रदेश सरकारने स्पष्ट केले होते. अजय मिश्रा यांनी आपला मुलगा गाडीत नसल्याचा दावा केला होता. पण अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष गाडीत असल्याचे स्पष्ट दिसून आल्यानंतर आशिषला पोलिसांनी ताब्यात घेतले. आशिष या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

या घटनेचा तपास करणार्या उ. प्रदेश एसआयटीने न्यायालयाला एक पत्र लिहून मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांच्याविरोधातल्या सर्व आरोपांची सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. आशिष मिश्रावर खूनाचा प्रयत्न व अन्य आरोप लावणे गरजेचे आहे, असेही एसआयटीचे म्हणणे आहे. आशिष मिश्रा व त्यांचे १३ साथीदार यांनी शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा कट रचला होता. हा कट सुनियोजित व जाणूनबुजून तयार करण्यात आला होता, हा निष्कर्ष घटनास्थळी मिळालेले पुरावे व साक्षीदार्यांच्या जबानीतून आल्याचा एसआयटीचे म्हणणे आहे. एसआयटीने या सर्वांवर नवे आरोप लावावे यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

आशिष मिश्राकडून गुन्हा होऊनही मोदी सरकारने अजय मिश्रा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही. उ. प्रदेश विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसआयटीने कटकारस्थानाचा ठेवलेला आरोप अजय मिश्रा यांच्यासाठी राजकीय अडचण ठरू शकतो.

नेमके प्रकरण काय आहे?

गेल्या ऑक्टोबर महिन्यात उ. प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकुनिया येथे मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याचा विरोध म्हणून शेतकर्यांचे आंदोलन सुरू होते. या गावात उ. प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या उपस्थितीत एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिकुनिया हे मिश्रा यांच्या वडिलांचे गाव व त्यांचा लोकसभा मतदार संघ आहे.

केशव प्रसाद मौर्य यांच्या मोटारींचा ताफा रस्त्यावरून निघाला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलकांनी निदर्शने सुरू केली. ताफा थांबवण्याचा काहींचा प्रयत्न होता. आंदोलकांच्या हाती काळे झेंडेही होते. या दरम्यान मौर्य यांच्या ताफ्यातल्या तीन गाड्या आंदोलकांच्या अंगावर गेल्या. त्यातील एक गाडी मिश्रा यांच्या मुलाची आशिष मिश्रा यांची व नातेवाइकांची होती. या दुर्घटनेत एका शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला व तर अन्य एकाचा इस्पितळात मृत्यू झाला. ८ जखमींना तातडीने इस्पितळात नेण्यात आले. जखमींमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे एक नेते तेजिंदर एस. विरक होते.

मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली चिरडून शेतकरी मरण पावल्याची बातमी कळल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आणि त्यांच्याकडून व काही गाड्यांना आगी लावण्यात आल्या.

त्या अगोदर अजय मिश्रा यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करताना शेती कायद्याला १०-१५ शेतकर्यांचा विरोध असून त्यांना ठिकाणावर आणण्यास दोन मिनिटे पुरेसे असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्याचाही राग शेतकर्यांमध्ये होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: